तिघा अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील मुरमाडी येथे उघडकीस आली होती. या घटनेला तब्बल महिना उलटला तरी अद्याप आरोपींबद्दल काहीएक माहिती मिळाली नसल्याची कबुली गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिली.
मुंबई- तिघा अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांची हत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील मुरमाडी येथे उघडकीस आली होती. या घटनेला तब्बल महिना उलटला तरी अद्याप आरोपींबद्दल काहीएक माहिती मिळाली नसल्याची कबुली गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिली. सोमवारी विधानसभेत राजकुमार बडोळे, संजय राठोड, बास्कर रायमुलकर व नरेंद्र भोंडेकर आदी सदस्यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली.
गेल्या महिन्यात १४ ते १६ तारखेदरम्यान मुरमाडी येथे तीन सख्ख्या बहिणींवर बलात्कार करून त्यांची हत्या केल्याच्या घटनेने खळबळ माजली होती. याप्रकरणी आरोपींबद्दल केलेल्या चौकशी व कारवाईबाबत सदस्यांनी प्रश्न विचारला होता.
या प्रश्नावरील लेखी उत्तरात तपास सुरू असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. मात्र बलात्कार झाला किंवा नाही काहीएक सांगण्यात आलेले नाही. या प्रकरणात वैद्यकीय तपासणी अहवाल व रासायनिक प्रयोगशाळा अहवालाबद्दल तज्ज्ञांचे मत घेण्यात आल्याचे उत्तरात सांगण्यात आले. या प्रकरणाच्या तपासासाठी जिल्ह्यातील ६० पोलिस अधिका-यांचे पथक तयार करण्यात आले असून त्यांच्याकडून सराईत गुन्हेगार, मृत मुलींच्या वर्गमैत्रिणी, शेजारी व नातेवाइकांची चौकशी करण्यात आली.
घटनास्थळाबरोबर संशयित घर, वाहनांचीही तपासणी करण्यात आली. तसेच मानसशास्त्रज्ञांच्या मदतीने लहान मुलांकडे विचारपूस करण्यात आल्याचेही गृहमंत्र्यांनी सांगितले.