मुंबईतील सर्वात जुन्या असलेल्या बीडीडी (बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट) चाळी सध्या पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत.
मुंबई – मुंबईतील सर्वात जुन्या असलेल्या बीडीडी (बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट) चाळी सध्या पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. सर्वात जुन्या तरीही भक्कम बांधकाम असलेल्या या चाळींची दुरवस्था झाली आहे. या चाळी दुरुस्त करण्यासाठी अनेक वेळा तक्रार करूनही पैशांअभावी दुरुस्ती करता येत नाही, असे शासनातर्फे सांगण्यात येते आणि विकासकाकडेही या चाळी सुपूर्द न केल्यामुळे रहिवाशांचे जिणे कठीण झाले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाकडे पैशासाठी अनेकवेळा प्रस्ताव पाठवले. परंतु पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याची खात्याचीच तक्रार आहे. रहिवाशांच्या सहनशीलतेने आता सीमा ओलांडली आहे. त्यामुळे विभागाने वेळीच दखल न घेतल्यास रहिवाशांचा कोणत्याही क्षणी उद्रेक होण्याची शक्यता आहे. या चाळीतील रहिवाशांना वाढीव जागा द्यावी, अशी मागणी रहिवाशांनी केली.
वरळी, नायगाव, डिलाइल रोड आणि शिवडी या परिसरात बीडीडी चाळी आहेत. ब्रिटिशांनी १९२० मध्ये या चाळींचे बांधकाम सुरू केले. एकूण २०७ बीडीडी चाळींपैकी वरळीत सर्वात जास्त म्हणजे १२१ चाळी आहेत. प्रत्येक चाळीत ८० खोल्या आहेत. १२ बाय १५ म्हणजेच १८० चौरस फुटांच्या खोलीत अनेक कुटुंब वर्षानुवर्षे राहत आहेत. ब्रिटिशांनी बांधलेल्या या खोल्या कैद्यांसाठी असल्याची आख्यायिका असली तरी कामगारांना डोळ्यापुढे ठेवून घरे देण्याची कल्पना असल्याचे येथील काही ज्येष्ठ नागरिकांनी ‘प्रहार’ला सांगितले. येत्या काही वर्षात ‘शंभरी’ पूर्ण करणा-या या चाळींना सध्या मदतीची गरज आहे. भक्कम बांधकाम असलेल्या या चाळींना समस्यांचे ग्रहणच लागले आहे. वरळीच्या सर्वच बीडीडी चाळींमध्ये सांडपाण्याच्या प्रश्न आहे.
दोन चाळींत असलेल्या जागेतून सांडपाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था आहे. मात्र, यामुळे चाळीच्या प्रवेशद्वारासमोर कचरा आणि घाण साठते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई केली जात नाही. वरळीच्या बीडीडी चाळीत साफसफाई करण्यासाठी सफाई कामगारांची वानवा आहे. चार दिवसांतून एकदाच हजेरी लावणा-या या कर्मचा-यांवर कोणाचाही अंकुश नाही. चाळीतील स्वच्छतागृहांची अवस्थाही बिकट आहे. सफाई कामगारांना सर्व सुविधा देऊनही त्यांच्याकडून कामचुकारपणा केला जात असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला. त्यामुळे स्वच्छतेची सर्व खबरदारी येथील रहिवाशी स्वत:च्या खिशातून करतात. ‘स्वच्छता अभियाना’चे धडे देणा-यांनी बीडीडीकडे लक्ष द्यावे, अशी विनंती येथील रहिवाशांनी ‘प्रहार’कडे केली.
अनेक चाळींच्या आतील भागात भिंतीचे, छप्पराचे पापुद्रे निघाले आहेत. तसेच पिण्याचे पाणी सर्वच मजल्यांवर आणि घरांपर्यंत पोहोचवण्यासाठी रहिवाशांना कसरत करावी लागत आहे आदि तक्रारींचा पाढाच बीडीडीतील रहिवाशांनी ‘प्रहार’कडे वाचला. मुर्दाड झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला धडा शिकवण्याची वेळ आल्याचे रहिवाशांनी सांगितले.
नात्यांची गुंफण
बीडीडी म्हणजे नात्यांची गुंफण आहे. लोप पावत चाललेल्या एकत्रित कुटुंब पद्धतीचा आविष्कार बीडीडीत दिसतो. १२ बाय १५च्या खोलीत अनेक कुटुंब एकत्रित राहत आहेत. या चाळीने अनेक संसार आणि अनेक मोठया व्यक्ती घडवल्याचे ज्येष्ठ नागरिक आवर्जून सांगतात. आम्हाला आमची बीडीडी चाळ चांगली करून द्या, अशी मागणीच येथील रहिवाशांनी केली.