महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर करुन ते राज्यांमध्ये लागू करण्यासाठी काँग्रेस कटीबद्ध असल्याचे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सांगितले.
नवी दिल्ली- महिला आरक्षण विधेयक संसदेत मंजूर करुन ते देशातील राज्यांमध्ये लागू करण्यासाठी काँग्रेस कटीबद्ध असल्याचे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सांगितले. हे विधेयक राज्यसभेत मंजूर झाले आहे. मात्र, ते लोकसभेत मंजूर झालेले नाही. त्यामुळे आम्ही एनडीए सरकारवर हे विधेयक लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी दबाव आणू, असे त्या म्हणाल्या.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या ७०व्या जयंतीनिमित्त तालकटोरा मैदान येथे झालेल्या संकल्प दिवस निमित्त आयोजित केलेल्या महिला काँग्रेसच्या मेळाव्यात बोलताना सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टिका केली. मोदी आणि भाजपच्या खोट्या आश्वासनांना भूलून जनतेने भाजपला मतदान केले. आम्ही खूप कामे केलेली आहेत. निर्मल भारत अभियान, मनेरगा या योजना काँग्रेसने सुरु केल्या. मात्र काही लोकांनी दिशाभूल केल्याने आम्ही जाळ्यात अडकलो. आमच्या योजना आणि कामाचे श्रेय आता आलेले नवे सरकार घेत आहे, असे सोनिया यांनी सांगितले.
राजीव गांधी यांनी महिलांच्या सबलीकरणासाठी योजना आखली होती. काँग्रेसचे सरचिटणीस असताना त्यांनी देशातल्या ५० टक्के लोकसंख्येकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, असे म्हटले होते. राजीव यांच्या धोरणात्मक नियोजनामुळेच महिलांना पंचायतीमध्ये आरक्षण मिळाले आहे. राष्ट्रीय महिला आयोग हे सुद्धा राजीवजींनी महिलांच्या हक्कांसाठी दिलेली भेट आहे. विधानसभा आणि संसदेतही महिलांना मोठ्या प्रमाणावर नेतृत्व मिळायला हवे, असे राजीव यांचे स्वप्न होते, असे त्या म्हणाल्या. मात्र दुर्दैवाने, राजीव यांच्या मृत्यूनंतर याकडे कोणीही लक्ष दिले नाही.
काही विरोधी पक्षांनी विरोध केल्याने हे विधेयक लोकसभेत मंजूर होऊ शकले नाही. आम्ही आता विरोधात असलो तरी राज्यसभेत मंजूर झालेले महिला आरक्षण विधेयक लोकसभेत लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सोनिया यांनी यावेळी सांगितले.