बंडखोर मुख्यमंत्री जीतन राम मांझी आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार नितीश कुमार दोघांनी आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केला आहे.
पाटणा- बिहारच्या राजकारणात मुख्यमंत्रीपदाच्या गादीवरुन सत्तासंघर्ष तीव्र झाला आहे. सोमवारी विद्यमान बंडखोर मुख्यमंत्री जीतन राम मांझी आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार नितीश कुमार यांनी राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेतली.
दोघांनी आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता सगळे लक्ष राज्यपालांच्या निर्णयाकडे लागले आहे.
विधानसभेत बहुमत सिध्द करण्यासाठी गुप्त मतदान घ्यावे अशी मागणी मांझी यांनी केली आहे. मी राज्यपालांना विनंती करतो त्यांनी बहुमत सिध्द करण्यासाठी मला एक तारीख द्यावी. मी १९, २० किंवा २३ फेब्रुवारीला बहुमत सिध्द करण्यास तयार आहे. मी सभागृहाचा नेता असून, बहुमत सिध्द करण्यास तयार आहे असे मांझी यांनी सांगितले.
नितीश कुमार यांची जदयूच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी झालेली निवड बेकायद असल्याचे माझी म्हणाले. दुसरीकडे नितीश कुमार यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर राजभवनाच्या प्रवेशव्दारावर पत्रकारांशी बोलताना सरकार स्थापनेसाठी आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केला. सरकार स्थापनेसाठी आवश्यक बहुमत आमच्याकडे आहे. राज्यपालांनी आम्हाला सरकार स्थापनेसाठी बोलवले नाही तर, आम्ही राष्ट्रपतींची भेट घेऊ असे नितीश कुमार यांनी सांगितले.
निर्णय घ्यायला विलंब केला तर, घोडेबाजाराला ऊत येईल असे नितीश कुमार म्हणाले. जनता दल यूनायटेडच्या शिष्टमंडळाने नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनवण्यासाठी १३० आमदारांची पाठिंब्याची पत्रे रविवारी राजभवनात दिली तसेच आवश्यकता पडल्यास राज्यपालांसमोर १३० आमदारांची परेडही करू, असे नितीश कुमार यांनी सांगितले. जेडीयुचे अध्यक्ष शरद यादव, आरजेडीचे प्रमुख लालुप्रसाद आणि नितीश कुमार या तिघांनी एकत्र राज्यपालांची भेट घेतली.