कोणत्याही एका वक्तव्याने नव्हे तर बिहारचे गणित आम्हाला न समजल्याने भाजपाचा दारूण पराभव झाल्याची कबुली भाजपाचे ज्येष्ठ नेते अरूण जेटली यांनी दिली.
नवी दिल्ली- कोणत्याही एका वक्तव्याने नव्हे तर बिहारचे गणित आम्हाला न समजल्याने भाजपाचा विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव झाल्याची कबुली भाजपाचे ज्येष्ठ नेते अरूण जेटली यांनी दिली.
बिहार विधानसभेत झालेल्या दारुण पराभवानंतर सोमवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी माध्यमांसमोर ही कबुली दिली. सरसंघचालक मोहन भागवतांच्या वक्तव्यामुळे पराभव झाल्याचा आरोप त्यांनी सपशेल फेटाळला. शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर कारवाईबाबत प्रश्न विचारण्यात आला असता या बैठकीत त्यावर चर्चा झाली नसल्याचे ते म्हणाले.
बैठकीला भाजपाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यासह अन्य वरिष्ठ नेते उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी पराभवामागच्या विविध कारणांचा शोध घेत आहे. भाजपा उणीवा दूर करण्याचा प्रयत्न करेल, तसेच बिहारमध्ये सशक्त विरोधी पक्षाची भूमिका आम्ही पार पाडू, असेही त्यांनी सांगितले.
तसेच बिहारला केंद्र सरकार संपूर्ण सहकार्य करणार असून बिहारसाठी जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजवर या पराभवाचा विपरीत परिणाम होणार नाही, याची ग्वाहीही जेटली यांनी दिली.