बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमध्ये एप्रिलपासून दारूबंदी करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटणे सुरूच आहे.
मुंबई- बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमध्ये एप्रिलपासून दारूबंदी करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटणे सुरूच आहे. आता राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाच्या एका आमदाराने दारूबंदीसाठी हाळी देत थेट मुख्यमंत्र्यांचे दार ठोठावले आहे.
भाजपाचे नागपूर जिल्हा काटोळ मतदारसंघातील आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना केलेल्या पत्रव्यवहारात संपूर्ण राज्यात दारूबंदीची मागणी केली आहे.
मात्र दुसरीकडे दारू विक्रीतून मिळणारा सुमारे १८ हजार कोटींचा महसूल बुडेल, असे सांगत उत्पादन शुल्कमंत्री सांगत एकनाथ खडसे यांनी राज्यात दारूबंदीस नकार दर्शवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खडसे यांच्या निर्णयावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे. मुख्यमंत्री दारूबंदीचा निर्णय घेऊन खडसे यांची कोंडी करतील, असे आडाखेही बांधले जात आहेत.
बिहार सरकार १ एप्रिल, २०१६ पासून राज्यात दारूबंदी करणार आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही दारूबंदी व्हावी म्हणून अनेक सामाजिक संघटनांनी मोर्चेबांधणी केली आहे. भाजपाचे आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दारूबंदीसाठी पुढाकार घेतल्याने राज्यातील सरकारमध्येच आलबेल सुरू असल्याची चर्चा आहे.
मात्र अवघ्या दोन दिवसांपूर्वीच राज्यात दारूबंदी केल्यास सुमारे १८ हजार कोटींच्या महसुलावर पाणी सोडावे लागेल, या भीतीपोटी दारूबंदीच्या निर्णयाला आधीच राज्य उत्पादन शुल्कमंत्री एकनाथ खडसे यांनी केराची टोपली दाखवली होती.