भारताच्या ‘मंगळयाना’वर मिथेनच्या शोधासाठी खास प्रणाली बसवल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या मंगळयान मोहीमेवर लागले आहे.
बंगळूरू- पृथ्वीवरील लोकसंख्या वाढू लागल्याने मंगळावर वस्ती करता येईल का ? यावर अनेक वर्षापासून शास्त्रज्ञांमध्ये चर्चा सुरू आहे. त्या दृष्टीने शास्त्रज्ञ प्रयत्नशील आहे. यासाठी मंगळ ग्रहावरील वातावरणात मिथेन वायूचा शोध घेण्यात येत आहे. भारताच्या ‘मंगळयाना’वर मिथेनच्या शोधासाठी खास प्रणाली बसवल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या मंगळयान मोहीमेवर लागले आहे.
‘मंगळा’वर पुढील आठवडयात अमेरिकेचे ‘मार्स अॅटमॉसफिअर अँड वोलाटाइल इव्होल्यूशन’ (माव्हेन) आणि भारताचे ‘मार्स आर्बिटर मिशन’ (एमओएम) प्रवेश करणार आहेत. अमेरिकेचे यान २१ सप्टेंबरला तर भारताचे यान २४ सप्टेंबरला प्रवेश करेल. अमेरिकेचे यान मंगळाच्या वातावरणातील सर्वात वरच्या स्तराचा आणि सूर्य व सौर वा-यांचा होणारा परिणाम याचा अभ्यास केला जाईल.
भारतीय ‘मंगळयान’ हे मंगळावरील मिथेनचा बारकाईने शोध घेणार आहे. त्यामुळे मंगळावर जीवसृष्टी होती की नाही याबाबतचा पुरावा मिळू शकेल. नासाने पाठवलेले ‘क्युरिओसिटी’ हे यान मिथेनचा शोध घेण्यात अपयशी ठरले.
इस्त्रोच्या अंतराळ केंद्राचे सहाय्यक संचालक ए. एस. किरण कुमार यांनी या यानासाठी लागणारे ‘मिथेन सेन्सर्स’ तयार केले आहेत. हे सेन्सर्स मंगळावरील मिथेनचा शोध घेणार आहे. त्याचे प्रमाण शोधण्याची क्षमताही या यंत्रणेत आहे.
आंतरराष्ट्रीय अंतराळ शोध सहसमन्वय गटाचा भारत हा सदस्य आहे. या गटाचेही भारताच्या मोहीमेकडे लक्ष आहे. भारताचे मंगळयान मंगळाच्या कक्षेत शिरल्यानंतर मिथेनचे मोठे कोडे उलगडण्यास मदत मिळू शकेल.
भविष्यात मंगळावर मानव पाठवण्याचे नासाने ठरवले आहे. त्यावर नासाने सांगितले की, पृथ्वी व मंगळाची उत्पत्तीबाबत दोन्ही ग्रहांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात येणार आहे. मंगळावरील वातावरण हे जीवसृष्टीला पोषक होते. भविष्यात त्या दृष्टीने अभ्यास करण्यात येणार आहे. त्यामुळे पृथ्वीच्या बाहेर अन्य ग्रहांवर जीवसृष्टी होती का ? याचे कोडे उलगडू शकेल.