‘तायाची’ नागपंचमीवर आधारलेली ‘गीत फुगडी’ अजून माझ्या चांगली स्मरणात आहे. त्यावेळी मी पाच वर्षाचा होतो. आईसोबत तायाच्या गीत फुगडीत सामील झालो होतो. त्या दु:खमय आख्याने रात्रभर एकटाच रडत होतो. तायाने गीत फुगडी सुरू केली होती. ‘मिळून सा-याजणी’ तिला साथ देत होत्या..‘‘ एका गं राजाच्या सात जणी सुना ऽऽ ! सात जणी सुना ऽऽ ! घेतली घागर निघाल्या राना ! निघाल्या राना ।’’ राज्याच्या सुना सर्व सामान्यांच्या बायकांसारख्या घागर घेऊन कलमाची बाग शिपायला रानात कशा जातील?
तमाशा, लोकनाटय, दशावतार एवढेच काय तर गोंधळ, सोंगी भारूड आदी एक ना अनेक महाराष्ट्राच्या लोककलांना लोकमान्यतेसोबत राज्यमान्यता के व्हाच मिळाली. त्यांचे पुढारीपण मिरवणा-या अनेक कलावंतांचे शासन मान्यतेने परदेश दौरेही झाले. त्या त्या क्षेत्रातील काही वृध्द कलावंतांना मासिक निवृत्ती योजनाही मंजूर झाली, पण ब-याच लोककला तेवढयाच दर्जेदार असून अखेपर्यंत उपेक्षितच राहिल्या. त्यात प्रामुख्याने येते ‘दक्षिण कोकणात’ श्रावण महिन्यात फुलणारी गीत ‘फुगडी’.
कथेचे अनेक प्रकार आहेत प्राणीकथा, सृष्टीकथा, नीतीकथा, परीकथा एक ना अनेक त्यातील गीत कथेचा महत्त्चाचा भाग येतो त्या श्रावण फुगडीत! अगदी सुशिक्षितापासून अशिक्षितापर्यंत सर्वानाच वेड लावणा-या या ‘श्रावण फुगडया’ आमच्या बालपणी आमच्या त्या भागात प्रसिध्द होत्या. त्यात तरबेज असणारी ‘श्रावणची ताया’ अजूनही सर्वाच्या स्मरणात आहे. अगदी पहिल्या श्रावणसरी सारखीच! आमच्याच घरा शेजारी तिचे माहेर. ‘ताया’ माझ्या वडिलांच्या वयाची. लग्न होऊन आचरेपासून २०-२५ किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘श्रावण’ गावी गेलेली. म्हणून परिसरात ‘श्रावणाची ताया’ म्हणून प्रसिद्ध! हसरा गोल तेजस्वी गोरापान चेहरा. त्यावर भव्यक पाळ पट्टीवर मोठे कुं कू आणि नाकावरील भली मोठी नथ तिच्या चेह-याला अधिक च शोभा आणायची. नऊवारी साडीत श्रावणीच ताया, आम्हाला ‘सुलोचनाच’ वाटायची. तेच निरागस भाविक निर्मळ हास्य अगदी गंगेच्या पाण्यासारखे! तायाच्या कुरळया काळेभोर केसाने तिच्या हस-या चेह-याला अधिकच तेज चढायचे. सोनेरी बुगडया कानात शोभून दिसायच्या.
