आयनांबर भूकंप विज्ञानाची नवी शाखा उदयाला येत असताना अनेक अनोख्या गोष्टींचा उलगडा होऊ लागलेला आहे. भूकंपाच्या आदीम शक्तीने अनेक प्रकारचे नुकसान सजीवांना सोसावे लागते. हे नुकसान टाळण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. काही प्रयत्नांना यश मिळालं आहे, तर काही सपशेल अपयशी ठरले आहेत.
भूकंप कोणत्या ठिकाणी व कोणत्या दिवशी व किती वाजता होईल याची माहिती जर देता आली तर त्याचे फायदे कशा प्रकारचे असतील याची उजळणी इथे करायची गरज नाही. जमीन फाटून निर्माण होणा-या ऊर्जेचा त्रास किती भयानक असतो याची अनुभूती जगातील अनेक ठिकाणचे सजीव घेत आहेत. हा त्रास कमी करण्यासाठी तसेच वित्तहानी टाळण्यासाठी सा-या जगात कित्येक यंत्रणा राबत आहेत.
पण ज्या भूलहरी आपल्याला नुकसान पोहोचवणा-या असतात, त्यांचा वावर फक्त भूस्तरापर्यंतच मर्यादित नसतो. त्यांचा प्रसार वातावरणातसुद्धा होत असतो. व तो कसा होतो त्याचा आढावा आपण गेल्या आठवडयातील लेखात घेतलेलाच आहे.
वैज्ञानिक जगात ‘थॉट एक्स्पेरिमेंट’ ला फार मोठे स्थान आहे. आईनस्टाईन किंवा गॅलिलिओ व इतर अनेक महान वैज्ञानिकांनी आधी आपल्या मनात तर्क लढवून त्याचा निकाल किंवा परिणाम कोणत्या प्रकारच्या असू शकतो याची चाचपणी करून अनेक मूलभूत शोध लावलेले आहेत. याच पठडीतील काही आधुनिक वैज्ञानिकांनी भूकंप घडलेल्या काही दिवस आधी व काही दिवसानंतरची आकडेवारी जमा करून त्यातून ‘मन की आँखे’ खुलतात का याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला.
ही आकडेवारी भूस्तरावर रचलेल्या भूकंपमापी यंत्रांची नव्हती तर वातावरण व आयनांवर बदलाची नोंद ठेवणा-या यंत्रांची होती. जीपीएस, आयनोसाँड किंवा इंसारसारख्या यंत्रांची आकडेवारी त्यांनी गोळा केली व त्यातून भूकंप संकेतांना शोधून काढण्याचा उपक्रम हाती घेतला.
सप्टेंबर १९९९च्या २१ तारखेला तैवान येथे एक मोठा भूकंप झाला होता. ज्याची तीव्रता (मॅग्निटय़ूड) ६ पेक्षा थोडी जास्त होती. हा भूकंप होण्याच्या काही दिवस आधी इथे पिलस किंवा प्लाझ्मा दुपारच्या वेळी कमी होत होता. असेच संकेत इतर भूकंपाच्या वेळी सुद्धा दिसून येतात का याची शहानिशा करण्यासाठी तैवानमधील ५ तीव्रतेपेक्षा जास्त तीव्रता असणा-या १८४ भूकंपांची आकडेवारी संख्याशास्त्रीय दृष्टिकोनातून तपासण्यात आली. भूकंप होताना वातावरणात व आयनांबरात कोणत्या प्रकारचे बदल घडतात. याची पडताळणी करताना त्या वैज्ञानिकांना अनेक आश्चर्यकारक माहिती हाती लागली.
आयनांबर म्हणजे आयनोस्फिअर. पृथ्वीच्या वातवरणाच्या कक्षेत साधारण १४० मीटर उंच हा स्तर असतो, जिथे सूर्याच्या ऊर्जेमुळे काही बदल घडतात. ज्या भूकंपाची तीव्रता ५.४ पेक्षा जास्त होती, त्यांच्या वेळी वातावरणात अनेक मोठे बदल घडत होते आणि हे बदल आणखी गडद व्हायचे. जेव्हा भूकंपाचे ठिकाण आयनोसाँड या उपकरणापासून १५० कि.मी. अंतरापेक्षा कमी होते. भूकंप भाकिताचे हे एक प्रकारचे संकेत आहेत असे त्या वैज्ञानिकांच्या लक्षात आले.
