भारतीय भाज्या, फळांमध्ये कीटकनाशकांचे प्रमाण अधिक असल्याचे खोटे निष्कर्ष जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या संशोधकांनी परदेशात प्रसिद्ध होणा-या संशोधनात्मक जर्नल्समध्ये लिहिले आहेत.
नवी दिल्ली – भारतीय भाज्या, फळांमध्ये कीटकनाशकांचे प्रमाण अधिक असल्याचे खोटे निष्कर्ष जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या संशोधकांनी परदेशात प्रसिद्ध होणा-या संशोधनात्मक जर्नल्समध्ये लिहिले आहेत. हा खोटारडेपणा करणा-या या संशोधकांच्या व विद्यापीठाच्या विरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी संघटना व पीकविषयक संस्थेने केली आहे.
२०१४ मध्ये अमेरिकेच्या जर्नलमध्ये भारतीय पिकांमध्ये कीटकनाशके असल्याचा अहवाल प्रसिद्ध झाला होता. तर दिल्ली व परिसरातील ५२ भाज्यांमध्ये बंदी घातलेल्या कीटकनाशकांचे प्रमाण आढळले होते, असा दावा जेएनयूच्या संशोधकांनी युरोपमध्ये प्रसिद्ध होणा-या शोधनिबंधात केला. या शोधनिबंधामुळे भारतीय कृषी क्षेत्राची बदनामी होत असून बनावट निष्कर्ष मांडणा-या जेएनयूच्या संशोधकांवर कारवाईची मागणी केली.
यावर जेएनयूच्या अधिका-यांनी सारवासारव करताना सांगितले की, आमच्या संशोधकांचे शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.
त्याचा विद्यापीठाशी थेट संबंध नाही. कारण संशोधकांनी स्वतंत्रपणे संशोधन करून ते निष्कर्ष प्रसिद्ध केले आहेत. त्यांच्या संशोधनात आम्ही हस्तक्षेप करत नाही. तर पीकविषयक संस्थेने (सीसीएफआय) चे अध्यक्ष रज्जू श्रॉफ यांनी सांगितले की, चुकीचे निष्कर्ष प्रसिद्ध करणा-या संशोधकांवर कारवाई करून त्यांची पीएचडीची पदवी काढून घ्यावी, अशी मागणी केली.
आयसीएआरने जेएनयूला तीनदा पत्र पाठवून संशोधनाची प्राथमिक निष्कर्ष पाठवण्याचे आदेश दिले असून त्यावर संस्थेने मौन बाळगले आहे. संशोधकांनी केलेल्या चुकीच्या निष्कर्षावर पांघरूण घालण्याचे काम विद्यापीठ करत आहेत. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत प्रयोगशाळेतील निष्कर्ष जाहीर करण्यात विद्यापीठ अपयशी ठरले आहे. तसेच कोणत्या दिवशी हे प्रयोग केले व संशोधकांची नावेही गुप्त ठेवली आहेत, असे संस्थेने सांगितले.
भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) या संशोधकांचे निष्कर्ष तपासावेत. यापूवी भारतीय कृषी संशोधन परिषदेने केलेल्या तपासात २ ते ३ टक्के किटकनाशकांचे प्रमाण आढळले होते. तर जेएनयूच्या अहवालात हेच प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक दाखवले आहे, असे आयसीएआर नेटवर्कचे समन्वयक के. के. शर्मा यांनी सांगितले.
या भारतीय भाज्यांवर परदेशात बंदी
भारतीय भाज्यांमध्ये प्रमाणापेक्षा अधिक किटकनाशके आढळल्याने युरोपियन महासंघाने भारतातील काही भाजीपाल्यांवर बंदी घातली आहे. वांगी, अळु, कारले, पडवळ या भाज्यांना युरोपात बंदी आहे. यापूर्वी हापूस आंब्यावर युरोपने बंदी घातली होती. मात्र मोठय़ा प्रयत्नानंतर ती उठवली.