डोंबिवली येथील तुकारामनगर परिसरातील एका इमारतीत काही तरी घडत होते; पण नक्की काय याचा डोंबिवलीकरांना मागमुसही नव्हता. या इमारतीत अनेक मुली यायच्या, नंतर काही तासांनी जायच्या. ‘परिवर्तन’ या संस्थेच्या ज्योती पाटकर यांनी त्याचा शोध घेतला व याबाबत स्थानिक पोलीस ठाण्याच्या ही बाब निदर्शनाला आणली. नंतरही पोलिसांकडून काहीही हालचाली होत नसल्याने अखेर पाटकर यांनी थेट भाजपाच्या गोपीनाथ मुंडे यांच्या कानावर हा प्रकार घातला आणि २००२ मध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनात मुंडे यांनी डोंबिवली येथील ‘छमिया’ या प्रकरणाचा पर्दाफाश केला. नंतर राज्यभर हे प्रकरण ‘छमियाकांड’ म्हणून प्रसिद्ध झाले.
या प्रकरणात फसवल्या गेलेल्या मुलींचे अश्लील चित्रीकरण असलेल्या सीडीज तेव्हा दोनशे ते तीनशे रुपयांपर्यंत राज्यातील अनेक भागात विकल्या जायच्या. या सीडीज तयार करणा-यांनी तब्बल २८ कोटी कमवल्याचे बोलले जात होते. त्यानंतर भाईंदरमध्येही चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून अनेक मुलींना गुंगीचे औषध देऊन त्यांच्याकडून अनैतिक व्यवसाय करून घेतल्याचे तसेच त्याच्या सीडीज बनवल्याचे प्रकरण उघडकीला आले. डोंबिवलीतील छमियाकांडची आठवण काढण्याचे कारण काय, असा अनेकांना प्रश्न पडेल. पण गेल्या आठवडय़ात मानपाडा पोलीस ठाण्याच्या दोन पोलिसांनी लेडीजबारमध्ये जाऊन केलेल्या प्रतापामुळे छमियाकांडाची प्रकर्षाने आठवण झाली. पोलिसांचे बारमध्ये जाणे व छमियाकांड या घटनांचा अर्थाअर्थी संबंध नाही; पण या दोन्ही घटना डोंबिवलीत घडल्या आहेत. त्यामुळे सांस्कृतिक नगरीत त्याचा जादाचा बोभाटा झाला. सत्य, शिव व सुंदर याचाही गजर झाला.
मानपाडा येथील लेडीजबारमध्ये जाऊन बाराबालांना वस्तूसारख्या हाताळणा-या या पोलिसांवर आता कारवाई क रण्यात आलेली आहे. त्यांची खातेनिहाय चौकशीही होईल. त्यांना काय कडक शिक्षा व्हायची ती होईल; पण या निमित्ताने सार्वजनिक जीवनात वावरणा-यांचे चारित्र्य, वर्तन किंबहुना श्लील व अश्लील वर्तन याबाबी चर्चेल्या जात आहे. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ असे पोलिसी खात्याचे ब्रीद आहे. त्याला थेट धक्का लावणारी ही घटना असल्याने पोलिसांना आरोपीच्या पिंज-यात उभे करण्याचा प्रयत्न सुरू होत आहे. तो तितकासा चुकीचा आहे, असेही म्हणता येणार नाही. पण पाप-पुण्य, सत्य-असत्य यांच्या तराजूत आपल्या हाती नक्की काय येईल, हे सांगणे तसे कठीणच आहे. त्यामुळे अशा घटना घडल्यानंतर काही दिवस धुराळा उडतो. नंतर सारे काही शांत..शांत होत जाते. त्यामुळे अशा घटनांना हात घालताना त्यांच्या मुळापर्यंत जाण्याची गरज आहे. ते होत नसल्याने आरोपी सहज सुटतात. आरोप करणारेही काही काळानंतर शांत बसतात, आहे ते सुरूच राहते. या निमित्ताने लेडीजबारचा विषय पुन्हा चर्चेच्या टापूत आला आहे. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पुढाकार घेतल्याने राज्यातील रात्री उशिरापर्यंत चालणा-या बारवर निर्बंध आले. नाही तर पहाटेपर्यंत राज्यातील अनेक बार सुरू असायचे. आताही ते सरसकट बंद असतील, असेही म्हणता येत नाही.
