भारतीय बॅडमिंटन क्षेत्रात गेली जवळपास सहा वर्षे महिलांचा दबदबा होता. सायना नेहवाल, पी. सिंधू, ज्वाला गुत्ता, अश्विनी पोनप्पा यांनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भारतासाठी गौरवास्पद कामगिरी करून दाखवली. पण पुरुषांच्या विभागात परिस्थिती फारशी आशादायक वाटत नव्हती. वास्तविक पूर्वी प्रकाश पडुकोण, सय्यद मोदी, पुलेला गोपिचंद यांनी पुरुषांचे बॅडमिंटन गाजवले. ती परंपरा पुसली जातेय की काय असे वाटत असतानाच पारुपल्ली कश्यपचा उदय झाला ही सुखद बाब म्हणावी लागेल. त्याने ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये पुरुष विभागात सुवर्णपदक जिंकले.
भारतीय बॅडमिंटन क्षेत्रात गेली जवळपास सहा वर्षे महिलांचा दबदबा होता. सायना नेहवाल, पी. सिंधू, ज्वाला गुत्ता, अश्विनी पोनप्पा यांनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भारतासाठी गौरवास्पद कामगिरी करून दाखवली. पण पुरुषांच्या विभागात परिस्थिती फारशी आशादायक वाटत नव्हती. वास्तविक पूर्वी प्रकाश पडुकोण, सय्यद मोदी, पुलेला गोपिचंद यांनी पुरुषांचे बॅडमिंटन गाजवले. ती परंपरा पुसली जातेय की काय असे वाटत असतानाच पारुपल्ली कश्यपचा उदय झाला ही सुखद बाब म्हणावी लागेल. त्याने ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये पुरुष विभागात सुवर्णपदक जिंकले.
तब्बल ३२ वर्षानी एखाद्या भारतीय पुरुषाने या स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. सिंगापूरच्या डेरेक वाँगला त्याने तीन सेट्समध्ये हरवून अंतिम लढत जिंकली हे केवळ काही शब्दांचे वर्णन झाले. प्रत्यक्षात येथवर येण्यासाठी त्याने कोणकोणत्या अडचणींवर मात केलीये हे कळाल्यावर त्याच्याविषयीचा आदर दुणावतो.
२०११मध्ये सिंगापूर ओपन खेळत असताना त्याला त्याच्या बहिणीविषयीची दु:खद बातमी समजली. त्याच्या थोरल्या बहिणीने आत्महत्या केली होती. तिच्यावर त्याचा खूप जीव होता. त्या घटनेनंतर कश्यप खूप दु:खीकष्टी झाला होता. यातून तो बाहेर येईल की नाही, अशी शंका त्याचे प्रशिक्षक पुलेला गोपिचंद यांना वाटू लागली होती. पण दोनच वर्षानी श्रीनगरमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने अजिंक्यपद पटकवले आणि पुन्हा एकदा कमबॅक केला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. २०१२मध्ये लंडन ऑलिंपिकमध्ये कश्यपने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक मारली. त्या टप्प्यावर त्याला चीनच्या अव्वल सीडेड ली चाँग वेईने हरवले.
कश्यपने अत्यंत कष्टाने येथवर मजल मारली आहे. त्याच्या खेळात ताकदीपेक्षा नजाकत असते. त्यामुळे त्याचा खेळ पाहणे ही रसिकांसाठी पर्वणी ठरते. या पूर्वी १९८२च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सय्यद मोदी यांनी सुवर्णपदक पटकवले होते. त्यांच्यानंतर हा मान कश्यपने पटकवला आहे. लवकरच तो पडुकोण आणि गोपिचंद यांच्याप्रमाणेच ऑल इंग्लंड स्पर्धाही जिंकेल, अशी आशा करता येईल.