रशियातील काही शास्त्रज्ञांना रेडिओ बिकन यंत्रात भूकंप संबंधित काही कार्यकारणभार आढळला. रेडिओ बिकनमधून एका बाजूने आयनांबरमध्ये सिग्नल पाठवले जातात व दुस-या बाजूला आयनांबरमधून परावर्तित झालेले सिग्नल साठवले जातात. जेव्हा भूकंप होतो त्यावेळी या लहरींची तीव्रता व वारंवारता फार मोठया प्रमाणावर कमी होते. खासकरून जेव्हा भूकंप होण्याचे ठिकाण ट्रांसमिटर व रिसीव्हरच्या मध्य भागात असते तेव्हा, जपानसारख्या देशात जिथे भूकंप नित्यनेमाने होतात तिथे सुद्धा अशा प्रकारचा परस्परसंबंध दिसून आलेला आहे.
एफम रेडिओ ज्या तरंगांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतात त्याला अतिउच्च वारंवारतेच्या लहरी म्हणतात. या लहरींच्या जपानमध्ये जेव्हा अभ्यास करण्यात आला तेव्हा त्यांचा संबंध भूकंपाशी जोडण्यात त्यांना कोणतीच अडचण आली नाही. ४ पेक्षा अधिक तीव्रतेचा भूकंप होण्याआधी काही दिवस एफएम रेडिओत खरखर वाढत गेली. ही खरखर त्यांना अधिक ठिकाणी मोठया भूकंपावेळी आढळली. इथे सुद्धा अधिक एफएम रेडिओ स्थापन करायला कोणाची हरकत नसावी. भूकंपाच्या अभ्यासासाठी हे करणे आवश्यक आहे.
भारतात भारतीय भूचुंबकत्व संस्थेने या संशोधनात आता पुढाकार घेतला आहे. त्यांनी याबाबतीत योग्य ती माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. सुमात्रा भूकंपासंबंधी सारी आकडेवारी जमा केल्यानंतर त्यांच्या लक्षात काही गोष्टी आल्या. या मोठया भूकंपापूर्वी आयनांबरामध्ये काही हालचाली झाल्या ज्या सामान्यपणे होत नाहीत. पण आयनांबर भूकंप संशोधनात अनेक धोके अगदी स्वाभाविकपणे अंतर्भूत आहेत.
वातावरण ते आयनांबरच्या विशाल परिसरात अनेक रासायनिक व भौतिकिय घडामोडी घडत असतात. या घडामोडींचे साम्य भूकंपापूर्वी घडणा-या प्रक्रियांशी साध्यम्र्य साधणारे असते. त्यांची विभागणी कशा प्रकारे करता येईल व हे बदल भूकंप घडण्यापूर्वीच्याच आहेत याची खात्री पटण्यासाठी काही ठोस संकेत मिळवण्याची गरज आहे. त्यातच सूर्यावर ज्या काही विध्वंसक कारवाया होत असतात त्याचाही परिणाम आयनांबर व वातावरणावर होत असतो. वेगवेगळ्या क्रिया- प्रक्रियांचा वावर भूमिगत व अवकाशात एकत्रितपणे होत असतो. या क्रिया फक्त विशिष्ट एका कारणामुळेच होतात असे ठामपणे अजूनही सांगता येत नाही.
भूकंपाचे भाकित करणे या आधुनिक काळात किती महत्त्वाचे आहे हे आपण सारे जाणतो. त्याची आगाऊ सूचना मिळावी म्हणून सर्व प्रकारचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. ही आधुनिक शाखा आपल्याला वैज्ञानिक परिभाषेत भूकंपाला सामोरे जाण्यासाठी, सर्व हानी टाळण्यासाठी सहाय्य करेल ही अपेक्षा फोल ठरू नये.