गुजरातमध्ये पटेल समाज, हरियाणामधला जाट समाज आरक्षणासाठी पेटून उठत असेल तर मराठा समाज आपल्या हक्कांसाठी का पेटून उठत नाही. नोकरी आणि शिक्षणासाठी आरक्षण हा आमचा हक्क आत्ताचे राज्यकर्ते देणार नसतील तर त्यासाठी मुंबईसह अख्खा महाराष्ट्र बंद पाडू, असा एल्गार कोकणचे युवा नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी केला.
रत्नागिरी- ‘नोकरी आणि शिक्षणासाठी आरक्षण मागत आहे. तो आमचा हक्क आहे. मात्र हा आमचा हक्क आत्ताचे राज्यकर्ते देणार नसतील तर त्यासाठी मुंबईसह अख्खा महाराष्ट्र बंद पाडू. आता ही आपली आरपारची लढाई आहे. यासाठी एकत्र या, पेटून उठा आणि आरक्षण मिळवा,’ असा एल्गार कोकणचे युवा नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी केला.
रत्नागिरी शहरातील मराठा मैदानावर झालेल्या मराठा समाजाच्या मेळाव्याला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हजारो मराठा युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी निलेश राणे यांनी आरक्षणाचे महत्त्व विषद करताना या हक्कासाठी सर्वांनी पक्षीय भेदाभेद बाजूला ठेवून एकत्र यावे, असे आवाहन केले. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला रुबाबात राहायला शिकवले. आज छत्रपतींचा इतिहास आपल्याला आठवतो; पण तो रुबाब कुठे राहिला आहे. आपण राज्यात ३२ टक्के आहोत. पण राज्याच्या ग्रामीण भागातील मराठा समाज हलाखीचे जीवन जगत आहे. अनेक ठिकाणी होणा-या अडवणुकीमुळे खचू लागला आहे. त्यांचे हालअपेष्टांचे जीवन पाहूनच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मराठा समाजातल्या तरुणांच्या शिक्षण आणि नोकरीसाठी १६ टक्के आरक्षण देऊ केले. परंतु आत्ताच्या फडणवीस सरकारला त्याबाबत देणेघेणे नाही. हे सरकार मराठा समाजाचा अवमान करत आहे. मुख्यमंत्र्यांना दुस-याच्या प्रश्नांशी देणेघेणेच उरलेले नाही. ही लढाई न्यायालयात लढून जिंकता येणार नाही. त्यासाठी आता आपल्यालाच पेटून उठावे लागेल. जर गुजरातमध्ये आरक्षणासाठी पटेल समाज पेटून उठत असेल, हरियाणामधला जाट समाज हा आपल्या मागण्यांसाठी उभा राहात असेल तर मराठा आपल्या हक्कांसाठी का पेटून उठत नाही, असा सवाल निलेश राणे यांनी केला.
ते म्हणाले की, निवडणुकांमध्ये जिंकण्यासाठी, प्रसिद्धी मिळवण्यासाठी आपण हा मराठा समाजाचा जागर करत नाही तर समाजाची होणारी ओढाताण पाहून त्यांच्यासाठी काहीतरी करण्याच्या प्रेरणेतून मी उभा राहिलो आहे. ज्या समाजाने प्रतिष्ठा दिली आहे त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची ऊर्मी माझ्या मनात आहे. नारायण राणे यांनी अत्यंत कष्टाने मराठा आरक्षणाचा मसुदा तयार केला असून आपण त्याचे साक्षीदार आहोत. ते आरक्षण आज न्यायासाठी न्यायालयात पडून वाट पाहात आहे. आपल्या हक्कांसाठी प्रतीक्षा करण्याएवढे आपण दुबळे आहोत का, असा सवाल करताना श्री. राणे म्हणाले की प्रत्येकाने आता पेटून उठण्याची गरज आहे. पक्षभेद बाहेर ठेऊन समाजासाठी एकत्र येण्याची गरज आहे. आरक्षणासाठी कुणाच्या पाया पडण्यापेक्षा पाय तोडण्याच्या तयारीत राहण्याची गरज आहे. याच ध्येयाने हा महाराष्ट्राचा जागर मी करणार असून त्याची सुरुवात कोकणापासून केली आहे. यानंतर पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या भागात जाऊन तिथल्या मराठय़ांना सोबत घेऊन या आरक्षणासाठी लढणार आहे. यासाठी तुमच्या साथीची गरज आहे. येत्या ११ जुलैला विधानसभेवर मोर्चा घेऊन जायचे आहे. आपले इरादे पाहून सत्ताधारी ते तोडण्याचा प्रयत्न करणार आहेत. परंतु अडचणी आल्या तरी आता घाबरू नका, वेळ आली तर मुंबईसह महाराष्ट्र बंद करा, पण हे आरक्षण मिळवण्याचा निर्धार करा, अशा शब्दात निलेश राणे यांनी उपस्थित तरुणांच्या मनात स्फुल्लिंग फुलवले. यावेळी उपस्थित तरुण वर्गाने निलेश राणे यांच्या नावाने घोषणा देत आपण त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही दिली तर मराठा समाजाच्या नेत्यांनी आपले पाठबळ कायम सोबत असेल असेही स्पष्ट केले. यावेळी व्यासपीठावर मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार आप्पासाहेब साळवी, केशवराव भोसले, राजन देसाई, वियजराव भोसले, मधुकर दळवी, भाऊ देसाई, केवशराव इंदुलकर, सुधाकर सावंत, संभाजी ब्रिगेडचे कोकण संघटक सुधीर भोसले, दिनेश सावंत, सुनील देसाई, शशिकांत पवार, आबा सावंत, सुभाष सावंत, मंगेश शिंदे, सचिन माजळकर, दीपक सावंत, राजाभाऊ साळवी,नित्यानंद दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.