वेंगुर्ले कॅम्प येथील काथ्या कारखान्यामध्ये महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेच्या वतीने आज हळदीकुंकू व स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता.
वेंगुर्ले- महिला सक्षम झाल्या तर आपला देश सक्षम होईल आणि आर्थिक सुबत्ता वाढेल. त्यामुळे महिलांनी केवळ ५० टक्के आरक्षणानुसार निवडणुका व स्वयंसेवी संस्थांमध्ये काम करण्यापुरते मर्यादित न राहता स्वत: आर्थिकदृष्टय़ा सक्षम होण्यासाठी प्रयत्न करावेत. आपल्या कुटुंबाला आपल्याकडून लाभलेला हातभार मनाला उभारी देणारा असतो, हे लक्षात ठेवावे. हळदीकुंकू व मेळाव्याच्या माध्यमातून महिलांमधील कलागुणांचे दर्शन झाले. त्यांना योग्य व्यासपीठ व योग्य मार्गदर्शन करणारे एम. के. गावडे व प्रज्ञा परब यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेबांप्रमाणे या दोघांचे येथील प्रत्येक कुटुंबाचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न वाखाण्याजोगे असल्याचे प्रतिपादन जिजाऊ प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. निलमताई राणे यांनी केले.
वेंगुर्ले कॅम्प येथील काथ्या कारखान्यामध्ये महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेच्या वतीने आज हळदीकुंकू व स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना सौ. राणे बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ संपादिका मिराताई जाधव, काँग्रेसच्या माजी महिला जिल्हाध्यक्षा तथा जिल्हा बँकेच्या संचालिका प्रज्ञा परब, वेंगुर्ले पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी माधुरी परीट, जि. प.सदस्या दीपलक्ष्मी पडते, वंदना किनळेकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन एम. के. गावडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
गटविकास अधिकारी परिट यांनी महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा फायदा करून घ्यावा असे आवाहन केले. यावेळी अन्य वक्त्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी घेण्यात आलेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमात गीता परब, श्रृती रेडकर, सुषमा भगत, समिधा सावंत, मयुरी नंदगडकर, मीनल साटेलकर, पारकर यांच्यासह कारखान्यातील कर्मचा-यांनी व अन्य महिलांनी वेगवेगळे कार्यक्रम सादर करून आपली कला दाखविली.
दरम्यान प्रास्ताविकपर मार्गदर्शन नात एम. के. गावडे यांनी आम्ही जिल्ह्यात राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच महिलांना सक्षम करण्यासाठी कॉयर व फळप्रक्रिया यांच्या माध्यमातून कसे कार्यक्रम घेतले जात आहेत याचीही माहिती देवून महिलांनी अशा स्वयंरोजगारातून स्वत:च्या पायावर उभे रहावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाला माजी सभापती सारिका काळसेकर, सूर्यकांता संस्थेच्या चेअरमन माधवी गावडे, माजी नगरसेविका प्रवीणा खानोलकर तसेच संध्या तेरसे यांच्यासह जिल्ह्यातील विविध संस्थांमधील महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत व आभार परब यांनी मानले.