तांदूळ व काजू खरेदीच्या नावाखाली बॅँक ऑफ बडोदातून ६ हजार कोटी परदेशात हस्तांतरित केल्याप्रकरणाचे गूढ वाढत चालले असून सीबीआयने रविवारी ५० ठिकाणी छापे मारले असून काही संशयितांची चौकशी सुरू केली आहे.
नवी दिल्ली – तांदूळ व काजू खरेदीच्या नावाखाली बॅँक ऑफ बडोदातून ६ हजार कोटी परदेशात हस्तांतरित केल्याप्रकरणाचे गूढ वाढत चालले असून सीबीआयने रविवारी ५० ठिकाणी छापे मारले असून काही संशयितांची चौकशी सुरू केली आहे.
सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले की, भारतात तांदूळ, काजू व अन्य पदार्थ आयात झाल्याचे दाखवून ५९ कंपन्यांच्या खात्यातून परदेशात पैसे हस्तांतरित केले आहेत. यासाठी बनावट पत्त्यांचा वापर करण्यात आला. या प्रकरणातील प्रमुख संशयितांची ओळख पटली असून त्यांची सीबीआय मुख्यालयात चौकशी करण्यात आली.
सीबीआयने या प्रकरणी फौजदारी कट, फसवणूक, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ५९ चालू खातेधारकांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
५९ चालू खातेधारकांनी आणि या बॅँकेच्या काही खातेदारांनी कट करून परदेशात निधी पाठवला आहे. विशेषत: हा सर्व पैसा हॉँगकॉँगला पाठवला आहे. यासाठी ६ हजार कोटी रुपयांचे परकीय चलन वापरण्यात आले.
हे सर्व पैसे बॅँकेची मार्गदर्शक तत्त्वे धाब्यावर बसवून करण्यात आले, असे सीबीआयने नोंदवलेल्या तक्रारीत म्हटले आहे. अंमलबजावणी संचालनालयानेही या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून विविध ठिकाणी छापे मारले आहेत.
दरम्यान, कॉँग्रेसचे प्रवक्ते आर. पी. एन. सिंग म्हणाले की, या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. काजू, कडधान्य व तांदूळ खरेदी करून हॉँगकॉँगला पैसे पाठवणे ही बाब आश्चर्यजनक आहे. बॅँकेने सुरू केली चौकशी ल्लीच्या अशोक विहार शाखेतून ८ हजार व्यवहारांबाबत संशय व्यक्त झाल्यानंतर बॅँकेने अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. हॉँगकॉँगवरून काजू, तांदूळ खरेदीसाठी आम्ही आगाऊ पैसे पाठवल्याचा दावा या खातेदारांनी केला. हे पैसे परदेशात पाठवताना ते टप्प्याटप्प्याने पाठवले गेले.
कारण एक लाख डॉलर्सपेक्षा अधिक रक्कम पाठवल्यास त्याची माहिती स्वयंचलित यंत्रणेद्वारे दिसत असते. त्यामुळे या खातेदारांनी टप्प्याटप्याने पैसे पाठवून या यंत्रणेपासून स्वत:चा बचाव केला. ही सर्व ५९ खाती कंपनीच्या नावावर उघडली असून त्याचे पत्तेही बनावट आहेत. त्यानंतर या खात्यांमध्ये पैसे भरून ते परदेशात पाठवले गेले, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.