मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. प्रशासकीय स्तरावरून यासंदर्भात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.
चिपळूण- मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. प्रशासकीय स्तरावरून यासंदर्भात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांमार्फत स्थानिक अधिका-यांना आदेश आल्याने भूसंपादनासाठी तातडीने हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत नगर परिषद, महावितरण, बीएसएनएल आणि महसूल प्रशासनाला यासंदर्भात पत्रव्यवहार सुरू झाला आहे.
गेली अनेक वर्षे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा विषय गाजत आहे. याआधीच्या केंद्र सरकारकडे माजी खासदार निलेश राणे यांनी जोरदार पाठपुरावा केला. अखेर या चौपदरीकरणासाठी निधीची तरतूद झाली आहे. यानंतर पुढच्या टप्प्यालादेखील गती मिळाली आहे. चिपळूण महामार्ग विभागांतर्गत येणा-या कशेडी ते खेरशेत या १५२ कि.मी.च्या रस्त्यासाठी आता जोरदारपणे हालचाली सुरू झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात खेड व चिपळूण येथील प्रांताधिका-यांना राष्ट्रीय बांधकाम विभागाने भूसंपादन करण्यासाठी सर्वेक्षण व व्हॅल्युएशन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याचप्रमाणे महावितरण कंपनीलादेखील चौपदरीकरणामध्ये अडथळा ठरणारे विद्युत खांब, वीजवाहिन्या यांचे सर्वेक्षण करून अंदाजपत्रक द्यावे. तसेच बीएसएनएलच्या अधिका-यांनादेखील याचसंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
येत्या ३० जूनपर्यंत हे सर्वेक्षण करावे आणि राष्ट्रीय बांधकाम विभागाला अंदाजपत्रक सादर करावे, अशा आशयाचे पत्र दिले आहे. त्यामुळे आता चौपदरीकरणाच्या कामाला गती मिळणार आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत भूसंपादनाच्या सर्वेक्षण व पुढील कार्यवाहीसाठी खासगी कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे.
राष्ट्रीय बांधकाम विभागाचे अभियंता एस. बी. सोनावणे यांनी यासंदर्भात बीएसएनएल, महावितरण व महसूल अधिका-यांना पत्रव्यवहार केला आहे. खेड व चिपळूण प्रांताधिका-यांनी चौपदरीकरणासाठी भूसंपादनाचे सर्वेक्षण व मूल्यमापन तात्काळ करण्यात येईल, असेही सांगितले आहे. त्यामुळे चौपदरीकरणाच्या प्रक्रियेला आता गती मिळाली आहे.