‘गीत फुगडी’ हा प्रकार अनेक छोटया मोठया फुगडीनंतर खास आक र्षण म्हणून सादर व्हायचा तो पाहण्यासाठी बायकांसोबत पुरूष वर्गाचीही गर्दी असायची. ‘गीत फु गडी’ म्हणजे फुगडीची अखेरची ‘टेस्ट मॅच’ असायची. श्रावण महिन्यातील छोटया मोठया फुगडया संपल्यानंतर साधारणत: ११ ते २ वाजेपर्यंत गीतफुगडीचा ‘डिमांड शो’ चाले, ‘ताया’ गाणारी, सोबत पंचवीस-तीस प्रौढ बायका मागाहून गोल फेर धरून वाकून हाताची टीचकी मारून तिला कोरस देणा-या प्रौढ. न दमता एक एक आख्यान तास तास चाले. त्यात फुगडी कार्यालयात आम्ही गणेशपुराण, पांडव प्रताप, नागपंचमी महात्म आदी एक ना अनेक विषयावर ‘ताया’ने कथन केलेल्या ‘गीत फुगडया’ ऐकल्या आहेत. अगदी पिळेतून सूत सहज निघावे अशा तिला कल्पना आणि कथा सुचत – तिच्या अशिक्षितपणात ‘‘बहिणाबाई चौधरी’’ कुठे लपून बसल्या होत्या कोणास ठावूक? त्या काळी आमच्या जिल्हयात प्रसिध्द होणारी आजच्यासारखी वर्तमानपत्रे नव्हती. नाही तर आमची ‘श्रावणची ताया’ कधीच प्रकाशझोतात आली असती. अगदी सरोजीनी बाबर, शांता शेळके आदींसोबत दूरदर्शनवर गप्पा मारण्याचे भाग्यही तिला लाभून गेले असते. पण हे अमोल व्यक्तिमत्त्व फार पूर्वीच जन्मले. अजूनही आमच्या गावात अनेकांच्या स्मरणातून ‘ताया’ गेलेली नाही.
ती श्रावण महिन्यातच चांगली आठ दिवस माहेरी यायची! तिचे माहेरपण अख्खा गावाला भावायचे. अगदी बालकवींच्या ‘श्रावणमास’ कवितेतला सर्वाना हवासा वाटणारा.
‘‘ वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कु णी भासे’’
हा चरणच माहेरी मुक्कामाला आला असे आम्हा सर्वानाच वाटे, आठ दिवसांचा (नव्हे रात्रीचा) फुगडी कार्यक्रम क्षणार्धात ठरून जायचा. मागच्या वेळी ज्या घरांना फु गडीची संधी मिळाली नाही, त्यांना प्रथम संधी दिली जायची. बाहेर धो-धो पाऊस सुरू असायचा. वातावरण शांत झालेले. बेडकांचा खर्ज एक साथ सुरू. अशा पोषक वातावरणात बायकांना कंदील दाखविण्याचे व सोबत करण्याचे निमित्त साधून गावातील प्रत्येक आबालवृध्द त्या गीत फुगडया ऐकायला जमत असत. नंतर दोन-चार दिवस त्या कथेवर चर्चा सुरू असायची. गावात करमणुकीचे अन्य साधन नव्हते. आता गाव बदलले.
आज नागपंचमीला ही अनेक गांवांप्रमाणे आमंच्या गावी ‘व्हीडीओ ’ वर चित्रपट दाखवले जातात. गावातील फुगडीही चाळीस वर्षापूर्वीच ‘ताया’ सोबतच अंतर्धान पावली. ती पुन्हा जन्मलीही नाही.. आता श्रावण आला की तायाच्या फु गडीचा ‘व्हीडीओपट’ आमची पिढी आठवू लागते.
तायाच्या काळात फुगडय़ांच्या कार्यक्र मात प्रारंभी नविन बालिकांना संधी दिली जायची. त्यांच्या गिरक्या, रिंगणे व्हायची. यानंतर धीबडा, कोंबडा, सुपाच्या फुगडया, घागरीच्या फुगडया! त्यानंतर सर्वाना हसविण्यासाठी व टेन्शन घालविण्यासाठी ठरलेले फिशपॉड.
‘‘कित्याग गो बसलस टेकून गेला ढेकून’’
‘‘कित्याग गो बसलस दूरसा गेला फूरसा’’
अशा वेगवेगळया ‘हसोळया फु गडया’. नंतर ‘तु म्हण गो, मी म्हण गो म्हणत पोक्त बायकांचा फड गीत फुगडयासाठी उभा रहायचा. सर्वाच्या आग्रहाने श्रावणाची ताया’ सम्राज्ञी सारखी त्या मेळयात सामील व्हायची. सूर निघत जायचे. मेळा फेर धरू लागायचा. रात्रीचे तीन केव्हाच वाजून गेले हे प्रत्येकाच्या कंदीलातील तेल संपल्यावर कळायचे. असे मंतरलेले दिवस होते ते !
