आमच्या मागण्या मान्य केल्या तरच बैठकीला येऊ, आम्हाला केवळ दिखाऊपणा करण्यात रस नाही, असा इशारा काँग्रेसने मोदी सरकारला दिला आहे.
नवी दिल्ली- ललित मोदी प्रकरणी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे व व्यापमंप्रकरणी मुख्यमंत्री शिवराज सिंह यांच्यावर सरकारने कारवाई न केल्याने काँग्रेसने कठोर भूमिका घेऊन संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आपली ताकद दाखवून दिली आहे.
या अधिवेशनात दोन आठवडे कामकाज न झाल्याने मोदी सरकार घायकुतीला आले आहे. सरकारने सोमवारी सर्वपक्षीय बोलवली आहे. मात्र, आमच्या मागण्या मान्य करत असाल तरच बैठकीला येऊ, आम्हाला केवळ दिखाऊपणा करण्यात रस नाही, असा इशारा काँग्रेसने मोदी सरकारला दिला आहे.
पक्षाचे वरिष्ठ प्रवक्ते आनंद शर्मा म्हणाले की, आम्ही फोटो काढण्यात, चहा किंवा सँडवीच खाण्यात कोणताही रस नाही. आमच्या मागण्यांवर कोणती कारवाई करणार हे पंतप्रधानांनी आधी जाहीर करावे. पंतप्रधान मोदींच्या अहंकार व हटवादीपणामुळे आणि मौन न सोडण्याच्या भूमिकेमुळे संसदेचे कामकाज ठप्प आहे.
केवळ बैठकीसाठी येण्यास कॉँग्रेसला कोणताही रस नाही. पंतप्रधानांनी आम्ही केलेल्या मागण्यांवर कृती करावी. त्यामुळे लोकसभा व राज्यसभेत २१ जुलैपासून कामकाज होऊ शकले नाही. संसदेचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी पंतप्रधान कोणतेचे प्रयत्न करत नाही, असा आरोप त्यांनी केला.
पंतप्रधानांना ‘मौन व्रत’ थांबवण्यासाठी विरोधकांना मागणी करावी लागते ही दुर्दैवाची बाब आहे. सत्ताधारी पक्षाला शहाणपण आल्यास संसदेचे काम सुरळीत चालू शकते, असे संकेत शर्मा यांनी दिले.
सरकारने गुरुवारी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. मात्र, त्याला कॉँग्रेसने अनुपस्थिती दाखवल्याने ती पुढे ढकलावी लागली. आता संसदीय कार्यमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे.
कॉँग्रेस व विरोधी पक्षांनी स्वराज व राजे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. तसेच व्यापमं घोटाळ्याप्रकरणी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनाही कॉँग्रेसने लक्ष्य केले आहे.
राज्यसभा ठप्पच
स्वराज, राजे, चौहान यांच्या राजीनाम्यावर कॉँग्रेस ठाम असल्याने राज्यसभेचे काम अजून ठप्पच आहे. शुक्रवारीही राज्यसभेत कोणतेच कामकाज होऊ शकले नाही. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात येऊन चौहान यांच्यावर काय कारवाई करणार याची माहिती द्यावी.
मात्र, सत्ताधारी भाजपाने त्यांची मागणी फेटाळून लावली. दिवसभर सातत्याने गदारोळ सुरू असल्याने दुपारी २.३५ वाजता सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
राज्यसभेचे उपाध्यक्ष पी. जे. कुरियन म्हणाले की, सत्ताधारी व विरोधकांनी ऐक्याची भूमिका घ्यावी आणि संसदेत निर्माण झालेला तिढा सोडवावी अशी मागणी त्यांनी केली.