आपला आनंद साजरा करण्यासाठी इतरांना त्रास होईल, याचे भान राहत नसल्याने अजूनही अनेक जण फटाक्यांची आतषबाजी करत असतात. पर्यावरणप्रेमींनी वेगवेगळ्या माध्यमातून केलेल्या जनजागृतीने फटाके फोडण्याचे प्रमाण कमी झाले असले, तरी या फटाकेमुक्ती मोहिमेला शंभर टक्के यश अजूनही मिळाले नाही. फटाक्यांचे दुष्परिणाम ओळखून, या वर्षीचा दीपोत्सव फटाके न फोडता आपण सारे साजरा करू या.
अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीपोत्सव सर्वानाच साजरा करायचा असतो. हा सण आता फक्त धार्मिक राहिला नाही तर आपल्या जगण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले आहे, त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा उत्सव झाला आहे. त्यासाठी आपण एक-दुस-यांना मिठाई देऊन, भेटवस्तू देऊन, व्हॉटस्अॅप, फेसबुकसह वेगवेगळ्या सोशल साइटवर शुभेच्छा देऊन साजरा करत असतो. या आनंदात फटाके फोडण्याची विकृती कुठून आली, हे शोधण्यापेक्षा फटाक्यांचा आवाज करणे म्हणजे विकृती होय, हे ध्यानात ठेवून ती हद्दपार करण्याची चळवळ प्रत्येकाच्या मनामनात आणि घराघरात पोहोचवली पाहिजे.
दिवाळीच्या दिवशी अमावस्या असते. त्यामुळे सारीकडे अंधार असतो. तो अंधार आपल्याला शहरांत जाणवतही नसतो. त्यात प्रकाश पेरावा म्हणून वेगवेगळ्या त – हा जन्माला आल्या असाव्यात. त्यात दिवे, पणत्या, आकाशकंदील लावण्यापर्यंत ठीक आहे. पण फटाके फोडून हा सण साजरा करण्याची विकृत मानसिकता गेल्या काही वर्षापासून आपला पाठलाग करू लागली आहे. या फटाक्यांमुळे अमावस्येचा अंधार दूर होत नाहीच. उलट महागडे फटाके खरेदीपासून ते आवाजाच्या प्रदूषणापर्यंत या फटाक्यांनी आपल्या दीपोत्सवातील आनंदात विरजनच घातले आहे. कानाचे पडदे फाडणारा आवाज, हृदयरुग्णांचे मरण जवळ आणणारा असतो. बालकांचा, ज्येष्ठांचा, प्राणी-पक्ष्यांचा थरकाप उडवणारा आणि प्रचंड प्रदूषणाने आपल्याला विनाशाकडे नेणारा असतो.
दिवाळीच्या दिवशी मोठया आवाजाचे फटाके उडवणा-यांना आपल्या परिसरात असणारे रुग्ण, लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध, अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांची अजिबात तमा नसते. ते उन्माद माजवतात. त्यात ते रमतात. गमतात. तल्लीन होतात. आपल्या आनंदाचा, उन्मादाचा इतरांना काय त्रास होईल, याची तमा त्यांना कधीच नसते. फटाक्यांचा आवाज जे फटाके फोडतात, त्यांना होत नसेल, तो आवाज त्यांना आनंद देत असेल पण तो आवाज अनेकांच्या कानांचे पडदे फाडणारा असतो. बहिरे करणारा असतो. लहान मुलांना रडवणारा, घाबरवणारा असतो, याची त्यांना कल्पना नसते. अनेक रुग्णांना झोपेची गरज असते. हे फटाके त्यांची झोपमोड करतात. त्यातून त्यांचा त्रास वाढतो. कुणाचा त्रास आपल्याला कमी करता येत नसेल, इथपर्यंत ठीक आहे, पण आपला उत्साह साजरा करण्याचा उन्माद कुणाच्या दु:खाचे कारण ठरू नये.
फटाके फक्त आवाजाचेच प्रदूषण करत नाहीत तर मोठया प्रमाणात वायुप्रदूषणही करत असतात. त्यातून आरोग्याची हानी होते. फटाक्यांतून मोठया प्रमाणात विषारी धूर वातावरणात पसरतो. त्याचा त्रास निरोगी असलेल्या माणसांनाही होतो. त्यातून दम्याच्या रुग्णांत वाढ होते. दिवाळीच्या दिवशी रात्री घरादारात या फटाक्यांच्या धुरामुळे गुदमरायला होते, त्याचा परिणाम आपल्या श्वसनक्रियेवर होतो. हा धूर सहन करण्याची शक्ती प्रत्येकात नसते. त्यातूनच वेगवेगळे आजार आपल्या शरीरात घर करतात. ते आपले आरोग्य विषारी करून टाकतात. याचे भान फटाके फोडणाऱ्यांनी ठेवायला हवे.
दिवाळी हा सण सुख-समृद्धी देणारा ठरला पाहिजे. आपल्याला मिळालेल्या समृद्धीतून इतरांना दिवाळखोरीकडे नेणारा हा उत्सव नसावा. काही वर्षापूर्वी आत्पस्वकीयांना फटाके भेट देण्याची एक संस्कृती होती. फटाक्यांचा दुष्परिणाम ओळखून आता फटाके भेट देण्याची पद्धत बंद पडली असली, तरी मुलांसाठी फटाके खरेदी करणा-या पालकांची संख्या मोठी आहेच. हे फटाके घातक आहेत, हे मुलांच्या मनात ठसवण्यासाठी शाळांमध्ये फटाके फोडून नये, अशी चळवळ राबवली तर ती मुलांसोबतच पालकांनाही धडा शिकवण्यासाठी महत्त्वाची ठरू शकेल. दिवाळीच्या आधी प्रत्येक शाळेमध्ये फटाकेमुक्त दिवाळीचे अभियान राबवून याविषयीची जनजागृती केली तर फटाक्यात पैसे उडवणा-या पालकांवरही त्याचा परिणाम पडू शकेल. ही मोहीम आपल्या परिसरासाठी, कुटुंबीयांसाठी, गावासाठी, राज्यासाठी आणि देशासाठी फटाकेमुक्तीचा मार्ग ठरू शकेल. त्यातून कोटय़वधी रुपये जे फटाक्यांत उडवले जातात, त्याचा फायदा इतर चांगल्या कामात लागू शकेल.
आपण फटाके फोडून दिवाळी साजरी करत असतानाच अनेकांच्या घरातील दिवे तेल नसलेल्याने पेटतच नसतात. त्याच झोपडयामध्ये आपण उडवलेले पेटते रॅकेट जाऊन, आग लागण्याच्या घटना घडतात. आपल्या आनंदात कुणाच्या झोपडया पेटव्यात, त्यांचा संसार उद्ध्वस्त व्हावा, अशी दिवाळी आपण साजरी करू नये. आपल्या कृतीतून सगळ्यांना प्रकाश मिळाला पाहिजे, सर्वाना आनंदित राहता आले पाहिजे यासाठी ज्यांच्या घरात तेलाअभावी दिवेच पेटले नसतील, त्यांच्यासाठी तेल द्या. ते दिवे पेटण्याचा आनंद हा क्षणिक राहणार असला तरी आपण केलेल्या मदतीचा प्रकाश त्यांचे आयुष्य उजळवणारा ठरू शकतो. फटाक्यांच्या आवाजाने ‘दण दण दिवाळी’ म्हणण्यापेक्षा, ‘दान देणारी दिवाळी’ साजरी करू या!