विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी अनेक धक्कादायक निकाल दिले असतानाच जनतेने भाजपलाही एक आगळावेगळा धक्का दिला आहे.
कणकवली- विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी अनेक धक्कादायक निकाल दिले असतानाच जनतेने भाजपलाही एक आगळावेगळा धक्का दिला आहे. या निवडणुकीत कोकणातील चार जिल्ह्यात मिळून भाजपचा एकही आमदार निवडून आला नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षात प्रथमच कोकणातून भाजपला विधानसभेत आमदाराविना प्रतिनिधित्व करणे शक्य होणार नाही. विशेष म्हणजे प्रचंड खर्च करून आणि सारी यंत्रणा कामाला लावून घेतलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या सभाही वाया गेल्या आहेत. यावरून कोकणातील जनतेवर मोदी लाटेची जादू नाही. हे पुन्हा दिसून आले.
यापूर्वी देवगडमधून आप्पासाहेब गोगटे आणि गुहागरमधून डॉ. विनय नातू यांचे विजय होत आले. ही दोन्ही ठिकाणे भाजपसाठी बालेकिल्ला होती. सन २००९ च्या निवडणुकीत मतदारसंघ पुनर्रचनेचा फटका बसून विनय नातूंना शिवसेनेच्या रामदास कदम यांच्यासाठी गुहागर सोडावा लागेल. अशी स्थिती निर्माण झाली. ऐनवेळी त्यांनी श्रीधर सेना स्थापन करून युती विरोधात बंडखोरी केली होती. मात्र यामुळे सरळसरळ मतविभाजन झाले आाणि कदमांसह नातू देखील पराभूत झाले. तर देवगड म्हणजे आताच्या कणकवली – वैभववाडी – देवगड मतदारसंघाची जागा भाजपने आपल्याकडे राखण्यात काठावरचे ३४ मतांचे यश मिळवले होते. मात्र ताज्या निकालांत या दोन्ही जागा भाजपला जिंकता आल्या नाहीत. गुहागरातून विनय नातू पराभूत झाले. तर कणकवली मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार नितेश राणे यांनी प्रमोद जठार यांचा पराभव करताना २५,९७९ एवढय़ा मतांची आघाडी घेतली.
निवडणूक जाहीर झाली आणि कणकवली मतदारसंघात युतीसह मोदी लाटेवर स्वार होण्याची स्वप्ने रंगवत आ. जठार यांनी ‘अब की बार ३४ हजार’ अशी हाक दिली होती. मात्र राज्यस्तरावर भाजपच्या नेतेमंडळींनी ऐनवेळी युती तोडण्याचा निर्णय घेतला. एका अर्थाने हा निर्णय स्थानिक पातळीवर जठार यांच्या मुळावर आला. अशातच नितेश राणे यांनीही मतदारसंघात मोठा संपर्क राखताना विशेषत: युवा मतदारांना आपलेसे केले.
हा धडाका सुरू असताना पराभवाची जाणीव झाल्याने जठार यांनी अनेक क्लुप्त्या वापरून पाहिल्या. मात्र त्यातूनही यश येणार नाही. हे लक्षात येताच ‘३४ हजार’ची हाक हवेतच विरली आणि मग मते मिळवण्यासाठी आटापिटा सुरू झाला. एवढे सगळे करूनही निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान मोदी यांची सभा त्यांनी कासार्डेत लावून आपले ‘वजन’ दाखवण्याचाही प्रयत्न केला. मोदींनी रत्नागिरीत, पालघर येथेही सभा घेतल्या होत्या. पंतप्रधान पदी विराजमान व्यक्ती अनेक वर्षानी कोकणवासीयांच्या भेटीला येऊनही येथील जनतेने मात्र त्यांची साद ऐकली नाही. साहजिकच भाजप एकही उमेदवार निवडून आला नाही आणि भाजपच्या पदरात कोकणातून भोपळा पडला.