बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील ४९ जागांसाठी सोमवारी ५७ टक्के मतदान झाले.
पाटना- भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि नितीश-लालू काँग्रेस यांच्या महाआघाडीसाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील ४९ जागांसाठी सोमवारी ५७ टक्के मतदान झाले.
१० जिल्ह्यातील एकूण ४९ विधानसभा मतदानसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. दुपारी दोन वाजेपर्यंत ४४ टक्के मतदान झाले होते. पाच टप्प्यातील विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा आज झाला. सर्व मतदारसंघात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मात्र जुमई येथे दोन गटांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये काहीजण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
पहिल्या टप्प्यातील ४९ जागांसाठी ५८३ उमेदवार रिंगणात असून, यात ५४ महिला आहेत.
तेरा मतदारसंघ वगळता अन्य ३६ मतदारसंघांमध्ये सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. तेरा मतदारसंघ नक्षलग्रस्त भागांमध्ये असल्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा विचार करुन मतदानाची वेळ एक ते दोन तास कमी ठेवण्यात आली होती.