मराठवाडा व राज्यातील काही जिल्ह्यांत दुष्काळाची स्थिती गंभीर असताना स्वातंत्र्यदिनानिमित्त महाराष्ट्राला संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दुष्काळग्रस्तांचा संपूर्ण विसर पडला.
मुंबई – मराठवाडा व राज्यातील काही जिल्ह्यांत दुष्काळाची स्थिती गंभीर असताना स्वातंत्र्यदिनानिमित्त महाराष्ट्राला संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दुष्काळग्रस्तांचा संपूर्ण विसर पडला. दुष्काळग्रस्तांसाठी सरकार काय करत आहे, याचा साधा उल्लेखही फडणवीस यांच्या भाषणात नव्हता. विधानसभेतील भाषणात ज्या योजनांची घोषणा केली, त्याचीच टेप मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात केली.
स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत ध्वजवंदनाचा समारंभ पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर, आमदार विनायक मेटे, आमदार राज पुरोहित, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमित मलिक, राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया, पोलीस महासंचालक संजीव दयाल, मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया, तिन्ही सेना दलांचे प्रमुख यांच्यासह मंत्रालयातील विविध विभागांचे सचिव, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्राला महाउद्योग राज्य बनवण्याचा निर्धार यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. सरकार राज्यातील शहरी विभागाची कशी काळजी घेते हे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘शासनाने नागरिकरणाला आव्हान न समजता संधी म्हणून स्वीकारले. केंद्र सरकारच्या सहभागातून राज्यातील १० शहरे ‘स्मार्ट शहरे’ बनवली जाणार आहेत. पायाभूत सुविधा, रोजगाराने जागतिक शहरांशी स्पर्धा करणारी ठरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कोस्टल रोड, मेट्रो रेल्वे, जलमार्गाची निर्मिती वेगाने होण्यासाठी केंद्र सरकराचे सहकार्य लाभत आहे. छोटय़ा वाहनांना टोलमुक्ती देण्यात आली आहे. पुणे व मुंबई शहराच्या सुरक्षेसाठी ऑक्टोबपर्यंत सहा हजार कॅमेरे बसवण्यात येत आहेत. नागपूर-मुंबई एक्स्प्रेस वे बनवण्यात येणार असून हा मार्ग पूर्ण झाल्यास हे ८०० कि. मी.चे अंतर १० तासांत पूर्ण केले जाऊ शकेल. त्यामुळे विदर्भातील व्यापारी मुंबईशी जोडले जाऊन दळणवळणाला वेग येईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, त्यांचे लंडन येथील घर विकत घेण्यासंदर्भात शासन प्रयत्न करत असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला. मात्र हे काम कधी पूर्ण करणार, याचा उल्लेख त्यांनी टाळला. १४ जिल्ह्यांतील शेतक-यांना अन्न सुरक्षेचा लाभ व जलयुक्त शिवार योजनेची सुरू असणारी कामे याची माहिती देताना सध्या दुष्काळात होरपळणा-या शेतक-यांसाठी काय करणार? याचा मात्र साधा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात केला नाही. एकंदर मुख्यमंत्र्यांचे भाषण शहरी लोकांना पुढे ठेवण्यात करण्यात आले होते.