बीएसएनएलच्या नेटवर्कसाठी अत्यावश्यक असलेली ‘सुमा’ ही कार्ड यंत्रणाच बंद पडल्याचा फटका बीएसएनएलला सहन करावा लागत आहे.
रत्नागिरी – बीएसएनएलच्या नेटवर्कसाठी अत्यावश्यक असलेली ‘सुमा’ ही कार्ड यंत्रणाच बंद पडल्याचा फटका बीएसएनएलला सहन करावा लागत आहे. ही कार्ड यंत्रणा बंद पडल्यामुळे बीएसएनएलचे जिल्ह्यातील तब्बल २३ टॉवर बंद आहेत. याचा परिणाम बीएसएनएलच्या सेवेवर झाला असून, याचा फटका ७५ हजारांहून अधिक ग्राहकांना बसला आहे.
टेलिफोन यंत्रणा कालबाह्य ठरत असताना मोबाईलधारकांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. मोबाईलचा वापर वाढत असताना बीएसएनएलसह इतर खासगी कंपन्याही जिल्ह्यात आपले जाळे पसरवत आहेत. परंतु, खासगी कंपन्यांकडे न वळता ग्राहक बीएसएनएलला पसंती देताना दिसत आहेत.
खासगी कंपन्यांची सेवा महागडी ठरत असल्याने कमी खर्चात आणि सोयीची ठरणारी बीएसएनएल सेवा घेण्याकडे अनेकांचा कल आहे. बीएसएनएल सेवेकडे ग्राहकांचा कल वाढत असताना अनेकदा पोहोचण्यापलीकडे जाणा-या या सेवेला बहुतांश ग्राहक वैतागले आहेत. अनेक ग्राहकांनी तर बीएसएनएलची सेवा सोडून इतर कंपन्यांची सेवा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यात सध्या अनेक गावांत बीएसएनएलची सेवा डबघाईला आली असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील वांद्री, आगवे, चरवेली, आडवली, शृंगारतली, खेड, बाणकोट, चिपळूण, आंबवली, देवरूख, निवे या ठिकाणी बीएसएनएल सेवेचा तर पुरता बोजवारा उडाला आहे. सद्यस्थितीत बीएसएनएलचे २ लाख १२ हजार मोबाईलधारक तर ४५ हजार लँडलाइनधारक आहेत.
ग्राहकांपर्यंत बीएसएनएल सेवा विनाखंडित पोहोचावी यासाठी बीएसएनएलने जिल्ह्यात एकूण १९४ टॉवर उभे केले आहेत. परंतु बीएसएनएल ग्राहकांची संख्या लक्षात घेता सद्यस्थितील टॉवर अपुरे असून, आणखी ११० टॉवरची आवश्यकता असताना बीएसएनएलने बंद अवस्थेतील टॉवर दुरुस्त करण्याकडे दुर्लक्षच केले आहे. बंद पडलेल्या टॉवरसह बीएसएनएलचे ५०हून अधिक टॉवरमधील कार्ड यंत्रणा कालबाह्य झाल्याने बंद पडले आहेत.
बीएसएनएलच्या टॉवरना नियंत्रित करण्याचे काम ‘सुमा’ कार्ड करते. हे कार्ड बंद पडल्याने २३ टॉवरचा कारभारच ठप्प झाला आहे. मागील तीन महिन्यांपासून या कार्डची मागणी करूनही ही कार्ड अद्याप उपलब्ध झालेली नाहीत. सुमा कार्ड बंद झाल्याने याचा फटका बीएसएनएलच्या ७५ हजार ग्राहकांना बसला आहे.