सिनियर क्रिकेटपटू असूनही पराभव पदरी पडणार असतील, तर काही काळ युवा मंडळींवर भरवसा टाकावा लागेल. सिनियरवरच विसंबून राहिलो, तर त्यांच्या अस्तानंतर पूर्णपणे अप्रशिक्षित, अपरिपक्व युवा क्रिकेटपटूंना स्वत:च्या पायांवर उभे राहण्याची संधीच मिळणार नाही. त्यांच्यावरील संभाव्य अन्यायाची जबाबदारी सर्वस्वी सिनियर क्रिकेटपटूंवरच राहील!
इंग्लंडविरुद्ध मुंबईत दुस-या क्रिकेट कसोटीत भारताचा झालेला दारुण पराभव अनेक अर्थानी अभूतपूर्व होता. अजूनही मायदेशी कमी सामने गमावणा-या संघांमध्ये भारताचा समावेश होतो. गेल्या चार वर्षामध्ये भारताने मायदेशी केवळ चारच सामने गमावले आहेत. कदाचित इंग्लंड किंवा दक्षिण आफ्रिका यांनाही अशा प्रकारची कामगिरी जमलेली नाही, हे सध्या भारतीय संघावर टीकेचे मोहोळ उठवणा-यांनी लक्षात घेतले पाहिजे. मुंबईत परवा झालेला पराभव भारताचा चौथा पराभव होता. पण आधीचे तिन्ही पराभव तेज गोलंदाजांसमोर झाले. तर हा पराभव प्रतिस्पर्धी संघातील फिरकीपटूंच्या किमयेने साकारला होता. माँटी पानीसर आणि ग्रॅमी स्वान या इंग्लिश फिरकीपटूंनी या सामन्यात १९ बळी मिळवले. तर हरभजन, अश्विन आणि ओझा या फिरकी त्रिकुटाला मिळून अवघे नऊच बळी मिळवता आले. या मालिकेत उर्वरित सामने कोलकाता आणि नागपूर येथे खेळवले जातील. कोलकात्याची खेळपट्टी ब-यापैकी वळते असा तिचा लौकीक आहे. नागपूरची खेळपट्टी सहसा मध्यम तेज गोलंदाजांसाठी अनुकूल ठरते. याच खेळपट्टीवर दोन वर्षापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनने आपली दाणादाण उडवली होती. भारतासमोर दुहेरी डोकेदुखी आहे. कारण आतापर्यंत इंग्लंडचे मध्यम तेज गोलंदाज भारतापेक्षा सरस आणि फिट होते. आता त्यांचे फिरकी गोलंदाजही आपल्याला भारी पडू लागले आहेत. त्यामुळे खेळपट्टी नक्की कशी बनवायची, हा प्रश्न क्युरेटर मंडळींना सतावणार आहे. तशात महेंद्रसिंग ढोणीसारखा एरवी विचारी विधाने करणारा कर्णधारही उघड उघड ‘मागण्या’ करू लागला आहे. ‘फिरकीस पोषक अशी खेळपट्टी बनवा’ हा त्याचा सूचनावजा सल्ला भारताने मुंबईतला सामना जिंकला असता, तर टीकेचा विषय ठरला असता. पण भारताने सामना गमावला आणि ढोणीचे ते विधान सार्वत्रिक विनोदाचा नि उपहासाचा विषय बनला. आजवर पाकिस्तान वगळता इतर कोणत्याही संघाच्या फिरकी गोलंदाजांनी नजीकच्या इतिहासात भारतीय फलंदाजांची भारतीय खेळपट्ट्यांवर अशी त्रेधा उडवलेली स्मरत नाही. इंग्लंडच्या दोन फिरकी गोलंदाजांपैकी माँटी पानीसर हा भारतीय वंशाचा आहे, हा निव्वळ योगायोग. गेल्या वर्षी मर्यादित षटकांचा वर्ल्डकप जिंकणे ही कामगिरी भारतीय क्रिकेटच्या गेल्या दहा वर्षाच्या ‘गोल्डन जनरेशन’च्या दृष्टीने यशोशिखर ठरले. हा विजय महेंद्रसिंग