कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी सरकराने उपाययोजना करावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
मुंबई- मेळघाटात कुपोषणामुळे आत्तापर्यंत चार हजार बालमृत्यू झाले असून, केवळ नंदूरबारमध्ये एप्रिल २०१२ ते जानेवारी २०१३पर्यंत एक ते सहा वयोगटातील एक हजार बालकांचे मृत्यू झाले आहेत.
या घटना रोखण्यासाठी राज्य सरकारने त्याबद्दल अभ्यास करून ठोस उपाय करण्याची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्यां पुर्णिमा उपाध्याय यांनी ही याचिका केली आहे. त्याची सुनावणी जूनमध्ये होणार आहे.
कुपोषणामुळे मृत्यू टाळण्यासाठी गडचिरोलीत ५६१ आणि ठाणे जिल्ह्यासाठी ६१२ उपचार केंद्रे आहेत. या केंद्रांवर तातडीने होणा-या उपचारांमुळे मुले बचावण्याचे प्रमाण ७० ते ८० टक्के होते पण ते आता १६ टक्क्यांवर आले आहे. तर नंदूरबार आणि अमरावती येथे ते प्रमाण अनुक्रमे १४ ते ३५ टक्के आहे, असे याचिकेत म्हटले आहे.
हे बालमृत्यू रोखण्यासाठी सरकारने त्याचा अभ्यास करावा आणि उपाययोजना करावी, असे निर्देश सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. धनंजय चंद्रचूड यांनी दिले.