राज ठाकरे यांनी अमरावती येथे आंदोलन करण्याची चिथावणी दिल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी परळ येथील इंडियाबुल्सवर हल्ला चढवला.
मुंबई- अमरावती येथील सभेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘इंडियाबुल्स’च्या पाणी प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्याची चिथावणी दिल्यानंतर रविवारी रात्री मनसे कार्यकर्त्यांनी परळ येथील ‘इंडियाबुल्स फायनान्स सेंटर’वर हल्ला चढवून हैदोस घातला.
यामध्ये सुरक्षा रक्षकांच्या कार्यालयाची आणि दर्शनी भागाची मोठय़ा प्रमाणात मोडतोड करण्यात आली आहे. एका वाहिनीवर हे सर्व चित्रीकरण तपशीलवार दाखवण्यात आल्यामुळे चित्रीकरणात दिसणा-या मनसे कार्यकर्त्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
‘‘अमरावती येथील आठ हजार हेक्टर जमिनी सिंचनाखाली आणण्यासाठी केंद्र सरकारने पैसे दिले. हे पाणी शेतक-यांसाठी आणले आणि या प्रकल्पासाठी केंद्र सरकारबरोबर करारपत्र झाले होते. परंतु प्रकल्प पूर्ण झाल्यावर सरकारने यात फेरफार करून २५० कोटींचा हा प्रकल्प ‘इंडियाबुल्स कंपनी’ला देऊन टाकला. तुमचे पाणी या कंपनीला दिले. त्यामुळे उद्यापासूनच याविरोधात आंदोलन झाले पाहिजे,’’ असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. त्यांच्या या आवाहनानंतर मनसे कार्यकर्त्यांनी अमरावती येथील प्रकल्पाविरोधात आंदोलन करण्याऐवजी परळ येथील ‘इंडियाबुल्स फायनान्स सेंटर’वर हल्ला केला.
मनसेच्या पाच ते सहा कायकर्त्यांनी लोखंडी सळय़ा, दगडांचा मारा करत येथील कार्यालयाची मोडतोड केली. त्यानंतर या जमावाने आतमध्ये शिरण्याचा प्रयत्नही केला. परंतु सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखल्यामुळे संतप्त जमावाने सुरक्षा रक्षकाच्या केबिनला आपले लक्ष्य केले.