पठाणकोटमधील भारतीय हवाई तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत-पाक शांतता चर्चेत खंड पडल्याची कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिली आहे.
लाहोर- पठाणकोटमधील भारतीय हवाई तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत-पाक शांतता चर्चेत खंड पडल्याची कबुली पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिली आहे. दोन उभय देशांत सकारात्मक पातळीवर चर्चा सुरू असताना २ जानेवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे ही चर्चा थांबल्याचे दु:ख आपणाला आहे, अशी नाराजीही शरीफ यांनी व्यक्त केली.
शनिवारी लाहोरमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. पठाणकोट हल्ल्यामुळे भारत-पाक परराष्ट्र पातळीवर होणा-या चर्चेवरही त्याचा मोठा परिणाम होऊन ही चर्चा जानेवारी अखेपर्यंत लांबल्याचेही त्यांनी सांगितले. पंजाब प्रांतातील पठाणकोट हवाई तळावर ‘जैश ए मोहमद’ या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात सात भारतीय जवान शहीद झाले होते.
हल्ल्याचा तपास लवकरच पूर्ण करू
पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा तपास पाकिस्तान लवकरच पूर्ण करेल, अशी ग्वाही पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दिली. या हल्ल्याचा तपास करण्यासाठी सुरक्षा यंत्रणेची उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. पाकिस्तान पठाणकोट हल्ल्याचा तपास करण्यासाठी कोणत्याही पातळीवर जाईल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. हा हल्ला करण्यासाठी पाकिस्तानी भूमीचा वापर झाला की नाही हे सत्य लवकरच उजेडात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तपास जलदगतीने करण्याचे आदेश दिल्याचेही शरीफ यांनी सांगितले. पाकिस्तान या हल्ल्याचा तपास गंभीरतेने करत असून यात दोषी आढळणा-यांची गय केली जाणार नाही, असे शरीफ यांनी ठामपणे सांगितले. या संपूर्ण हल्ल्याच्या चौकशीसाठी भारताला आवश्यक ते सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत, असेही शरीफ यांनी सांगितले. पठाणकोट हल्ल्यातील सूत्रधार मसूद अझर आणि इतर संशयित दहशतवाद्यांची कसून चौकशी करण्यावर पाकिस्तानने ऐनवेळी पलटी मारली होती.