आपल्या आजूबाजूला दररोज कुणी न कुणी कंटाळा आला, असं म्हणताना आढळतंच. या कंटाळ्याचीपण गंमत असते. आपल्या दिनचर्येत थोडा जरी बदल केला तरी हा कंटाळा कुठल्या कुठं पळून जातो. लग्न नवीन असो की जुनं, त्यात तोचतोपणा कधीही येऊ शकतो. गरज असते ती आयुष्यात सतत काही छोटे-मोठे बदल घडवून आणण्याची आणि आत्मसात करण्याची! रस्त्यावर फुलं विकणारे जसं त्यांच्याकडची फुलं ताजीतवानी राहण्यासाठी वेळोवेळी त्यावर पाणी शिंपडतात, तशाच ताजं करणा-या शिंतोडय़ांची आपल्या दैनंदिन जीवनालाही आवश्यकता असते.
आपल्यासोबत असं अनेकदा होतं, एखादी गोष्ट सतत करत राहिली की त्यातलं नावीन्य संपतं आणि आपल्याला ती गोष्ट कितीही चांगली असली तरी कालांतराने तिचा कंटाळा येतो. ‘किप इट इंटरेस्टिंग टू किप इट अलाइव्ह’ असं म्हटलं जातं ते उगीच नाही. अर्थात एखाद्या गोष्टीतली मजा कायम म्हणजेच जिवंत ठेवण्यासाठी त्यातलं नावीन्य टिकवून ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग तो अभ्यास असो, काम असो किंवा अगदी कुठलंही नातं असो. ज्याप्रमाणे कामाच्या ठिकाणी आपण कामाच्या पद्धतींत वेगवेगळे प्रयोग केले, नावीन्य आणत राहिलो तर कामाची मजा वाढते आणि तोचतोपणा येऊन कंटाळा येत नाही. त्याचप्रमाणे संसार करतानाही हेच सूत्र आत्मसात करणं योग्य आहे. संगणकावर काम करताना नाही का तो फार अडकू लागला किंवा हँग झाला की आपण रिफ्रेश करतो, अगदी तसंच नात्यांनाही ताजंतवानं ठेवण्यासाठी रिफ्रेश करत राहावं लागतं यावर माझा पूर्ण विश्वास आहे.
ही संकल्पना कदाचित माझ्या आधीच्या पिढीला समजायला किंवा समजून घ्यायला कठीण जाईल कारण नात्यांमधला तोचतोपणा किंवा रिफ्रेश वगरे करण्याची त्यांनी कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल. पण आमच्या पिढीची एक फार मोठी समस्या आहे, आजार आहे असं म्हटलं तरी चालेल. आम्हाला कुठल्याही गोष्टीचा कालांतराने कंटाळा येऊ लागतो. मग त्या वापरत्या वस्तू असोत किंवा नोक-या. आमच्या घरी मी किंवा माझ्या बहिणीने कधीही नोकरी बदलण्याचा विषय काढला कीआमचे बाबा वैतागायचे. एका जागी टिकताच येत नाही तुम्हाला, असं म्हणायचे. पण ३० र्वष एका बँकेत निष्ठेनं नोकरी केलेल्या माझ्या बाबांच्या पिढीला हे पटवून घेणं कठीण आहे की आमच्या पिढीला नोकरीतील स्थैर्यापेक्षा कामाचं समाधान (ज्याला आपण जॉब सॅटिसफॅक्शन म्हणतो) अधिक महत्त्वाचं वाटतं. आज निम्म्याहून अधिक तरुणांचं नोकरी बदलण्यामागे हेच कारण असतं. नोकरीच कशाला पण इतर गोष्टी जसं मोबाइल, बाइक्स, हॅण्डबॅग्ज, हेअरकट, नेलपेंट, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड असं सगळं सगळं आम्ही काही कालावधीने बदलतच असतो. एवढंच कशाला, आपल्या घरात नजर फिरवली तरी लक्षात येतं की आई, सासूबाईंनी त्यांच्या कित्येक जुन्या वस्तू इतक्या जपून वापरलेल्या असतात की त्या आजही व्यवस्थित कार्यरत असतात. याउलट आमच्या वस्तू मात्र जास्तीत जास्त चार-पाच वर्ष टिकतात आणि टिकल्या तरी त्या बदलून नवीन घेण्याची इच्छा काही वर्षानंतर होतेच. ‘जुने जाऊ द्या मरणा लागूनी, जाळूनी किंवा पुरूनी टाका’ ही उक्ती आम्ही शब्दश: अमलात आणतो.
आता तुम्ही म्हणाल, हे सगळं मी काय सांगत बसलेय. तर हे सगळं सांगण्यामागचा हेतू एवढाच की एखाद्या गोष्टीचा पटकन कंटाळा येणा-या आमच्या पिढीसाठी लग्न आणि संसार या गोष्टी करणं आणि निभावणं म्हणजे खरंच मोठं आव्हान म्हटलं पाहिजे. कारण सगळ्याच गोष्टी कालांतराने बदलता येत नसतात, हे आम्हाला लग्नानंतर जास्त प्रकर्षाने जाणवू लागतं. माझी एक मैत्रीण कॉलेजमध्ये असताना नेहमी म्हणायची, ‘बाप रे, एकाच माणसासोबत अख्खं आयुष्य कसं काय काढतात लोक?’ आम्हाला तेव्हा तिच्या या बोलण्याची फार गंमत वाटायची पण आज ती लग्न करून, एका मुलाची आई होऊन गेली पाच र्वष सुखाने संसार करतेय या गोष्टीची आम्हाला जास्त गंमत वाटते.
