माणूस आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष खूप प्राचीन आहे. खरं तर या दोघांमध्ये सुसंवाद घडावा, अशी माणसांची इच्छा असते. मात्र तसं घडताना कमी वेळा दिसतं. यात बहुतेकवेळा माणसाचं जास्त आणि प्राण्यांचं देखील नुकसान होतं. आपल्या या समस्येपुढे निसर्गानेच उत्तर दिलेलं आहे.
सिंधुदुर्गातील घनदाट हिरव्यागार अरण्याने वेढलेलं एक लहानसं गाव. आजूबाजूला शेती आणि गावात नारळी-पोफळी, केळीची मुबलक झाडं. निसर्गसौंदर्यानं नटलेल्या या गावामध्ये मात्र हत्तींची खूप दहशत आहे. हत्तींच्या मोठया टोळ्या येऊन गावातील शेतीभातीचं अपरिमित नुकसान करून जातात. त्यांच्या पायदळी तुडवलं जाणारं अत्यंत कष्ट-मेहनतीने काढलेलं पीक पाहून शेतक-यांच्या पोटात खड्डा पडतो. कधीकधी एखादा एकटाच सुळेवाला येऊन दाणादाण उडवून जातो.
गोवा, कर्नाटक आणि आपल्या राज्यातील कोकणातील काही जिल्ह्यातील गावांमध्ये हत्तींपायी होणारं शेतीचं आणि जीविताचं नुकसान ही आज गंभीर समस्या बनलेली आहे. यासंदर्भात आजपर्यंत अनेक उपाय अवलंबले गेले आहेत. त्यासाठी पाळीव हत्तींची देखील मदत घेतली गेली आहे. दुर्दैवाने यापैकी काही हत्तींना प्राण देखील गमवावे लागले आहेत.
तसंच हत्तींनी केलेली नासधूस रोखताना किंवा अवचित हत्तींच्या समोर आल्यामुळे काहींचा हकनाक बळी देखील गेलेला आहे. काहींच्या अगदी घरात घुसूनदेखील हत्तींनी धान्याची वाट लावलेली आहे. कोकणातल्या गावांमध्ये हत्तींना पळवून लावण्यासाठी फटाके फोडणं, वाद्य वाजवणं असे तात्पुरते उपाय केले जातात.
जेणेकरून हत्ती आवाजाला घाबरून पळून जातील. मात्र हत्तीसारख्या अतिविशाल प्राण्यापुढे लहानसा माणून किती टिकाव धरणार? काही जण तर हत्तींनी केलेलं नुकसान उघडया डोळ्यांनी पाहतात कारण त्यांच्याशी लढण्याची ताकद आपल्यात नाही. वनखात्याकडून देखील हत्तींच्या या समस्येवर वेळोवेळी तोडगे काढण्यात आले आहेत. हत्तीपकड मोहिमा देखील अयशस्वी ठरत आहेत. दोडामार्ग, माणगाव, वैभववाडी, कुडाळ, आंबेरी, कणकवली अशा अनेक तालुक्यांमध्ये हत्तींनी ग्रामस्थांना हतबल करून टाकलेलं आहे.
हे झालं आपल्या कोकणातील चित्र. ज्यात ग्रामस्थ, वनविभाग आणि सामान्य शेतकरी हत्तींचा पिच्छा सुटावा म्हणून अथक प्रयत्नात आहेत. पूर्व आफ्रिकेतील केनयामध्ये मात्र शेतक-यांनी हत्तींपासून सुटका करून घेण्यात यश मिळवलं आहे. वास्तविक हा निसर्ग, ही पृथ्वी दोन्ही सजीवांची आहे. दोघांचाही येथे समान हक्क आहे. मात्र हत्ती कायम माणसांच्या वस्तीत घुसून धुमाकूळ घालत असल्यामुळे माणूसही हतबल ठरला आहे. जी परिस्थिती कोकणातल्या ग्रामस्थांची तीच परिस्थिती दूर तिकडे आफ्रिका खंडातील केनयाच्या शेतक-यांचीही झाली आहे.
केनया हा जगातील काही लांबलचक पसरलेल्या देशांपैकी एक आहे. इथे गवताळ कुरणांनी, विविध वनस्पती व झाडांनी भरलेली सपाटीवरची विस्तीर्ण जंगलं खूप ठिकाणी आहेत. केनयातीलच सावा सावा राष्ट्रीय उद्यानाजवळच्या काही गावांमध्ये हत्तींचं सतत येणं-जाणं असतं. केनयामध्ये जंगली हत्ती बंदिस्त नाहीत. तिथल्या राष्ट्रीय उद्यानांमधून, जंगलांमधून हे हत्ती कायम फिरत राहतात. हत्तींना रोखण्यासाठी कोणत्याही राष्ट्रीय उद्यानाने तिथे सीमा बांधलेल्या नाहीत. त्यामुळे हे हत्ती एका जंगलातून दुसरीकडे असं स्थलांतर करत राहतात. या स्थलांतरादरम्यान त्यांची मार्गक्रमणा इथल्या स्थानिकांच्या गावांमधून होते.
