युती तुटल्याने आणि आघाडीत बिघाडी झाल्याने बदललेल्या राजकीय परिस्थितीत मनसेचे महत्व वाढले आहे.
मुंबई –युती तुटल्याने आणि आघाडीत बिघाडी झाल्याने बदललेल्या राजकीय परिस्थितीत मनसेचे महत्व वाढले आहे. मनसेने शुक्रवार सकाळपासून उमेदवारांना देण्यात येणा-या एबी फॉर्म वाटपाची प्रक्रिया थांबवली आहे.
गुरुवारी मनसेने १५३ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. शुक्रवार सकाळापासून कृष्णकुंज या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसे नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरु आहे.
बदललेल्या परिस्थितीत मनसे काय भूमिका घेणार ? मनसे कोणाशी जवळीक वाढवणार ? या चर्चांना ऊत आला आहे. मनसेने अद्यापही आपले पत्ते उघड केलेले नाहीत.
शिवसेना-भाजपची गेल्या २५ वर्षापासूनची युती संपुष्टात आल्यानंतर आता राज्यात काही नवीन समीकरणे आकाराला येण्याची शक्यता आहे.लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय वजन घटलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बदलत्या समीकरणांमध्ये पुन्हा एकदा महत्व प्राप्त होऊ शकते असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. सत्ता येण्याआधीच शिवसेना-भाजप युतीने जागावाटपातून सत्तेची जी लालसा दाखवली त्यामुळे मराठी मतदार पुन्हा मनसेकडे वळू शकतो.
युती तुटल्याने आणि आघाडीत बिघाडी झाल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसमोरील आव्हान काही प्रमाणात कमी झाले असून, मनसेबद्दल पुन्हा विश्वासहर्ता निर्माण करण्याची संधी मिळाली आहे. सर्वच मोठया पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने कित्येक वर्षानंतर राज्यात पंचरंगी लढत होणार आहे.
भाजप स्वबळावर लढत असल्याने मनसे आणि भाजपमध्ये जवळीक वाढण्याची शक्यता आहे. भाजप नेत्यांचे राज ठाकरेंबरोबर उत्तम संबंध आहेत. दोन्ही पक्षांमध्ये युती होण्याची शक्यता नसली तरी, लोकसभेप्रमाणे काही जागांवर पडद्यामागून हातमिळवणी होऊ शकते. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना पाठिंबा देत मुंबईत भाजप विरोधात उमेदवार उभे केले नव्हते.
अलीकडेच नाशिक महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपने मनसेला दिलेला पाठिंबा काढून घेतल्याने नाशिक महापालिकेतील मनसेची सत्ता धोक्यात आली होती. त्यामुळे भाजपबरोबर कुठलीही तडजोड करु नये असा पक्षात एक मतप्रवाह आहे. अशा कुठल्याही तडजोडीशिवाय मनसे चांगली कामगिरी करु शकते असे पक्षातील काही नेत्यांचे मत आहे.
लोकसभा निवडणुकीत मनसेने लढवलेल्या दहा जागांवर मनसे उमेदवारांचा दारुण पराभव झाला होता. त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले होते. या पराभवानंतर मनसे कार्यकर्त्यांची सर्व मदार बहुचर्चित ब्ल्यू प्रिंटवर होती. मात्र ब्ल्यू प्रिंट सादर होत असतानाच युती आणि आघाडी तुटल्याची घोषणा झाल्याने मनसेच्या या बहुचर्चित ब्ल्यू प्रिंटला अपेक्षित प्रसिध्दी मिळू शकली नाही.
त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाची रुपरेषा मांडणारी ही ब्ल्यू प्रिंट सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि बदललेल्या राजकीय परिस्थितीचा लाभ उठवण्यासाठी मनसेला अचूक पावले उचलावी लागतील.