शहीद हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांचे नुकतेच निधन झाले. ‘ब्रेन डेड’ म्हणून घोषित केल्यावर त्यांच्या नातेवाइकांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे देहदानाचा निर्णय घेतला. कविता करकरेंनी या जगाचा निरोप घेतल्यानंतरही अनेकांना जीवनदान देऊन एक अनोखा आदर्श आपल्याला घालून दिला. यापूर्वीही ज्योती बसू, नानाजी देशमुखांसारख्या नेत्यांनी देहदान करून आपल्याला आधुनिक जगातून जाताना नव्या ‘मोक्षप्राप्ती’ची वाट दाखवून दिली होती. आता वाटेवर अधिकाधिक जणांनी चालणे गरजेचे आहे.
‘मरावे परि कीर्तिरूपी उरावे’ या उक्तीत आता बदल होऊन कीर्तीबरोबरच देहरूपी उरण्याची संधीही आपल्याला प्राप्त झाली आहे. अगदी सर्वसामान्य माणूसही आपल्या जगण्यात जी उंची गाठू शकला नसेल तितकी उंची मृत्यूनंतर प्राप्त करू शकतो आणि तेही देहदानासारखे पुण्यकर्म करून! पितृपक्षात आजही पितरांच्या मुक्तीसाठी कावळ्यांना नैवेद्याचे ताट दाखवले जात असले तरी आजच्या जगरहाटीबरोबर पाप-पुण्याच्या व्याख्याही बदलणे गरजेचे आहे. पुराणातली वांगी पुराणात ठेवून नव्या जगात नव्या कर्माचा विचार करावा लागणार आहे. मृत्यूपश्चात मोक्ष, पुनर्जन्म, भूत-पिशाच्च, लक्ष योनी वगैरेंसारख्या भाकड अंधश्रद्धांच्या आहारी जाण्याचे दिवस सरत चालले असून आता आपल्या प्रथा-परंपरांना असलेला खरा विज्ञाननिष्ठ संदर्भ आणि आधार अभ्यास करून पुन्हा लोकांसमोर मांडण्याचे दिवस आले आहेत. थोडक्यात सांगायचे तर आपल्या सण-उत्सवांबरोबरच अनेक प्रथा-परंपरांनाही बदलांची किंवा दुरुस्तीची (मॉडिफिकेशन) गरज निर्माण झाली आहे.
या सर्व गोष्टींचा उल्लेख करण्याचे एक कारण म्हणजे गेल्या काही दिवसांत घडलेल्या काही घटना! नुकतेच झालेले शहीद पत्नी कविता हेमंत करकरे यांचे निधन सर्वाच्या मनाला चटका लावून गेले असले तरी त्यांनी जाता जाता त्यांनी नव्या पिढीला दातृत्वापेक्षा कर्तृत्वाचा नवा आदर्श घालून दिला. शहीद हेमंत करकरेंच्या कर्तृत्वाला सारा देश सलाम करत असतानाच त्यांच्या पश्चात त्यांच्या अर्धागिनीनेही आपल्या मृत्यूनंतर देहदानासारखे पवित्र कार्य करून दाखवले. जिवंत असताना पोलिसांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरून त्यांनी लढा दिला. तो अनेकांच्या लक्षात राहिला नसला तरी त्यांचे मृत्यूपश्चातले हे कार्य मात्र त्यांना अजरामर करणारे ठरले आहे. आणखी एक उदाहरण म्हणजे, मनसेचे दादर भागातील नगरसेवक संदीप देशपांडे यांच्या वयोवृद्ध मातोश्री वसुधा देशपांडे यांचेही नुकतेच दीर्घ आजारानंतर निधन झाले. त्यांनीही देहदान करून नव्या पिढीसाठी एक आदर्श घालून दिला आहे. या दोन्ही घटनांचा विचार केला तर नव्वदीच्या दशकात देहदानाची संकल्पना रूढ होऊ लागल्यानंतर नव्या पिढीपेक्षा जुन्या पिढीने त्या संकल्पनेचा स्वीकार करण्याची ही दोन उदाहरणे वेगळी ठरतात. या दोन घटनांबरोबरच आणखी एक महत्त्वाचे उदाहरण आहे. काँग्रेसच्या नेत्या निर्मला सावंत-प्रभावळकर यांच्या तरुण मुलीचे निधन झाले. दु:खाचा डोंगर कोसळलेला असतानाही निर्मलाताईंनी स्वत:च्या मुलीच्या अवयवदानाचा निर्णय घेऊन आपल्या राजकीय कारकिर्दीपेक्षाही खूप मोठी उंची गाठली आणि आपल्या सर्वच राजकारण्यांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला. या सर्व घटनांचा विचार केला तर एक गोष्ट पहिल्यांदा लक्षात येते आणि ती म्हणजे, नव्या बदलांचा स्वीकार नव्या पिढीबरोबरच जुन्या पिढीच्या लोकांनीही करायला सुरुवात केली आहे. आधीच्या पिढीतल्या लोकांनी आपल्या आधुनिक आणि लवचिक जाणिवांचे दर्शन घडवल्याने नव्या पिढीची जबाबदारी वाढली आहे.