आफ्रिका खंडाची आíथक स्थिती पाहता या गावांतील ग्रामस्थ हे आपल्याकडच्या कोकणातील स्थानिकांपेक्षाही अधिक गरीब आहेत. त्यांची खेडी दुर्गम भागात असल्यामुळे तिथं वैद्यकीय उपचार यंत्रणाही उशिराने पोहोचतात. जगातील अनेक समाजसेवी संस्था या केनया तसंच आफ्रिकेतील खेडय़ांमधील स्थानिकांना त्यांचं जीवन अधिक सुखकर व्हावं म्हणून प्रयत्नशील असतात. अशाच एका प्रयत्नातून डिजने वर्ल्डवाईड कॉन्झव्र्हेशन फंड संस्थेने सावा नॅशनल पार्कजवळ राहणा-या या ग्रामस्थांना हत्तींच्या समस्येबाबत त्यांना मदत करण्याचं ठरवलं.
सगाला नावाच्या गावामध्ये हत्तींपासून सुटका करण्यासाठीचा प्रकल्प सुरू करण्यात आला. या गावातदेखील हत्ती वारंवार येऊन नासधूस करून जातात. आपलं वर्षभराचं पीक असं हत्तींच्या पायदळी जाताना पाहूनदेखील तिथले शेतकरी, ग्रामस्थ हे काहीच करू शकत नव्हते. त्यातही भारतीय हत्तींपेक्षा आफ्रिकन हत्ती हे उंचीने मोठे व देहयष्टीने काटक असतात. त्यांचे सुळेही भारतीय हत्तींपेक्षा मोठे असतात. अशा हत्तींच्या कळपांचा सामना माणूस करू शकत नाही. मग बळाने जे काम साध्य होणार नाही त्यासाठी बुद्धीचीच मदत घेणं अनिवार्य ठरलं.
डिजने वर्ल्डवाईड कॉन्झव्र्हेशन फंड संस्थेचे आणि डिजने अॅनिमल किंगडमचे संशोधकांनी या गावात मुक्काम ठोकला. त्यांचं लक्ष्य होतं हत्तींची ही समस्या मुळापासून निपटून काढण्याचं. सावा नॅशनल पार्कच्या परिसरात असणा-या काही गावांमध्ये त्यांनी तीन र्वष संशोधन केलं. हत्तींच्या वागण्याचा, फिरण्याचा, एकूणच जीवनशैलीचा अभ्यास केला. स्थानिक आदिवासींसमवेत फिरताना या संशोधकांच्या असं लक्षात आलं की, हिरव्या पानांनी गर्द बहरलेल्या काही झाडांकडे हत्ती ढुंकूनही पाहत नाहीत. वास्तविक केनयामध्ये खुरटी झुडपं खूप प्रमाणात असतात. तशीच गवताळ कुरणं मात्र खूप जास्त उंचीची झाडं इथे तुलनेने कमी प्रमाणात दिसतात. असं असतानाही चांगल्या हिरव्यागार झाडावरचा पाला खाण्यासाठी हत्ती का अनुत्सुक आहेत याचं कोडं संशोधकांना पडलं.
स्थानिक माहीतगारांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं की, या झाडांवर मधमाश्यांची पोळी आहेत आणि हे हत्ती मधमाश्यांना घाबरतात. त्यामुळे ते तिकडे कितीही चांगला हिरवा पाला असला तरी फिरकणारदेखील नाहीत. माहीतगारांच्या या उत्तराने संशोधकांचं काम सोप्पं झालं व समस्येचं निराकरणही झालं. ही माहिती मिळाल्यावर संशोधकांनी एक प्रयोग करण्याचं ठरवलं. त्यांनी हत्तींच्या कळपांच्या आसपास, ते चरत होते अशा ठिकाणी मधमाश्यांच्या घोंघावण्याचा आवाज रेकॉर्ड करून सुरू करून ठेवला.
हे ध्वनितरंग हत्तींपर्यंत पोहोचताक्षणीच त्यांच्या वागण्यात आकस्मिक बदल झाले. काही हत्तींनी शेपटया घाबरून उचलल्या तर काहींनी डोके हलवायला सुरुवात केली. अशा विविध हालचालींमधून त्यांनी पूर्ण कळपाला मधमाश्यांच्या अस्तित्वाची सूचना दिली. फक्त आपल्याच नव्हे तर थोडया लांबवर चरणा-या हत्तींनादेखील त्यांनी या परिसरात मधमाधा असल्याची कल्पना हुंकारांमधून दिली आणि ताबडतोब हत्तींनी चरण्याची ती जागा सोडली. ते तिथपासून धावत धावत दूरवर सुरक्षित ठिकाणी पोहोचले.
