निवडणुकीत जोरदार पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर झालेल्या मनसेच्या चिंतन बैठकीत राज ठाकरे व नेत्यांमध्ये खडाजंगी झाली.
मुंबई- विधानसभा, महापालिका आणि त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत जोरदार पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर मनसेची चिंतन बैठक पार पडली. त्यात राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या देण्याचा प्रयत्न केला. तर नेते आणि कार्यकर्त्यांनी पराभवाचे खापर पक्ष नेतृत्वाच्या वारंवार बदलणा-या भूमिकेवर फोडले. पहिल्यांदाच मनसे नेत्यांनी अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समोर अगदी स्पष्ट शब्दात आपले म्हणणे मांडले.
राज्यात झालेल्या सर्वच निवडणुकीत मनसेला जबरदस्त पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. यावेळी राज ठाकरे विरुद्ध नेते, सरचिटणीस अशी जबरदस्त खडाजंगी झाली. पदाधिकारी बैठकीत ३६ मतदारसंघातील अहवाल सादर करण्यात आले. यावेळी पक्षवाढ करण्यात आणि माझी भूमिका लोकांपर्यंत पोहोचविण्यात कार्यकर्ते आणि नेते कमी पडत असल्याचा थेट आरोप राज ठाकरे यांनी केला. त्यावेळी नेते आणि सरचिटणीस यांनी यावर नापसंती व्यक्त केली.
पक्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी खंडाजगी झाली. नेते, सरचिटणीस यांनी राज ठाकरे यांना पराभवाबाबत परखड मते सुनावली. तर राज ठाकरे यांनी नेत्यांना त्यांच्या कामगिरीबाबत कानपिचक्या दिल्या आहेत. राज ठाकरे आणि नेते सरचिटणीस यांनी एकमेकांवर पराभवाचे खापर फोडण्याचा प्रयत्न केला.
मनसे नेते आणि सरचिटणीस यांनी राज ठाकरे यांना उद्देशून सांगितले की, विविध विषयांवर तुमच्याकडून पक्षाच्या भूमिकाच येत नाहीत. त्यावेळी राज ठाकरे यांनी तुम्ही माझ्या भूमिका लोकांपर्यंत पोहोचवायला कमी पडत आहात, असे बजावले.
बैठकीत पक्ष वाढीसाठी काय करता येईल यावर चिंतन झाले. मुंबई सारख्या सर्व भाषिक शहरात पक्ष वाढवायचा असेल तर आपण सर्वांनाच बरोबर घेऊन चालले पाहिजे. मराठीचा मुद्दा थोडा सैल केला पाहिजे, अशी सूचना कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. मात्र राज ठाकरे यांनी ती सपशेल धुडकावून लावली. ते म्हणाले, पक्षाची वाढ थोडी संथ गतीने झाली, तरी चालेल. पण मी मराठीचा मुद्दा सोडणार नाही. त्यानंतर पनवेल, भिवंडी, मालेगाव येथील महापालिका निवडणुकीत सर्व ताकदीनिशी उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला.