भीमा-कोरेगावमधील हिंसाचार हे एक मोठे षडयंत्र होते. येणा-या काळात अशाच प्रकारची जातीयवादी परिस्थिती निर्माण केली जाऊ शकते. अशावेळी सर्वांना तिरंग्याखाली एकत्र आणून, भाजप कार्यकर्त्यांनी सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिला.
मुंबई- भीमा-कोरेगावमधील हिंसाचार हे एक मोठे षडयंत्र होते. येणा-या काळात अशाच प्रकारची जातीयवादी परिस्थिती निर्माण केली जाऊ शकते. अशावेळी सर्वांना तिरंग्याखाली एकत्र आणून, भाजप कार्यकर्त्यांनी सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिला.
भाजप कार्यकारिणीची बैठक मुंबईत पार पडली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी त्यांनी आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचनाही भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या.
फडणवीस यावेळी म्हणाले की, भाजप आणि सरकारची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरु आहे. भीमा-कोरेगाव हे फार मोठे षडयंत्र होते. सरकारने आपली जबाबदारी नीट पार पाडली. येणा-या काळात राज्यात जातीयवादी तेढ निर्माण होणारी परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार राहावे. लोकांमध्ये सलोखा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. जातीय तेढ निर्माण झाल्यास भाजप कार्यकर्त्यांनी तिरंग्याखाली सर्वांना घेऊन यावे. येणा-या काळात लोकसभा, विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी आतापासूनच पक्ष बांधणीवर लक्ष द्यावे. लोकांशी जास्तीत जास्त संपर्क ठेवा. निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
तिरंगा रॅलीने विरोधकांना उत्तर देणार
विरोधकांचा हल्लाबोल अपयशी ठरला आहे. सरकारचा विकास पाहून भाजप आणि सरकारला बदनाम करण्याचा काही मंडळींचा डाव आहे. २६ जानेवारीला प्रत्येक जिल्ह्यात तिरंगा रॅली काढून विरोधकांच्या संविधान बचाव रॅलीला उत्तर दिले जाईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यावेळी सांगितले.