बारामती तालुक्यात पाणीटंचाईचे सावट गडद होऊ लागले आहे. जिरायती भागात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चा-याचा प्रश्न गंभीर बनत आहे.
बारामती- बारामती तालुक्यात पाणीटंचाईचे सावट गडद होऊ लागले आहे. जिरायती भागात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चा-याचा प्रश्न गंभीर बनत आहे. तालुक्यात सध्या सात गावांसह ८२ वाड्यावस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पंचायत समितीने संभाव्य ५५ गावांसाठीचा टंचाई आराखडा जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतक-यांमधून होत आहे.
तालुक्यातील सुमारे १९ गावांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. एकूण २० हजार ३०० लोकसंख्येसाठी १४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्याचबरोबर जानेवारी ते जून २०१३ या कालावधीतील संभाव्य ५५ गावे ३०७ वाड्यावस्त्यांवर पाणीटंचाई जाणवणार असल्याचे टंचाई आराखड्यात नमूद करण्यात आले आहे.
आराखड्यामध्ये जानेवारी ते मार्च दरम्यान तालुक्यात सहा ठिकाणी प्रगतिपथावर असलेल्या पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यास सुचविण्यात आले आहे. शिवाय १३ ठिकाणच्या नळ पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीची कामे सुचविण्यात आली आहेत. डोर्लेवाडी अंतर्गत घोडेवस्ती, भोसलेवस्ती, करंजेपूल (गायकवाड मळा) चौधरवाडी, चोपडज (पांढरेवस्ती), क-हावागज, जळगाव सुपे, मोराळवाडी, पणदरे येथील नळ पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. तसेच, तालुक्यात ७३ ठिकाणी नव्याने विंधन विहिरींसह १९ ठिकाणी नादुरुस्त असलेल्या विंधन विहिरींची दुरुस्ती सुचविण्यात आली आहे. तर तालुक्यात सहा ठिकाणी विहीर अधिग्रहण करणे, दोन ठिकाणी तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजना करणे या कामांचा आराखड्यात समावेश करण्यात आला आहे.
आराखड्यात एप्रिल ते जून २०१३ मध्ये महिन्याच्या तिसऱ्या टप्प्यातदेखील ५५ गावे, ३०७ वाड्यांवर टँकरची आवश्यकता भासणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, तालुक्यातील ४८ ठिकाणांचा सव्र्हे भूजल विभागाने विंधन विहिरीसाठी केला आहे. या विंधन विहिरी मंजूर होऊन, त्याचे काम लवकर पूर्ण झाल्यास पाणीटंचाईवर मात करणे शक्य होणार असल्याचे मत पंचायत समिती सूत्रांनी व्यक्त केले आहे.
टँकरने पाणीपुरवठा होणारी गावे
तालुक्यातील ब-हाणपूर, साबळेवाडी, सावंतवाडी, भिलारवाडी, जळकेवाडी, क-हावागज, सायंबाचीवाडी, लोणी भापकर, मोढवे, जोगवडी, रुई, कटफळ, गाडीखेल, मोराळवाडी, आंबी खुर्द, वंजारवाडी गावठाण, सावळ गावठाण, गोजुबावी, चोपडज, जराडवाडी, मोरगाव आदी ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.