बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये जागावाटपाचे सूत्र निश्चित झाले आहे.
नवी दिल्ली – बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये जागावाटपाचे सूत्र निश्चित झाले आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी सोमवारी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन जागावाटप जाहीर केले.
बिहारमध्ये भाजपा सर्वाधिक १६० जागा लढवणार आहे. रामविलास पासवान यांचा लोकजनशक्ती पक्ष ४०, आरएसएलपी २३ आणि माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी आवाम मोर्चासाठी वीस जागा सोडण्यात आल्या आहेत. हे जागा वाटप जाहीर होत असताना घटक पक्षाचे नेतेही पत्रकारपरिषदेला उपस्थित होते.
भाजप प्रणीत रालोअ दोन तृतीयांश जागा जिंकेल असा दावा शहा यांनी केला. जागावाटप जाहीर करण्यापूर्वी अमित शहा यांनी जीतन राम मांझी यांच्याशी चर्चा केली. मांझी यांच्या पक्षाच्या वाटयाला कमी जागा आल्याने ते नाराज आहेत.
त्याआधी शहा यांनी एलजेपीचे सर्वेसर्वा रामविलास पासवान, राष्ट्रीय लोकसमता पक्षाचे प्रमुख उपेंद्र कुशवाह यांच्याशी चर्चा केली. बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. १२ ऑक्टोंबरला मतदानाचा पहिला टप्पा होईल. पाच नोव्हेंबरला शेवटचा टप्पा आणि आठ नोव्हेंबरला मतमोजणी होईल.