मराठवाडय़ासह राज्यभर पाऊस नसल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
औरंगाबाद- मराठवाडय़ासह राज्यभर पाऊस नसल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आधीच दुष्काळाचा सामना करणा-या मराठवाडय़ावर पावसाअभावी ‘पाणी संकट’ ओढवणार आहे.
पावसाच्या भरवशावर जवळपास ७० टक्के खरिपाची पेरणी झाली आहे, मात्र अंकुरलेली पिके आता सुकून जाण्याची भीती आहे.
अंकुरलेली पिके जगवण्यासाठी पाण्याचा साठाही शिल्लक नाही. शेवटची आशा असलेल्या जायकवाडी धरणातही केवळ एक टक्का साठा उरला आहे, मात्र येत्या १० दिवसांत हा साठा संपणार आहे.
मराठवाडय़ात आतापर्यंत केवळ १०५ मि. मी. पाऊस पडला असून, आजघडीला केवळ ९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
उस्मानाबाद कोरडाच!
उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरीही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. जुलै महिना मध्यावर आला तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. आजपर्यंत केवळ ७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
पेरणीची कामे ३५ टक्के पूर्ण झाली आहेत. सोयाबीनची पेरणी करून महिना लोटला तरी पावसाअभावी पिकांची म्हणावी तशी वाढ झालेली नाही. त्यामुळे हताश शेतक-यांनी आपल्या शेतात पेरलेले सोयाबीन मोडून टाकायला सुरुवात केली आहे.