ढोणीच्या नेतृत्वाखाली मिळालेला असला, तरी त्याचे मानकरी सचिन तेंडुलकर आणि नवीन सहस्र्काच्या सुरुवातीला त्याच्याबरोबर खेळलेले त्याचे सहकारी होते. त्या ‘गोल्डन जनरेशन’पैकी केवळ सचिन, सेहवाग, झहीर आणि हरभजन मुख्य स्पर्धेत खेळले. परंतु सौरव गांगुली, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, अनिल कुंबळे, जवगल श्रीनाथ हे त्या स्पर्धेत न खेळूनही त्यांचे योगदान नजरेआड करता येणार नाही. कारण या सर्वाच्या अथक परिश्रम आणि इच्छाशक्तीमुळे आपण परदेशी मैदानांवर, प्रतिकूल खेळपट्ट्यांवर जिंकू लागलो. त्यामुळे भारतीय क्रिकेटकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातच आमूलाग्र बदल झाला. कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर पोहोचलो. त्यामुळे मर्यादित षटकांमधील दुसरे जगज्जेतेपद अधिकच दिमाखदार भासू लागले. इतके सगळे घडत असताना ढोणी आणि युवराज यांच्या युवा पिढीनेही पहिलावहिला टी-२० वर्ल्डकप जिंकून दाखवला. आता ढोणी, युवराज, गंभीर, कोहली, अश्विन, ओझा यांच्या पिढीवरच भारतीय क्रिकेटचे भवितव्य अवलंबून आहे, हे मान्य करावे लागेल. हरभजन, सेहवाग, झहीर आणि मुख्य म्हणजे सचिन यांच्या कारकीर्दीचा संधिकाल आलेला आहे. संक्रमण कोणाला चुकलेले नाही. सौरव, कुंबळे, द्रविड, लक्ष्मण यांच्या निवृत्तीने हेच सत्य अधोरेखित केले होते. त्यांच्या पिढीतल्या बाकीच्यांनाही त्या मार्गाने जावे लागेल. सचिनने तर दोन पिढ्या पाहिल्या आहेत. १९८९पासून हा असामान्य क्रिकेटपटू अथकपणे खेळत आहे. नवनवीन अपेक्षांची ओझी वागवत आहे. त्याचे शरीर आता साथ देईनासे झाले आहे. तो स्वत: हे कबूल करणार नाही आणि त्याच्या असंख्य चाहत्यांसाठी तर याबाबतची चर्चाही महापातक ठरते. त्याची मैदानावरील उपस्थिती ही प्रतिस्पर्धी कर्णधार/गोलंदाजांच्या मनात धडकी किंवा संघसहका-यांच्या मनात विश्वास उद्दीपित करू शकत नाही, हे वास्तव आहे. सचिनची इतकी सवय झाली आहे, की त्याच्याशिवाय भारतीय संघाचा विचार करण्यास मन तयार होत नाही. पण पूर्णविराम हा कोणालाही चुकलेला नाही. सुनील गावस्कर किंवा कपिलदेव ही भारतीय क्रिकेटमधील दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्वे अप्रत्यक्षपणे हेच सुचवत आहेत. सचिनने निवड समितीशी चर्चा केली पाहिजे, या सूचनेतच त्याने स्वत:च संघातील स्थानाबाबत फेरविचार करावा हा सल्ला दडलेला दिसतो. क्रिकेट किंवा कसोटी क्रिकेट हा खूप तांत्रिक आणि शारीरिक कस लावणारा खेळ आहे. एकाग्रता, शारीरिक फिटनेस या दोन्ही गोष्टी भरपूर लागतात. शिवाय उत्साह, ऊर्जा आणि चिकाटी हे घटकही महत्त्वाचे ठरतात. आज २३ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्यानंतर