देशाच्या अंतराळ संशोधन क्षेत्रात क्रांतिकारक ठरणा-या मंगळ मोहिमेची या वर्षी सुरुवात होणार आहे. मात्र, मैलाचा दगड ठरणा-या या मोहिमेबाबत काही क्षेत्रांतून टीकेचा सूरही उमटत आहे. या पार्श्वभूमीवर ही मोहीम केवळ देशाची मान उंचावण्यासाठी नसून अतिशय महत्त्वाच्या संशोधनासाठी असल्याचे इस्रोचे अध्यक्ष के. राधाकृष्णन यांनी स्पष्ट केले आहे.
४५० कोटी रुपये खर्चाची ही मोहीम आता केवळ तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या मोहिमेचे स्वत:चे असे एक वैज्ञानिक महत्त्व आहे. इतर देश मंगळाकडे भावी वसतिस्थान म्हणून पाहत असताना, त्याकडे भारताचे दुर्लक्ष होता कामा नये, असे राधाकृष्णन यांनी म्हटले आहे. सध्या ही शक्यता स्पष्ट नसली तरी आगामी २० वर्षात किंवा कदाचित ३० वर्षात ही शक्यता प्रत्यक्षात येऊ शकते, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
मंगळावरील ही मोहीम सुरू झाल्यावर मंगळाचा वेध घेणारा भारत सहावा देश ठरणार आहे. अमेरिका, रशिया, युरोपिय संघ, जपान व चीन यांनी मंगळावरील मोहिमा राबवल्या आहेत. या ग्रहावरील जीवसृष्टीची शक्यता पडताळून पाहणे, या तांबूस ग्रहाची छायाचित्रे घेणे व मंगळाच्या वातावरणाचा अभ्यास करणे हे भारताच्या मंगळ मोहिमेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.
साहजिकच मंगळाबाबत सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या ग्रहावरील जीवसृष्टीची शक्यता. त्यासाठी या ग्रहावर मिथेन वायूचे अस्तित्व आहे की नाही त्याचा शोध घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. मिथेनचा शोध घेणारा एक सेन्सर व एक थर्मल स्पेक्ट्रोमीटर तयार करण्यात आला आहे. या दोघांचा वापर करून मिथेनबाबत योग्य ती माहिती मिळवता येणार आहे.
या मोहिमेचा खर्च अफाट असल्याने अंतराळ सफरीसाठी होणारा हा खर्च भारताला कितपत परवडण्याजोगा आहे, असा प्रश्न काही जणांकडून उपस्थित होत आहे.
मात्र, अशा प्रकारची मोहीम ही भारतासाठी एक वेगळा अनुभव देणारी ठरणार असल्याने या मोहिमेसाठी होणारा खर्च भारताला अंतराळ संशोधन क्षेत्रातील पुढील पायरीवर नेणारा असल्याने तो अनाठायी असणार नाही. अशा प्रकारच्या मोहिमेत कोणती आव्हाने असतात ते संशोधकांच्या लक्षात येणार आहे. ही आव्हाने विविध प्रकारची आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अंतराळयानाला मंगळाच्या कक्षेत दाखल करणे. हे अतिशय कठीण आव्हान आहे. कारण या कक्षेपर्यंत जाण्यासाठी अंतराळयानाला ३०० दिवस लागणार आहेत. यानंतरच अंतराळयानाची प्रॉपल्शन प्रणाली कार्यरत होण्याची आवश्यकता आहे.
यापूर्वी इन्सॅट श्रेणीतील उपग्रह आणि चांद्रयान-१ या मोहिमांदरम्यान उपग्रह त्यांच्या कक्षेत केवळ एक किंवा दोन दिवसांत दाखल झाले होते. मात्र, अंतराळयानाला गती व दिशा देणारी प्रणाली ३०० दिवसांनंतर कार्यरत करणे हा एक वेगळा अनुभव असेल, असे राधाकृष्णन म्हणाले. याबाबतच्या चाचण्या झालेल्या आहेत व ही यंत्रणा कशा प्रकारे कार्यान्वित करावीत याचे ज्ञान शास्त्रज्ञांना आहे.
चांद्रयान मोहिमेच्या वेळी शास्त्रज्ञांना केवळ चार लाख किमी अंतरावरून उपग्रह नियंत्रणाचे आव्हान होते. तर मंगळाच्या वेळी त्याच्या हजार पट म्हणजे ४००० लाख किमी अंतरावरून यानाला नियंत्रित करण्याचे अतिशय अवघड आव्हान आहे. साहजिकच इतक्या दूर अंतरावरच्या मोहिमेचा हा पहिला अनुभव भावी काळातील इतर मोहिमांसाठी एक मोठा धडा ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.