जागतिकीकरण नव्वदच्या दशकात आले. त्याच्या चार वर्षे आधी म्हणजेच १९८६पासून राज्यातील महानगरांमध्ये लेडीजबारचे पेव फुटू लागले. शेट्टी मंडळींना काही तासातच लाखो रुपये मिळू लागल्याने या धंद्याला बरकत आहे. या बारच्या यंत्रणेची एक साखळी असते. बारमालकापासून ती सुरू होते. या साखळीत मुली हेरणारे दलाल, त्यांची वाहतूक करणारे वाहतूकदार, मस्तवाल गुंड, वेटर, लॉजवाले असे सगळेच येतात. बारबालांच्या जीवावर हे अनेक परावलंबी जगत असतात. असा हा व्यवसाय आता थेट खेडोपाडी पोहोचला आहे. खुद्द डोंबिवली रेल्वे स्थानकापासून असे बार सुरू होतात. ते थेट डोंबिवलीचे टोक असणा-या शीळफाटापर्यंत याचे पेव फुटलेले आहे. या बारजवळच लॉजिंग-बोर्डिगची व्यवस्था असल्याने शारीरिक व मानसिक गरज अनेकांची भागत असते. स्थानिक राजकारणी व पोलिसांना मॅनेज केल्यास बारवर फारसे विघ्न येत नाही; पण एखाद्या बारवाल्याने वेळेवर हप्ता दिला नाही तर त्यांच्या बारवर छापा टाकण्यात येतो. नंतर प्रसिद्धीमाध्यमांच्या माध्यमातून त्याला प्रसिद्धीही मिळते. असा हा साराच आतबट्टय़ाचा खेळ आहे. त्यामुळे बारवजा शहर अशी संकल्पनाच करता येत नाही, इतकी ही बारसंस्कृती भारताच्या मूळ संस्कृतीवर आरोपित करण्यात आलेली आहे. बारबालांच्या नादाला लागून अनेक जण आपल्या संसारावर नांगर फिरवतात. कुटुंबच्या कुटुंबे यातून उद्ध्वस्त झालेली आहेत. अशा बारची सवय, आवड पोलिसांना लागली नाही तर नवलच. त्यातून अंगावर खाकी वर्दी असल्याने उन्मत्तपणा अधिकच बळावतो. हाच उन्मत्तपणा एका जागरुक नागरिकाच्या माध्यमातून ‘व्हॉटसअॅप’द्वारे पोलीस उपायुक्तांपर्यंत पोहोचल्यावर पोलिसांची यंत्रणा कामाला लागली व या दोन पोलिसांवर कारवाई करण्यात आली. डोंबिवली येथे उघडकीला आलेली ही घटना हिमनगाचे टोक आहे. फक्त हिमनगाच्या टोकावरून हिमपहाडाची कल्पना करता येणार नाही, इतके ते विशाल असते.
