बॅँकेत खाते असणे, ही काळाची गरज आहे. बॅँक निवडण्याबाबत अनेक जण अज्ञान असतात. बॅँकांनी केलेल्या जाहिरातबाजीला भुलून अनेकजण खाती उघडतात. आपल्या पैशाची सुरक्षितता जपणे हे प्रत्येक खातेदाराचे पहिले कर्तव्य आहे. त्यामुळे बॅँकेत खाते उघडण्याआधी बॅँकेची आर्थिक क्षमता आणि विविध योजनांची जागरूकपणे माहिती घ्यावी.
आपण मोठे कष्ट करून कमवलेला पै न पै सुरक्षितपणे राहण्यासाठी आपण ते बॅँकेत ठेवतो. बॅँकेत पैसे ठेवल्याने ते सुरक्षित राहण्याबरोबरच त्यावर आपल्याला व्याजही मिळते. आपल्या सर्व व्यवहारात पारदर्शकताही राहते. तसेच इतरांना पैसे देण्यासाठी धनादेश, एनइएफटी, मुदत ठेवी, कर्ज आदी सुविधा बॅँकामार्फत मिळत असतात. आता बँकेत बचत खाते असणे ही आता एक अत्यावश्यक बाब समजली जात आहे. प्रत्येक बँक खातेदारांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन कल्पना राबवित असते. काही बँका आकर्षक व्याज देऊ करतात तर काही विम्याचे संरक्षण देऊ करतात. पतपेढय़ाही याचप्रकारे जाहिराती करीत असतात. त्यांच्या मुदत ठेवींच्या विविध योजनाही खातेदाराला भुरळ पाडतात. अशा वेळेला संभाव्य खातेदाराला प्रश्न पडतो की, कोणत्या बँकेत खाते उघडावे? पतपेढीत खाते उघडावे का? यासाठी पुढील काही गोष्टी नीट लक्षात घेणे जरुरीचे आहे.
पतपेढय़ा जरी ठेवी गोळा करीत असल्या तरी त्यांना पूर्णपणे बँक म्हणता येणार नाही. त्या सर्वसाधारणपणे ११ ते १२ टक्के वार्षिक व्याज देतात. हे व्याजदर आकर्षक वाटत असले तरी ते देऊ करण्यासाठी पुरेसा फायदा मिळवणे व त्यासाठी योग्य प्रकारे कर्जे देणे, गुंतवणूक करणे आवश्यक ठरते. बहुतांशी पतपेढय़ांमध्ये यासाठी लागणारे प्रशिक्षित किंवा व्यावसायिक मनुष्यबळ नसते. तसेच त्यांचा कारभार ब-याच प्रमाणावर एकहाती चालतो. त्यामुळे पतपेढय़ांमध्ये आर्थिक घोटाळे होण्याची शक्यता वाढते. याचा परिणाम किंवा दुष्परिणाम म्हणजे कालांतराने कर्ज वसुली कमी होत होत बंद पडते. केलेली गुंतवणूक अपेक्षित परतावा देत नाही. त्यामुळे ठेवींवर व्याज देणे मुश्कील होते. बचत खातेधारकांना पैसे देणे मुश्कील होते आणि या पतपेढय़ा बंद पडतात. ठेवीदारांचे खूप नुकसान होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पतपेढय़ांमधील ठेवींना विम्याचे संरक्षण नाही!
जी गोष्ट पतपेढय़ांची तीच काही प्रमाणात बिगर शेडय़ूल्ड सहकारी बँकांची. काही अपवाद आहेत. पण, ते अगदी मोजके. गेल्या काही वर्षात पेण अर्बन, कोकण प्रांत, रुपी आणि अगदी अलीकडे सीकेपी या सहकारी बँकांवर गंडांतर आले. रिझव्र्ह बँकेने त्यांचे व्यवहार थांबवले आणि ठेवीदारांच्या हालांना पारावार उरला नाही. त्यांना सहा महिन्यातून केवळ एकदा १ हजार रुपये रोख रक्कम काढता येईल. या बँकांना जरी १ रुपयांच्या लाखाच्या ठेवींपर्यंत विमा संरक्षण असले तरी ते अत्यल्प आहे. शिवाय तेवढी रक्कम मिळेपर्यंत किती वर्षे लागतील? याचा काही भरवसा नाही. त्यामुळे केवळ व्याज जास्त मिळते, व्यवहारांची वेळ आपल्या सोयीची आहे, सदर बँक किंवा पतपेढी आपल्या घराच्या जवळ आहे, या कारणास्तव अशा ठिकाणी खाते उघडू नये. कारण या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेऊन मुंबई ग्राहक पंचायतीने हा प्रश्न धसास लावण्याचे ठरवले आहे.
