बाळ सतत रडत राहिल्यास आईसुद्धा एका क्षणी दुर्लक्ष करते’ अशी कोपरखळी देत वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले की, विविध मागण्यांसाठी वारंवार संपाचे हत्यार उगारण्यात येत असल्याने मार्डच्या डॉक्टरांवरील लोकांचा विश्वास ढासळू लागला आहे.
मुंबई – ‘बाळ सतत रडत राहिल्यास आईसुद्धा एका क्षणी दुर्लक्ष करते’ अशी कोपरखळी देत वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले की, विविध मागण्यांसाठी वारंवार संपाचे हत्यार उगारण्यात येत असल्याने मार्डच्या डॉक्टरांवरील लोकांचा विश्वास ढासळू लागला आहे.
डॉक्टरांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असून भविष्यात त्यांना संप करावा लागणार नाही. मात्र, मार्डनेसुद्धा सरकारवर विश्वास ठेवून संपाचा मार्ग टाळला पाहिजे. कारण याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होतो, असा सल्लाही तावडे यांनी दिला. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मार्ड संघटनेच्या डॉक्टरांनी जे. जे. रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना तावडे यांनी आपले मत मांडले.
मार्ड डॉक्टरांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत नाही. सर्व बाजूंचा विचार करून निर्णय घ्यावा लागतो. सरकारवर तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. यातून मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. फक्त, डॉक्टरांचे सहकार्य पाहिजे. डॉक्टरांसाठी ‘अनुभूती’ शिबिर राबविण्याचा शासन विचार करत आहे. याशिवाय, तालुका पातळीवर एमबीबीएस डॉक्टरांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच आहे. ग्रामीण भागात काम करण्यास डॉक्टर तयार का होत नाहीत याबाबत विचार करण्याची वेळ आली आहे. दरम्यान, आपल्याकडे माणुसकी जपणारी माणसं आहेत. फक्त यंत्रणा बदलण्याची गरज आहे. डॉक्टरांनी अवयवदानाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी अवयवदान शिबिराचे आयोजन केले पाहिजे, असेही तावडे यांनी सांगितले.
मार्डच्या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद
स्वातंत्र्यदिनानिमित्त मध्यवर्ती मार्ड संघटनेतर्फे मुंबईतील जे.जे. रुग्णालयात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. सकाळी ९.३० वाजल्यापासून या शिबिराला सुरुवात झाल्यानंतर सायंकाळपर्यंत ११० युनिट रक्त जमा करण्यात आले. यात प्रति युनिटमागे तीन रुग्णांना जीवनदान देण्यास मदत होणार आहे. याप्रसंगी फोर्टिस रुग्णालयातील हृदयविकारतज्ज्ञ डॉ. अन्वय मुळे यांनी अवयवदानाबाबत उपस्थितांना माहिती दिली.