पावसाळी कालावधीत ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याकरिता मालवण पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे.
मालवण- मान्सून कालावधीत साथरोग उद्भवल्यास यावरती तात्काळ नियंत्रण आणण्यासाठी तसेच पावसाळी कालावधीत ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याकरिता मालवण पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच तालुक्यातील सर्व ६३ ग्रामपंचायतींना पत्र पाठवित योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा झाल्यास विविध जलजन्य व कीटकजन्य आजारास प्रतिबंध होऊ शकतो. यामुळे साथरोगाला आळा बसू शकतो. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची स्वच्छता करावी. पाणीपुरवठा स्रोतांचा परिसर स्वच्छ ठेवावा.
शुद्धीकरणासाठी पुरसो टीसीएल पावडरचा साठा उपलब्ध करावा. ३३ टक्के क्लोरिनयुक्तच टीसीएल पावडर खरेदी करावी. टीसीएल खरेदी करताना पुरवठादाराकडून प्रयोगशाळा अहवाल घेतल्यानंतरच खरेदी करण्यात यावे. टीसीएल पावडर पिशवीवर प्रमाणक क्रमांक व उत्पादन दिनांक आहे की नाही, याची खात्री करावी. उपलब्ध करण्यात आलेला टीसीएल साठा हवाबंद खोलीत ठेवावा.
जबाबदार व प्रशिक्षित व्यक्तीकडूनच त्याची हाताळणी करावी. दरमहा पाणी स्रोतांचे नमुने तपासणीसाठी जिल्हा प्रयोगशाळेकडे पाठवावेत. दूषित पाणी स्रोतांचे शुद्धीकरण करून पाणी नमुना तालुका प्रयोगशाळेजवळ पाठवावेत. दैनंदिन पाणी शुद्धीकरणानंतर ओटी परीक्षण करावे, अशा सूचना स्वच्छ पाण्याबाबत देण्यात आल्या आहेत.
मान्सून कालावधीत आवश्यक असणारा औषधसाठा सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना उपलब्ध करण्यात आला आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रावर साथरोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. या ठिकाणी खास कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून या कर्मचा-यांमार्फत आरोग्य केंद्रांतर्गत येणा-या गावांवर लक्ष ठेवले जाणार आहे.
जोखीमग्रस्त गावांमध्ये आरोग्य विभागाचा खास लक्ष राहणार आहे. या गावांमध्ये साथरोग उद्भवू नये, याकरिता विशेष उपाययोजना केल्या जाणार आहेत. एकंदरीत मान्सून कालावधीत साथरोग नियंत्रणासाठी पंचायत समितीचा आरोग्य विभाग व तालुका आरोग्य कार्यालय सज्ज झाले आहे.