सध्याच्या वातावरणात खाते उघडण्यासाठी सर्वात सुरक्षित पर्याय म्हणजे सरकारी बँका. या बॅँकांमध्ये व्याज थोडे कमी असले तरी आपले पैसे सुरक्षित असतात. सर्व सरकारी बँकांनी कोअर बँकिंग प्रणाली अवलंबल्यामुळे कोणत्याही शाखेतून कोणतेही व्यवहार प्रत्यक्ष अथवा इंटरनेटमार्फत करणे सुलभ झाले आहे. या बँकांवर रिझव्र्ह बँकेचा अंकुशही चांगल्या प्रमाणात आहे. एखादा वाचक म्हणेल की, सरकारी बँकात गैरव्यवहार होत नाहीत का? पैशांची अफरातफर होत नाही का? हो, या गोष्टी घडतात. पण, या बँका बुडत नाहीत कारण त्यांना सरकारचे भक्कम आर्थिक पाठबळ आहे.
निवृत्त होणारे अनेकजण निवृत्तीनंतर मिळणारा भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युईटी इत्यादी रक्कम जास्त व्याजदराच्या हव्यासापोटी किंवा इतर काही प्रलोभनापोटी एकाच पतपेढीत किंवा बँकेत ठेवतात. हेसुद्धा योग्य नव्हे. अशा प्रकारे मिळालेली रक्कम विविध ठिकाणी गुंतवावी. म्हणजे एका ठिकाणी काही अडचण निर्माण झाली तर दुसरा आर्थिक स्रेत उपलब्ध असतो.
सरकारी बँकेतील मुदतठेव सर्वात सुरक्षित समजली जाते. आपण एखादी मुदत ठेव ठेवली असेल तर तिच्यावरील सर्व तपशील नीट तपासून पहावा. खास करून बँकेचे नाव तपासून घ्यावे. याचे कारण असे की, काही बँकांच्या उपकंपन्यांही ठेवी स्वीकारत असतात आणि आपला समज होतो की, बँक आणि ही उपकंपनी एकच आहे. अशा उपकंपन्या म्युच्युअल फंडांच्या योजना, मेडिक्लेम किंवा अपघात विमा यासारख्या योजनाही राबवतात व त्यांची सांगड आपल्या बँक खात्याशी घातली जाते. उदा. एखादी बँक अशी जाहिरात करते की, ‘आमच्या बँकेत खाते उघडले तर १ लाख रुपयांपर्यंतच्या अपघात विम्याचे संरक्षण मिळेल,’ किंवा ‘आमच्या खातेदारांना अमुक तमूक एका म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करताना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही’, इत्यादी. या योजना धोकादायकच असतात असे नाही. परंतु, त्यांचा लाभ घेण्याआधी संपूर्ण माहिती जाणून घ्यावी. त्याचे फायदे काय, तोटे कोणते ? हे माहीत असणे आवश्यक आहे. कारण बँका या योजनांची फक्त विक्री करीत असतात. प्रत्यक्ष व्यवहार दुस-या कंपनीतर्फे पाहिले जातात.
बॅँकेची योजना खातेदारांना न समजल्यास किंवा त्यांना न कळल्यास किंवा शंका असल्यास नि:संकोचपणे बँकेच्या अधिका-याशी संपर्क साधावा व तिचे निराकरण समाधानकारक करून घ्यावे. शेवटी आपले खाते हे आपल्या मालकीचे आहे. आपण परिश्रम करून मिळवलेले पैसे सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. कारण बॅँकेतील आपल्या पैशाची जबाबदारी बँकेबरोबरच आपलीही आहे, हे ध्यानात ठेवावे.