पहिल्या कसोटीच्या पाचव्या दिवशी भारताने इंग्लंडवर नऊ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला.
अहमदाबाद- पाचव्या आणि अंतिम दिवशी इंग्लंडवर नऊ विकेट्सनी मात करत भारताने पहिली कसोटी जिंकली. मोटेरा स्टेडियमवर विजयाचा ‘चौकार’ लगावतानाच चार सामन्यांच्या मालिकेत यजमानांनी १-० अशी आघाडी घेतली. चेतेश्वर पुजारा आणि वीरेंदर सेहवागची बहारदार फलंदाजी तसेच ओझा-अश्विनची प्रभावी फिरकी हे भारताच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.
विजयासाठीचे ७७ धावांचे माफक लक्ष्य भारताने सोमवारी सलामीवीर वीरेंदर सेहवागच्या (२५) बदल्यात १६.३ षटकांत पार केले. सेहवागने पहिल्या डावातील नाबाद द्विशतकवीर चेतेश्वर पुजारासह ५७ धावांची झटपट सलामी दिली. पुजाराच्या नाबाद ४१ धावांच्या खेळीत आठ चौकारांचा समावेश आहे. त्यालाच सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. आजीच्या निधनामुळे गौतम गंभीर रविवारी अहमदाबादला पोहोचू न शकल्याने ‘वनडाउन’ पुजाराने सेहवागसह भारताच्या डावाची सुरुवात केली.
तत्पूर्वी, ५ बाद ३४० वरून इंग्लंडचा दुसरा डाव उपाहारापूर्वी ४०६ धावांत संपला. पाहुण्यांनी रविवारी २८.३ षटके खेळून काढताना पाच विकेट्सच्या बदल्यात ६६ धावांची भर घातली. मॅट प्रायरला शतकापासून रोखताना प्रग्यान ओझाने भारताला दिवसभरातील पहिले यश मिळवून दिले. प्रायरने २२५ चेंडूंत ९१ धावा करताना ११ चौकार लगावले. त्यानंतर ठराविक अंतराने विकेट्स पडल्या. ओझानेच अॅलिस्टर कुकला त्रिफळाचीत करत भारताच्या विजयातील मोठा अडसर दूर केला. कुकने ३७४ चेंडूंत २१ चौकारांसह १७६ धावांची सर्वोत्तम खेळी केली. उमेश यादवने स्टुअर्ट ब्रॉडला (३) स्वत:च्याच गोलंदाजीवर बाद केले. ग्रॅमी स्वान (१७) आणि टिम ब्रेस्ननने (२०) नवव्या विकेटसाठी २६ धावा जोडल्याने इंग्लंडला चारशेचा टप्पा गाठता आला. उपाहारापूर्वी १५४.३ षटकांत ४०६ धावांत त्यांचा दुसरा डाव संपला.
डावखुरा फिरकीपटू प्रग्यान ओझा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. दुस-या डावात ४ विकेट्स घेत त्याने सामन्यातील विकेट्सची संख्या नऊवर पोहोचवली. यादवने तीन आणि झहीरने दोन विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. दुस-या डावात ऑफस्पिनर अश्विनला केवळ एकच विकेट घेता आली.
[poll id=”70″]
भारत : पहिला डाव – ८ बाद ५२१ (डाव घोषित).
इंग्लंड : पहिला डाव – १९१.
दुसरा डाव – (५ बाद ३४० वरून) अॅलिस्टर कुक त्रि. गो. ओझा १७६, मॅट प्रायर झे. आणि गो. ओझा ९१, टिम ब्रेस्नन झे. (बदली रहाणे) गो. झहीर २०, स्टुअर्ट ब्रॉड झे. आणि गो. यादव ३, ग्रॅमी स्वान त्रि. गो. अश्विन १७, जेम्स अँडरसन नाबाद ०, अवांतर – २१(बाइज १४, लेगबाइज ६, वाइड १), एकूण : १५४.३ षटकांत सर्वबाद ४०६ धावा.
