सध्या सावंतवाडीच्या बाजारपेठेत विविध रानभाज्यांची खरेदी करण्यासाठी शहरी ग्राहक मोठय़ा प्रमाणात येत असल्याचे चित्र आहे.
कोलगाव- पावसाळा आला की रानभाज्यांना बहर येतो. पावसाळ्यात बाजारपेठेतील चित्रही पालटून जाते. मासेमारीचा हंगाम संपतो. चढणीचे मासे आणि खेकडे मोठय़ा प्रमाणात बाजारपेठेत येतात. रोजच्या भाज्या आहेतच. त्यात रानभाज्याही पावसाळी हंगामात बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल होतात. सध्या सावंतवाडीच्या बाजारपेठेत विविध रानभाज्यांची खरेदी करण्यासाठी शहरी ग्राहक मोठय़ा प्रमाणात येत असल्याचे चित्र आहे.
जसा हंगाम बदलतो तसे कोकणी माणसाच्या जीवनातील खाद्यपदार्थ बदलतात. कारण हा बदल निसर्गानेही स्वीकारलेला असतो. पावसाळी हंगामात मासेमारी बंद होते आणि ताटातील मासळीची जागा चढणीच्या माशांबरोबर रानभाज्या घेतात. टाकळा, कुर्डू, चिवारकोंब, कणकीचे कोंब, भारंगी, घोटवेल अशा विविध भाज्या कोकणी माणसाला निसर्गातून उपलब्ध होतात. निसर्ग हा नेहमी काहीतरी देतच असतो.
उन्हाळी हंगाम हा धावपळ आणि लगबगीच्या कामामध्ये जातो. या काळात शरीराच्या वाढीसाठी आवश्यक घामावाटे निघून जातात. यामुळे पावसाळय़ातील शेतींच्या कामांसाठी शेतक-याला पुन्हा भाज्यांच्या रूपाने ताकद मिळते. निसर्गातील विविध भाज्या कॅल्शियम, लोह ही जीवनावश्यक प्रथिने देतात.
या हंगामी भाज्यांकडे ग्रामीण भागातील कष्टकरी महिला आपले रोजगाराचे साधन म्हणून बघत आहेत. सध्या सावंतवाडीच्या बाजारात चिवारकोंब आणि कणकीचे कोंब खवय्यांचे विशेष आकर्षण आहे. या कोंबांची भाजी थोडी कडू असली तरी जेवणात वेगळाच स्वाद देऊन जाते. काही दिवसातच कुडय़ाच्या शेंगाही बाजारपेठेत दाखल होतील. पावसाळय़ाच्या सुरुवातीला दुषित पाण्यामुळे जंत व कृमी होण्याचे प्रमाण मानवी शरीरात वाढते. त्यामुळे अपचनासारखे आजार होतात.
कृमी आणि जंत मानवी शरीरात जाणा-या अन्न घटकातील शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असणारे रस शोषून घेतात. त्यामुळे कितीही खाल्ले तरी मानवी शरीराचे पोषण होत नाही. परंतु, कुडय़ाची भाजी खाल्यानंतर कृमी आणि जंत पोटातून नाहीसे होण्यास मदत होते. कुडय़ाच्या शेंगांच्या भाजीकडे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून औषधी भाजी म्हणूनच पाहिले जाते. अशा शरीराला पोषक ठरणा-या विविध प्रकारच्या भाज्या असून त्या आता पावसाळा हंगाम सुरू झाल्यानंतर बाजारपेठेत दाखल होऊ लागल्या आहेत. यावर खवय्यांच्या उडय़ा पडताना दिसत आहेत.