मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात फ्लायओव्हर किंवा बॉक्सेल उड्डाणपूल केल्यास कणकवलीच्या सौंदर्यात आणि येथील बाजारपेठेवर परिणाम होऊ शकतो.
कणकवली – मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात फ्लायओव्हर किंवा बॉक्सेल उड्डाणपूल केल्यास कणकवलीच्या सौंदर्यात आणि येथील बाजारपेठेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बायपास किंवा उड्डाणपूल न होता चौपदरीकरण कणकवलीतूनच झाले पाहिजे.
प्रसंगी ज्यांची जमीन जात असेल त्यांचे पुनर्वसन कसे करावे, त्या नागरिकांची पुनर्वसनाबाबतची मागणी काय आहे, हे सांगा. मात्र महामार्ग कणकवली बाहेरून गेल्यास शहराचे फार मोठे नुकसान होईल, असे स्पष्ट मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी व्यक्त केले.
रस्ते बांधकाम विभागाच्या चीफ इंजिनीयरशी आपण चौपदरीकरणाविषयी तातडीने बोलून घेऊ आणि कोणत्याही प्रकारचे उड्डाणपूल न ठेवता कणकवलीतून चौपदरीकरण करण्यासंदर्भातल्या सूचना देऊ व तशा पद्धतीने चौपदरीकरणाचा प्लानही बनविण्यास सांगू, असे आश्वासन राणे यांनी दिले. या वेळी त्यांच्यासोबत कणकवलीचे आमदार नितेश राणेही उपस्थित होते.
कणकवली नगरपंचायतीला राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी भेट देऊन नगरपंचायतीच्या कामकाजाची माहिती घेतली. या वेळी व्यापा-यांच्या एका शिष्टमंडळाने नारायण राणे यांची भेट घेऊन शहरातील काही समस्यांविषयी चर्चा केली. या चर्चेदरम्यान नव्याने होत असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा विषय आला.
बॉक्सेल ब्रीज कणकवलीत बांधले जाणार असल्याची माहिती बांधकामच्या अधिका-यांनी दिली असल्याचे व्यापा-यांनी राणे यांना सांगितले. या अनुषंगाने माहिती देताना राणे म्हणाले, राज्यातले आणि देशातले अनेक उड्डाणपूल पाहिल्यानंतर ज्या शहरात उड्डाणपूल झाले त्या शहराचे महत्त्व आणि सौंदर्य संपले. बाजारपेठेतील ग्राहक वर्गही कमी होतो.
या सगळ्या गोष्टींचा विचार करता कणकवलीत बॉक्सेल किंवा फ्लायओव्हर अशा कोणत्याही प्रकारचे उड्डाणपूल झाल्यास शहराला हानी पोहोचेल. त्यामुळे कणकवलीतून चौपदरीकरण जात असताना कोणतेही पूल न होता, ते नेहमीच्या रस्त्यावरूनच झाले पाहिजेत. रुंदीकरणात दोन्ही बाजूच्या नागरिकांची जागा हस्तांतरित होईल.
त्यांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन करण्याबाबत आपण आग्रही राहू. व्यापारी, नगरपंचायतीने जमीन मालकांचे पुनर्वसन कसे व्हावे, ते सांगावे. काही लोकांना जादा एफएसआय देण्याबाबतही आपण वरिष्ठ अधिका-यांशी बोलून प्रयत्न करू. मात्र कणकवलीला वगळून बायपास झाला किंवा ओव्हर ब्रीज होऊन चौपदरीकरण झाले तर ते चालणार नाही, असे राणे यांनी स्पष्ट केले. या चर्चेत व्यापारी संघाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
या चर्चेदरम्यानच बाजारपेठ चांगली आणि सुंदर दिसण्यासाठी व्यापा-यांनी मानसिकता बदलावी आणि नवे धोरण स्वीकारावे. बाजारपेठेत स्वच्छतागृह बांधण्यासाठी जमीन उपलब्ध करून द्यावी. मी स्वत:च्या पैशाने स्वच्छतागृह बांधून देईन, असे त्यांनी सांगितले. जनतेसाठी राखून ठेवलेल्या भूखंडावर कोण व्यक्तिगत बांधकाम करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. ते तातडीने नगरपंचायतीने काढावे, अशा सूचनाही राणे यांनी या वेळी दिल्या. कणकवलीचा बहुतांश भाग हा ग्रीन झोनमध्ये आलेला आहे. मात्र कणकवली क्षेत्राच्या बाहेरील सर्वच भाग ग्रीन झोनच असल्यामुळे पर्यावरण खात्याकडून हा ग्रीन झोन कमी करून मिळू शकतो.
त्यामुळे तशा पद्धतीचा पत्रव्यवहार करावा, अशा सूचना राणे यांनी नगराध्यक्ष अॅड. प्रज्ञा खोत यांना दिल्या. अनधिकृत फेरीवाल्यांसाठी काही निकष ठरवा. मात्र प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक व्यापार हा स्थानिक युवकांच्या हाती असावा, यासाठी व्यापारी संघाने प्रयत्न करावेत, असेही राणे यांनी सूचित केले. या वेळी नगराध्यक्ष अॅड. प्रज्ञा खोत, उपनगराध्यक्ष समीर नलावडे, मुख्याधिकारी तावडे, नगरसेवक रूपेश नार्वेकर आदी उपस्थित होते.