सचिनमध्ये या गोष्टी किती शिल्लक राहिल्यात, याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड आणि त्यांचे महत्त्वाचे पदाधिकारी सचिनच्या भविष्यावर बोलायला तयार नसतात. निवृत्तीचा निर्णय सचिनने स्वत:च घ्यायचा आहे, असे सांगून बहुतेक जण हात झटकून मोकळे होतात. सचिनने हा निर्णय करायचा असेल, तर मग निवड समिती आणि दस्तुरखुद्द क्रिकेट बोर्डही कशाला हवे? बरखास्त केलेले बरे! भारतातल्या कोणत्याही क्रिकेटपटूला अशा प्रकारचे स्वातंत्र्य मिळालेले नाही. सर डॉन ब्रॅडमन, सर गारफील्ड सोबर्स, सर व्हिव्हियन रिचर्ड्स, डेनिस लिली, इयन बॉथम या महान क्रिकेटपटूंनी निवृत्तीचा निर्णय स्वत:हून घेतला किंवा त्यांना तसे सूचित करण्यात आले. सचिन हा काही अडगळ नाही. त्याच्यापेक्षा फारच चांगले फलंदाज केवळ त्याच्यामुळे संघाबाहेर राहात आहेत, हाही मुद्दा नाही. परंतु एका मोठ्या कालखंडानंतर भारतीय संघाची नव्याने उभारणी आणि बांधणी करावी लागणार आहे. या प्रक्रियेत पूर्णपणे नवीन पिढीवर भरवसा टाकावा लागणार आहे. पुढील दहा वर्षासाठी नियोजन करावे लागणार आहे. नवीन पिढीवर भरवसा टाकला, तेव्हाच सचिनसारखा तारा उदयाला आला हे तो कसे नाकारू शकेल? भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने हा फार नाजूक कालखंड आहे. एकीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताची आर्थिक ताकद अफाट वाढली आहे. तर दुसरीकडे, भारताला भारतात हरवण्याची क्षमता इतर संघांमध्ये निर्माण होऊ लागली आहे. सध्याची मालिका जिंकण्याची संधी आता भारताइतकीच इंग्लंडलाही आहे. किंबहुना, इंग्लंडला अधिक संधी आहे, कारण मानसिक दृष्ट्या ते वेगळ्या उंचीवर पोहोचले आहेत. पुढील वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन संघ भारतात येत आहे. या दोन्ही संघांनी भारताला त्यांच्या देशात ४-० असा चोप दिला होता. त्या सफाईने भारताला त्यांच्याविरुद्ध जिंकता येणार नाही, हे मुंबईतील निकालाने दाखवून दिले आहे. पण किमान समाधानकारक कामगिरी करण्याच्या दृष्टीने काही कठोर निर्णय घ्यावेच लागतील.
[EPSB]
कायदा-सुव्यवस्थेचे पुढे काय?
कसाबला फाशी दिल्यानंतर अनेकांनी समाधानाचा सुस्कारा सोडला. परंतु कसाब हा आंतरराष्ट्रीय दहशतवादातील एक प्यादे होता. अशा प्याद्यांच्या हातून आपल्या देशाचे, मुंबईचे संरक्षण करून कोट्यवधी जीवांचे रक्षण करायचे, तर आपल्याला सुरक्षा यंत्रणेतील कच्चे दुवे शोधावे लागतील. पोलिसांच्या बुलेटप्रूफ जॅकिटपासून पोलिसांच्या भरतीपर्यंत, पोलिसांच्या जीपपासून समुद्रकिना-याच्या संरक्षणासाठी मागवलेल्या व नादुरुस्त होऊन किना-यावर पडलेल्या बोटींपर्यंत प्रत्येक बाबीची काळजी घ्यावी लागेल. […]
[/EPSB]