‘तायाची’ नागपंचमीवर आधारलेली ‘गीत फुगडी’ अजून माझ्या चांगली स्मरणात आहे. त्यावेळी मी पाच वर्षाचा होतो. आई सोबत तायाच्या गीत फुगडीत सामील झालो होतो. त्या दु:खमय आख्याने रात्रभर एकटाच रडत होतो. तायाने गीत फुगडी सुरू केली होती. ‘मिळून सा-याजणी’ तिला साथ देत होत्या..
‘‘ एका ग राजाच्या सात जणी सुना ऽऽ !
सात जणी सूना ऽऽ !
घेतली घागर निघाल्या राना ! निघाल्या राना ।’’
राज्याच्या सुना सर्व सामान्यांच्या बायकां सारख्या घागर घेवुन कलमाची बाग शिपायला रानात कशा जातील? असा तार्किक प्रश्न त्यावेळी मलाच काया प्रौढांनाही पडायचा नाही. तायाला सासरी पडणारे श्रम तिने राजाच्या सुनांच्या माथी मारले होते. अगदी चपलखपण!
‘‘ आला ग चवतीचा सण । तुला ग न्यायला येतो ग कोण।
माझा ग बाप येईल। मला माहेरी नेईल।
माझा ग भाऊ येईल। मला माहेरी नेईल ।’’
अश्या प्रकारचे सहा सुना माहेरी जातात. सातवीचे माहेरी कोण नसत म्हणुन ऐन चतुर्थी दिवशीच तिला कोयता घेऊन लाकडे आणायला जंगलात जावे लागते. ती वेल म्हणुन ‘साप’ तोडते. तो नागराज तिला आपल्या नगरीत घेऊन जातो आणि पुढील नाटय परीकथेप्रमाणे त्या गीत फुगडीत ताया रंगवित गेली. सराईत निवेदीके प्रमाणे!
‘‘ घेतली कोयता कुदळ। गेली की रानी का वना।
वेल म्हणून साप तोडला। डाव्या ग हाताचा अंगठा तोडला’’
श्रावणाच्या त्या तायाचे शब्द अजूनही स्मरणात आहेत. किती संस्कार केले तिच्या गीतकथेने आमच्या बालमनावर! कसे फेडावे हे ऋण! बालनाटय क्षेत्रात वावरत असताना पंधरा वर्षापूर्वीच बालनाटय संस्कार शिबिराच्या निमित्ताने गोवा येथील कोकण कला अकादमीत जाण्याचा योग आला. दामूकाका केंकरे नंतर विनायक खेडेकर तेथे संचालक म्हणून होते. गीत कथेतून बाल एकांकिका लिहीणे वा सादर करणे असा नाटयपाठ होता. तायाच्या वरील कथेवर आम्ही ‘देवपरी’ ही एकांकिका उत्कृष्ट नेपथ्य, प्रकाश योजनेच्या सहाय्याने लिहून सादर केली. सर्वाना आवडली. कौतुकही बहुत झाले पण ते सारे श्रेय श्रावणच्या तायाचे होते..इंदम् न मम्!
श्रावणची ताया देवावर देखील बंडखोरीच्या गीत कथा सादर करायची. त्यावेळी ताया खरी विद्रोही व आधुनिक विचाराची वाटायची. देवाला सांगताना ‘आम्ही तुमची एवढी पूजा करतो, गंध लावतो, अत्तराने आंघोळ घालतो, तुमची पत्नी तरी हे लाड करते का? असा खडा सवाल प्रत्यक्ष देवालाच विचारणारी तिची फुगडी असायची?
‘‘धनीच्या घरी जाश्या
देवानो थंड पाणी न्हाश्या’’
अशी होती आमची ताया तिच्या रंगतदार फुगडया. मालवणी भाषा सोडून अन्यभाषा न जाणणारी आणि अक्षराचा स्पर्शही न झालेली ही आमची ‘श्रावणची ताया’ माझ्या दृष्टीने खूप काही होती, नव्हे घनभरा श्रावणच होती.
खरंच! आपले व्यक्तिमत्त्व घडत असताना अनेक ज्ञात ज्योतीचा प्रकाश आपणास मिळत जातो आणि आम्ही घडत जातो. त्यातून उतराई तरी कसे होणार! सर्वच अशक्य.
दिपज्योती नमोस्तुते!