मधमाश्यांचे ध्वनितरंग जिथपर्यंत जाणवत नव्हते अशा ठिकाणी हे हत्ती निघून गेले. हत्ती मधमाश्यांना घाबरतात याची आता संशोधकांना खात्री पटली. निसर्गानेच हत्तींच्या या नसíगक संकटावर उत्तर दिलं होतं. आता हत्ती आणि मनुष्यातील सहजीवन कोणत्याही समस्येविना होणं शक्य झालं. कारण हत्तींना कोणतीही इजा न पोहोचवता संशोधकांना मानवी वस्तीपासून, शेतांपासून दूर ठेवायचे होते. तो मार्ग अवचित सापडला होता. केनयातील एका गावामध्ये अशा तऱ्हेने प्राणी आणि मनुष्य यांच्यातील विसंवादावर उत्तर सापडलं.
सगाला गावामध्ये एलिफंट अँड बीज या एनजीओतर्फे ‘सेव्ह द एलिफंट’ प्रकल्प हाती घेण्यात आला. शेताच्या भवताल कुंपण बांधण्यात आलं. कुंपणाच्या प्रत्येक खांबांवर मधुमक्षिका पालनासाठी वापरल्या जाणा-या पेटया ठेवण्यात आल्या. त्यात रितसर मधमाश्यांचं पालन सुरू करण्यात आलं. या सर्व पेटया एकमेकांना दोरीने जोडल्या गेल्या. जेणेकरून हत्तींनी कुठेही कुंपणाला धक्का लावल्यास या पेटय़ांची दारं उघडी होऊन मधमाशा त्यातून बाहेर पडू शकतील.
अन्यथा कोणाचाही धक्का न लागल्यास पेटया बंदच राहतील. इथल्या तैता, तवेटा व अनेक गावांमध्येही हा प्रकल्प पुढे राबवण्यात आला. हा प्रयोग यशस्वी झाला व हत्तींच्या शेताकडे फिरकण्यावर, त्यांच्या नासधूस करण्याला ८० टक्के आळा घालता आला. डॉ. ल्युसी किंग या प्रकल्पाच्या प्रमुख होत्या. त्यांच्या आणि डॉ. जोसेफ सॉल्टीस या डिजने अॅनिमल किंगडममधील संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प बहुतांशी यशस्वी झाला.
मधमाश्यांची घरटी असणा-या कुंपणाकडे व पर्यायाने शेताकडे हत्ती फिरकेनासे झाले. ते दूरच राहू लागले. निसर्गानेच हा उपाय सुचवला होता, तो फक्त माणसांनी अमलात आणला. अशा रितीने हत्तींना व माणसांना इजा न पोहोचवता त्यांना शेतं व घरांपासून दूर ठेवणं केनयातील एका लहानशा गावातील ग्रामस्थांनी शक्य करून दाखवलं. आज या ग्रामस्थांना मधुमक्षिका पालनाचा जोडरोजगारही उपलब्ध झाला आहे. मध, मेण व इतर वस्तू विकून त्यांना आíथक उत्पन्नही चांगलं मिळतेय.
केनयातील या गावांमधील उदाहरणामधून कोकणातील ग्रामस्थांना शिकण्यासारखे आहे. अर्थात यात काही अडचणी येऊदेखील शकतील. हत्तींना घाबरवण्यासाठी आपल्याकडील शेतकरी सौर शक्तीवर चालणारी व विजेची कुंपणं बांधतात, मिरच्यांची व तंबाखूचा धूर करतात मात्र हत्तींना पळवून लावण्यासाठी मधमाश्यांचा हा उपयोग सर्वात कमी खíचक आहे. भारतात तमिळनाडू, केरळ, उत्तरांचल, कर्नाटक, झारखंड आदी राज्यांमधील काही गावांमध्ये हा मधमाश्यांच्या पेटया असलेल्या कुंपणाचा प्रयोग यशस्वी करण्यात आलेला आहे.
कर्नाटकातील दांडेली-अंशी अभयारण्याजवळ असणा-या सुमारे ३५ गावांनी या प्रयोगाचा अवलंब करून हत्तींना शेतापासून दूर ठेवलं आहे. असाच प्रयोग केरळच्या वायनाड जिल्ह्यातील पुथडी गावातदेखील करण्यात आलेला आहे. ज्याला नाबार्ड आणि अॅग्रिकल्चरल टेक्नॉलॉजिकल मॅनेजमेंट एजन्सी ऊर्फ आत्मातर्फे सहाय्य करण्यात आलं. योग्य प्रशिक्षण घेतल्यास कोकणातील शेतक-यांची ही मोठी समस्या दूर होण्यासारखी आहे.