कुठलीही गोष्ट किंवा वस्तू सतत एकाच स्थितीत ठेवल्याने एक तर तिला गंज लागून ती निकामी होते किंवा ती अस्तित्वात असल्या-नसल्याचा फरक पडणं कमी होऊन जातं. नात्यांचही असंच असतं. श्वास घेण्यासाठी हवा जितकी आवश्यक आहे तितकीच कुठल्याही प्रकारची नाती अखंड सुखानं नांदण्यासाठी त्यांच्यात हवा खेळती राहणं अत्यावश्यक आहे. म्हणूनच आपल्या आजूबाजूच्या, जवळच्या नात्यांना सतत प्राणवायू देत राहणं गरजेचं असतं. विशेषत: नवरा-बायकोच्या नात्यावर काही कालावधीनंतर जमणारी धूळ वेळोवेळी फुंकर मारून साफ करत राहता आली पाहिजे. माझं लग्न तर धूळ जमण्यासाठी खूपच नवीन आहे पण आतापासूनच काही अशा गोष्टींची आम्ही सवय लावून घेत आहोत जेणेकरून पुढं कंटाळा येण्याचे प्रसंग क्वचितच उद्भवतील.
उदाहरणार्थ सांगायचं तर, आमचं लग्न डिसेंबरच्या १३ तारखेला झालं त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या १३ तारखेला आम्ही एकमेकांना काहीतरी भेटवस्तू देतो. कधीतरी खूप मोठी तर कधी छोटुशीच पण भेट न चुकता देतोच. पूर्ण महिनाभरात एकमेकांना कुठल्या वस्तूची आवश्यकता आहे याचा आम्ही अंदाज घेतो, मात्र प्रत्यक्षात काय भेट मिळणार याचा उलगडा १३ तारखेलाच होतो. यामुळे काय होतं की या महिन्यात कुठली वस्तू द्यायची हे ठरवण्यासाठी निरीक्षण आणि संशोधन सुरू होतं, त्यात वेळ मस्त जातो. त्यासोबत आपल्याला या महिन्यात काय मिळणार याची उत्सुकता असते, शिवाय एकमेकांना समजून घेण्याची उत्तम संधीही असते. रुटीनचा कंटाळा आला आणि खूप दिवस आपल्यात काहीच संवाद झाला नाही असं वाटलं की आम्ही एखादी छोटीशी पिकनिक करून येतो, ते शक्य झालं नाही तर आठवडय़ाच्या सुट्टीच्या दिवशी भरपूर गप्पा मारता येतील असा काहीतरी कार्यक्रम ठरवतो. याखेरीज छोटी-मोठी सरप्राईजेस आम्ही एकमेकांना देतच असतो. या छोटय़ा-छोटय़ा गोष्टी आपल्या दैनंदिन आयुष्यातला ‘कंटाळा’ दूर करण्यासाठी खरंच खूप फायदेशीर ठरतात.
आता तुम्ही म्हणाल, नवीन नवीन आहे सगळं तेव्हा मजा वाटणारच, आणखी एक वर्षाने हेच सगळं कायम राहतंय का ते बघू! खरं सांगायचं तर आम्ही हे अनेक जणांकडून ऐकलंय. पुढे कदाचित असं होणं शक्यही आहे पण म्हणून असं होतंच असा काही नियम नाही. परवाची गोष्ट सांगते. आम्ही असेच एका छोटय़ाशा पिझ्झा कॉर्नरमध्ये संध्याकाळी काहीतरी खाण्यासाठी गेलो होतो. तिथे एक सत्तर-पंच्याहत्तरीतलं जोडपं आलं आणि त्यांनी प्रत्येक पिझ्झाची व्यवस्थित माहिती घेऊन शेवटी मेक्सिकन पिझ्झाची ऑर्डर दिली आणि त्याचा मनसोक्त आनंद घेतला. चालतानाही त्रास होणारं ते जोडपं केवळ चेंज म्हणून पिझ्झा खायला आलं होतं. हे पाहिल्यावर मला असं वाटलं की आपण उगीचच वयाचा आणि आपल्यावरच्या जबाबदा-यांचा बाऊ करत बसतो.
जबाबदा-या प्रत्येकावरच असतात. पण स्वत:ला आणि आपल्या प्रियजनांना आनंदी ठेवण्याची जबाबदारी सगळ्यात मोठी आहे. सतत अभ्यासासाठी मागे लागणारे आई-बाबा जेव्हा अचानक एखाद्या संध्याकाळी मुलाला फिरायला घेऊन जातात, ऑफिस-घर अशी तारेवरची कसरत करणा-या बायकोला जेव्हा नवरा अचानक एखाद्या दिवशी सिनेमा किंवा नाटक बघायला नेतो, रोज एकटेच मॉìनग वॉकला जाणा-या बाबांना जेव्हा कधीतरी आपण सोबत करतो आणि त्यांच्या आवडीच्या विषयांवर गप्पा मारतो, संध्याकाळच्या जेवणाला काय बनवायचं असा प्रश्न दररोज पडलेल्या आईला आपण एखाद् दिवस जेवायला बाहेर घेऊन जातो तेव्हा त्या बदलातून मिळणारा आनंद मन उल्हसित करतं आणि दुस-या दिवशीपासून तेच रुटीन पाळण्यासाठी आवश्यक उत्साह देतं. दैनंदिन आयुष्यात असे छोटे-मोठे बदल करून तर पाहा, हे नक्की सुखावह ठरतील याची खात्री आहे.