पोलीस हा कायद्याचा रक्षक असतो. कालानुरूप या व्याख्येत थोडासा बदलही होऊ लागला आहे. एकूणच मुक्त अर्थव्यवस्थेमुळे आलेले स्वातंत्र्य आपणही का अनुभवू नये, असे पोलिसांना वाटणे नाकारता येत नाही; पण त्यातूनच बारमधे घुसून बारमालकांकडून ‘प्रोटेक्शन मनी’ म्हणून पैसे उकळण्याचे प्रकारही सुरू आहेत. ठाण्यात काही वर्षापूर्वी खंडणीविरोधी पथक व गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांमध्ये चांगलेच वाजायचे. काही परिचयाच्या पोलीस मित्रांकडून याच्या सरस व सुरस कथा कानावर यायच्या. नव्वदच्या दशकात सुरेश मंचेकर टोळीचा ठाणे, कल्याण परिसरात बोलबाला होता. त्याच्या गुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी स्थापन केलेल्या विविध पथकातील पोलिसांचा रिकामपणाचा उद्योग बारचे उंबरठे झिजवणे हा होता. अजूनही अनेक पोलीस ठाण्यातील गुप्तवार्ता हेरणा-या विभागाच्या पोलिसांची त्या-त्या पोलीस ठाण्यातील बारसह विविध अनेक अनैतिक धंद्यावर वचक असतो. त्यांचा तिथे वावरही असतो. पण हा वावर खरे तर अशा बारमध्ये येणा-या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर पाळत ठेवण्यासाठी असावा; पण अनेकदा पोलीसही बारमध्ये बारबालांबरोबर नृत्यात रमल्याचे किस्से कानावर येत असतात. त्यामुळे अशाच पद्धतीने मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस त्या बारमध्ये गेले होते का, याची खातरजमा आता त्यांच्याच वरिष्ठांना करावी लागणार आहे. पण बार व पोलीस भिन्न नाहीत, ही बाब या निमित्ताने उघड झालेली आहे. या लेडीज बारमध्ये मोठय़ा प्रमाणात पैसा असल्याने ठाण्यातील अनेक पोलीस अधिका-यांनी नोकरीला असतानाच पेन्शनची व्यवस्था म्हणून बार उघडले आहेत. या बारचा कारभार जरी एखाद्या शेट्टीच्या हातात असला तरी त्याचा सातबारा या अधिका-याच्या नातेवाईकाच्या नावावर असतो. सरकारी नोकराला त्याच्या मालमत्तेचे विवरणपत्र दर पाच वर्षानी भरावे लागते; पण किती पोलीस ते विवरणपत्र सादर करतात, हा संशोधनाचा विषय आहे. अशा विवरणपत्र सादर न करणा-या पोलिसांची खरे तर खातेनिहाय चौकशीची मोहीमच पोलिसांकडून हाती घेतली गेली पाहिजे. पण वरून खालपर्यंत हे खाते बदनाम झाल्याने मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.
पोलीस दलातही मोठय़ा प्रमाणात स्पर्धा आहे. ही स्पर्धा जीवघेणी असते. तरी ती खेळली जाते. अनेकदा तर विशिष्ट टोळीची सुपारी घेऊन त्याच्या विरुद्ध टोळीच्या गुंडांचा खातमा करण्यापर्यंत पोलिसांची मजल पोहोचलेली आहे, असे आरोप अनेकदा पोलिसांवर झालेले आहेत. बार हा तर पैसे कमवण्याचा सोपा मार्ग. त्यामुळे ज्या पोलीस ठाण्यात जास्त गुन्हे घडतात तिथे जादा बीअर बार, लेडीज बार आहेत. अनैतिक-काळेधंदे चालतात तिथे पोस्टिंग मिळण्यासाठी पोलिसांमध्येही स्पर्धा असते. या स्पर्धेतून कायदा व सुव्यवस्था वा-यावर सोडली जाते. डोंबिवली येथील घटनाही अशाच पोलिसी खात्यातील अंतर्गत वर्चस्ववादातून झाली आहे का, हेही पाहिले गेले पाहिजे. श्लील व अश्लील काय, हा खरे तर वादाचा मुद्दा आहे. श्लीलतेच्या मर्यादा ओलांडल्यानंतर अश्लीलता सुरू होते. तर अश्लीलता बंदिस्त असल्यास ती श्लीलताच मानली जाते कारण तिचे प्रदर्शन होत नसते. त्यामुळे डोंबिवली येथील पोलिसांनी केलेले वर्तन कोणत्या प्रकारचे आहे, याचा विचार करताना पंचतंत्रातील ‘मी खिर खाल्ली तर बुडबुड घागरी’ असे म्हणणा-या मांजरीचा न्याय लावायचा का .. तर दुसरीकडे गांधीजींनी म्हटलेले आहे की, ‘सार्वजनिक जीवनात वावरणा-या व्यक्तीचे आयुष्य कधीच खासगी नसते.’ यातील योग्य अर्थ हाच आहे की, सदाचारालात सत्य दडलेले आहे. व्यभिचार हा कायमच उघडपणे वावरत असला तरी तो सदाचाराच्या पासंगालाही पुसत नाही.