आज देहदान, अवयवदान, रक्तदान यासारख्या दानांचे महत्त्व समाजात वाढू लागले आहे, ही निश्चितच चांगली बाब आहे. मात्र, ज्या प्रमाणात या संकल्पनाचा स्वीकार व्हायला हवा त्यासाठीचा वेग मात्र नक्कीच नाही, हेही खेदाने नमूद करावे लागते. युरोपीय देशांमध्ये १० लाख लोकांमागे ३५ टक्के म्हणजे जवळपास साडेतीन लाख लोक अवयवदान करतात. भारतात मात्र परिस्थिती अजूनही मागासलेली आहे. आपल्या अफाट लोकसंख्येच्या देशात हे प्रमाण १० लाखांमागे ०.०५ टक्के आहे. आपल्या महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या राज्याचा विचार केला तर हे प्रमाण ०.२६ टक्के आहे. २०१२ पर्यंतच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात जेमतेम २९ दात्यांनी देहदान केले आणि त्यातून ६८ अवयव रोपण करण्याच्या शस्त्रक्रिया होऊ शकल्या. तामिळनाडूसारखे राज्य देशात याबाबत सर्वात पुढे असून तिथे ८३ दात्यांनी देहदान केले आणि त्यातून २५२ अवयव रोपणासाठी प्राप्त झाले. पण हे प्रमाणही जेमतेम १.१५ टक्के इतके आहे. मोदींच्या पुढारलेल्या गुजरातचे प्रमाणही फारसे आशादायी नाही. तिथे फक्त १८ दात्यांनी केलेल्या देहदानामुळे ४६ अवयव उपलब्ध झाले. म्हणजे ०.३० टक्के इतके प्रमाण. या सर्व आकडेवारीतून तुलना करण्यापेक्षा संपूर्ण देशात हे प्रमाण वाढण्यासाठी सरकारने पावले उचलावीत एवढाच हेतू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते नानाजी देशमुख, कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते ज्योती बसू यांनीही या जगाचा निरोप घेताना देहदानासारखे पुण्यकर्म करून नव्या पिढीला नवी दिशा दाखवली होती. आपल्याकडे दधिची मिशनसारख्या संस्था १९८८ पासून देहदानाच्या प्रबोधनासाठी झटत आहेत. त्यांना सरकारने अधिक बळ देण्याची गरज आहे.
एका व्यक्तीने देहदान केले तर तब्बल ९ जणांचे आयुष्य वाचू शकते. आपल्या देशात दररोज १५ लोकांचा अवयवांच्या कमतरतेमुळे मृत्यू होतो. त्यातच, आपल्या देशात दरवर्षी रस्ते-रेल्वे किंवा इतर अपघातांमध्ये लाखोंचा मृत्यू होत असतो. त्यात अनेक तरुणांचा समावेश असतो. या घटना दुर्दैवी असल्या तरी मृत्यूपश्चात या सर्व मृतदेहांमधून अनेकांना नव्या आयुष्याची नवसंजीवनी मिळाल्यास या जगातून जाणा-यांच्या आत्म्यांनाही शांती लाभणार नाही का? चला तर, ‘जिवंतपणी रक्तदान आणि मृत्यूनंतर देहदान’ या नव्या मोक्षप्राप्तीत आपण सहभागी होऊ या आणि आपल्या जुन्या प्रथांना नव्याने आकार देऊ या!