अमेरिकेने पाकिस्तानला ८ एफ १६ लढाऊ विमाने विकण्याचा निर्णय घेऊन भारताच्या जखमेवर मीठ चोळले आहे. हा विमानांचा व्यवहार जवळपास ७० कोटी डॉलरचा आहे. अमेरिकेने पाकिस्तानला ही विमाने देताना भारताशी संबंध सुधारण्यासाठी आणि दहशतवादी गटांविरोधात कारवाई करण्यासाठी ही मदत आहे, असा जो खुलासा केला आहे तो हास्यास्पदच नव्हे तर संतापजनकही आहे.
भारत व पाकिस्तान नैसर्गिक शत्रू आहेत. त्यापैकी एकाला लढाऊ विमाने देऊन संबंध सुधारता कसे येतील, हे अमेरिकेने जगाला सांगणे आवश्यक आहे. त्यामुळे भारताने संतापून अमेरिकेचे भारतातील राजदूत रिचर्ड वर्मा यांना बोलावून आपली नापसंती व्यक्त केली, हे योग्य झाले. खरे तर अमेरिका-पाकिस्तान यांच्यातील संबंधांच्या इतिहासाची ज्यांना कल्पना आहे, त्यांना याबद्दल आश्चर्य वाटणार नाही. कारण अगदी शीतयुद्धाच्या काळापासूनच अमेरिकेला भारताबद्दल द्वेष आणि पाकिस्तानबद्दल प्रचंड प्रेम आहे. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी अमेरिकेपुढे न झुकण्याचा योग्य निर्णय घेतला होता. भारत-रशिया यांच्यातील संबंध तेव्हापासून मजबूत होते आणि त्याचा राग आजही अमेरिका विसरलेली नाही. भारताला शह म्हणून अमेरिकेने पाकिस्तानला सातत्याने जवळचा मित्र मानले आहे. अगदी रिचर्ड निक्सन अध्यक्ष असतानापासून अमेरिकेचे हेच धोरण राहिले आहे. बांगलादेश युद्धात तर अमेरिकेने सरळ सरळ पाकिस्तानची बाजू घेतली होती. पाकिस्तानी सैनिक बांगलादेशीयांची नृशंस हत्या करत असताना रिचर्ड निक्सन आणि त्यांचे परराष्ट्र मंत्री हेन्री किसिंजर यांनी तर पाकिस्तानला उघड पाठिंबा दिला होता. इतकेच नव्हे तर भारतीय सैन्य पाकिस्तानवर वरचढ होत असल्याचे पाहून अमेरिकन आरमार भारतीय सीमेवर आणून ठेवले होते. इंदिरा गांधी यांनी अमेरिकेची ही आगळीक कधीच माफ केली नाही.
मात्र तेव्हाही अमेरिकेच्या भारत द्वेषाचे निर्लज्ज प्रत्यंतर जगाला घडवले होते. त्यानंतरच्या प्रत्येक अध्यक्षांनी मग तो जिमी कार्टर असो की रोनाल्ड रिगन किंवा सीनियर आणि ज्युनियर बुश, पाकिस्तानला मदत देण्याचे धोरणच राबवले आहे. आताही एफ १६ विमाने पाकिस्तानला देऊन भारताविरुद्ध एकप्रकारे चिथावणी देण्याचे कामच अमेरिकेने केले आहे. अमेरिकेच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानला दहशतवादाविरोधात कारवाई करण्यासाठी ही विमाने दिली गेली आहेत. पाळण्यातले पोरही यावर विश्वास ठेवणार नाही. पाकिस्तानचे काळेकुट्ट पूर्वकर्तृत्व ज्यांना माहीत आहे, त्यांना या मदतीचा उपयोग भारतविरोधी कारवाया करण्यासाठीच पाकिस्तान करणार, हे माहीतच आहे. एकीकडे पठाणकोट हल्ल्यामुळे भारताची जखम चिघळली असताना आणि पाकिस्तान मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचे ढोंग करत असताना अमेरिकेने ही मदत देऊन एकप्रकारे पाकिस्तानला भारतविरोधी कारवायांसाठी प्रोत्साहनच दिले आहे. पाकिस्तानात पंतप्रधान नवाज शरीफ यांना काडीचीही किंमत नाही. त्यामुळे त्यांच्या दहशतवाद्यांवरील कारवाईच्या देखाव्याला कुणीच भुलणार नाही. लष्करप्रमुख राहील शरीफ यांचेच वर्चस्व आहे. राहील शरीफ हे कडवे भारतविरोधी आहेत. तसे त्यांच्या लष्करप्रमुखाला असावेच लागते. त्यात अमेरिकेने हे कोलित दिले आहे. अमेरिकेकडून मिळणार असलेल्या या विमानांचा उपयोग भारतातील लक्ष्यांवर केला जाणार, यात काडीमात्र संदेह नाही. त्यामुळेच भारताने हे प्रकरण वॉशिंग्टन येथे ओबामा प्रशासनाकडे उपस्थित करण्याचे ठरवले आहे.