बादक्रम : १-१२३(कॉम्प्टन), २-१५६ (ट्रॉट), ३-१६० (पीटरसन), ४-१९९ (बेल), ५-१९९ (पटेल), ६-३५६ (प्रायर), ७-३६५ (कुक), ८-३७८ (ब्रॉड), ९-४०६ (स्वान), १०-४०६ (ब्रेस्नन).
गोलंदाजी : उमेश यादव २३-२-७०-३,, प्रग्यान ओझा ५५-१६-१२०-४, आर. अश्विन ४३-९-११-१, वीरेंदर सेहवाग १-०-१-०, झहीर खान २७.३-५-५९-२, सचिन तेंडुलकर १-०-८-०, युवराज सिंग ४-०-१७-०.
भारत : दुसरा डाव – वीरेंदर सेहवाग झे. पीटरसन गो. स्वान २५, चेतेश्वर पुजारा नाबाद ४१, विराट कोहली नाबाद १४, अवांतर -०, एकूण : १५.३ षटकांत १ बाद ८०.
बादक्रम : १-५७(सेहवाग).
गोलंदाजी : जेम्स अँडरसन २-०-१०-०, ग्रॅमी स्वान ७.३-१-४६-१, समित पटेल ६-०-२४-०.
निकाल : भारत ९ विकेट्सनी विजयी. चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी. दुसरी कसोटी २३ नोव्हेंबरपासून मुंबईत.
सामनावीर : चेतेश्वर पुजारा.
सात वर्षानंतर मोटेरावर विजय
तब्बल सात वर्षानंतर भारताने मोटेरा स्टेडियमवर विजयश्री साजरी केली. अहमदाबादमध्ये यजमांनाना शेवटचा विजय २००५ मध्ये मिळवला होता. हंगामी कर्णधार वीरेंदर सेहवागच्या नेतृत्वाखाली भारताने पाहुण्या श्रीलंकेला २५९ धावांनी हरवले होते. त्यानंतर गेल्या सात वर्षात मोटेरावर भारताने दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि न्यूझीलंडशी दोन हात केले. २००८ मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून डावाने पराभूत होण्याची वेळ आली. मात्र २००९ आणि २०१० मध्ये अनुक्रमे श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धचे सामने अनिर्णित राहिले. मोटेरा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या एकूण १२ लढतींमधील भारताचा हा चौथा विजय आहे.
ढोणीने केले गोलंदाजांचे कौतुक
भारताचा कर्णधार महेंद्रसिंग ढोणीने विजयाचे श्रेय गोलंदाजांना दिले आहे. ‘‘सुरुवातीला खेळपट्टीकडून फिरकीपटूंना फार मदत मिळत नव्हती. मात्र प्रग्यान ओझा आणि रविचंद्रन अश्विन या फिरकी दुकलीने घेतलेल्या मेहनतीमुळे विजय साध्य झाला. दोघांनी किमान ७० ते ८० षटके टाकली. झहीर आणि उमेश या मध्यमगती गोलंदाजांचीही त्यांना चांगली साथ मिळाली. सामन्यात नऊ विकेट्स घेणा-या ओझाची विशेष तारीफ करावीशी वाटते. युवा चेतेश्वर पुजाराचेही कौतुक करावे तितके कमी आहे. एकूणच सांघिक कामगिरी चांगली झाली,’’ असे ढोणीने म्हटले.
[EPSB]
कर्णधार कुकचे नाबाद शतक
कर्णधार अॅलिस्टर कुकच्या (खेळत आहे १६८) नाबाद शतकामुळे इंग्लंडने चौथ्या दिवसअखेर दुस-या डावात पाच बाद ३४० धावा करताना भारताविरुद्धची पहिली कसोटी अनिर्णित राखण्यादृष्टीने धडपड कायम ठेवली.
[/EPSB]