अमेरिकेचा दुटप्पीपणा असा की, एकीकडे अमेरिकेला भारतातील स्वस्त मनुष्यबळ त्यांच्या आयटी उद्योगासाठी हवे आहे. त्याच वेळेस भारत महासत्ता म्हणून वरचढ होऊ नये म्हणून पाकिस्तानला सक्षम करण्याचे राजकारणही अमेरिकेला खेळायचे आहे. तीच भूमिका दुसरा लबाड शत्रू चीनचीही आहे. पाकिस्तानी सरकारच्या मांडीवर बसून भारतात विध्वंसक आणि भयानक कारवाया करणा-या दहशतवादी गटांना पाकिस्तानी सरकार कशी मदत करत आहे, याचे असंख्य पुरावे भारताने अमेरिकेला दिलेले असतानाही अमेरिकेचा निर्णय म्हणजे भारताच्या मनसुब्यांवर कुठाराघात आहे. डेव्हिड हेडली हा दहशतवादी एकीकडे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि लष्करी अधिकारी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यांना कसे प्रायोजित करत होते, याचा बुरखा टराटरा फाडत असतानाच अमेरिकेला मात्र याची काहीही पर्वा असू नये, याचे कारण अमेरिकेच्या मजबुरीत दडले आहे. अमेरिकेला भारताची भीती वाटते. भारत विकासाच्या प्रगतिपथावर आहे (आणि यात मोदी सरकारचे काहीही श्रेय नाही.) त्याचे दडपण अमेरिकेने घेतले आहे. त्यातूनच अमेरिकेने आपल्या सिनेटमधील सदस्यांचा विरोध पत्करूनही पाकिस्तानला विमाने विकण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेच्या या निर्णयात मोदी सरकारचे अपयशही ठळकपणे समोर आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीच्या आधी प्रचारात मनमोहन सरकारवर बोटचेपेपणाचे धोरण घेतल्याचा आरोप विखारी शैलीत करत असत. सत्तेवर आल्यावर मात्र याच मोदींनी शरीफ यांच्यासाठी पायघडय़ा घातल्या. मनमोहन निदान अचानक न कळवता शरीफ यांच्या गळ्यात गळे घालायला अफगाणिस्तानातून वाकडी वाट करून पाकिस्तानला गेले तरी नव्हते. याच मोदी महाशयांनी अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामा भारतात आले असताना त्यांचा बराक असा एकेरी उल्लेख करून आपल्या मैत्रीचे ‘प्रदर्शन’ केले होते. आता त्या मैत्रीचा दुष्परिणामच समोर आला आहे.
ओबामांनी मोदी यांच्या मैत्रीला आपण काडीइतकीही किंमत देत नाही, हेच दाखवून दिले आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना भारतविरोधी कारवायांसाठी सर्वतोपरी मदत कशी करत आहे, याबाबत अमेरिकेची खात्री पटवण्यात भाजपाच्या सरकारातील मुत्सद्दय़ांना साफ अपयश आले आहे, हेही यानिमित्ताने समोर आले आहे. उलट अमेरिकन सिनेटर टेड पोई आणि तुलसी गॅब्बार्ड यांना पाकिस्तान अमेरिकेकडून मदत घेऊन तिचा वापर भारतविरोधी कारवायांसाठी करत आहे, याची प्रखर जाणीव ओबामा प्रशासनाला करून दिली आहे. त्यांनी तसे पत्रही दस्तुरखुद्द ओबामा यांनाच लिहिले आहे. पठाणकोट हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी गटाचा असलेला हात आणि मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हफीझ सईद याची प्रक्षोभक भाषणे हाच पाकिस्तानच्या भारतद्वेषाचा पुरावा आहे, असे त्यांनी म्हटले आहे. हे भारतातील कुणी म्हणत नाही तर अमेरिकेतील सिनेटर म्हणत आहेत, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
मोदी-शरीफ मैत्रीचे गुणगान गाण्यात माध्यमांत स्पर्धा लागली होती. आता भारत-पाकिस्तान यांच्यात जणू मधुर संबंधांचे पर्व अवतरणार, असे वातावरण तयार केले गेले. असाच उन्मादी आविष्कार वाजपेयी पाकिस्तानला बस घेऊन गेले, तेव्हाही व्यक्त झाला होता. त्यानंतर काहीच काळात कारगीलचे युद्ध झाले. त्याचीच पुनरावृत्ती म्हणजे एफ १६ विमान करार आहे. काँग्रेसवर पाकिस्तान धार्जिणेपणाचा आरोप करणा-या भाजपाच्या राजकीय मुत्सद्यांचा हा पराभव तर आहेच, परंतु आज इतक्या वर्षानंतरही पुलाखालून काहीच पाणी वाहून गेलेले नाही, हेही सिद्ध झाले आहे.