पुणे सुपरजायंटवर एका धावने विजय मिळवत आयपीएल-१०चे जेतेपद पटकावले. त्यांचे हे तिसरे जेतेपद आहे. मुंबईने ‘फायनल’मध्ये बाजी मारताना आधीच्या तिन्ही पराभवांची सव्याज परतफेड केली.
हैदराबाद – रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सनी अंतिम फेरीत रविवारी रायझिंग पुणे सुपरजायंटवर एका धावने विजय मिळवत आयपीएल-१०चे जेतेपद पटकावले. त्यांचे हे तिसरे जेतेपद आहे. मुंबईने ‘फायनल’मध्ये बाजी मारताना आधीच्या तिन्ही पराभवांची सव्याज परतफेड केली.
उप्पलमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेला अंतिम सामना गोलंदाजांनी गाजवला. त्यात माजी विजेता मुंबई इंडियन्सचे गोलंदाज सरस ठरले. शेवटच्या षटकात पुण्याला जिंकण्यासाठी ११ धावांची आवश्यकता होती. मात्र वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने नऊ धावा दिल्या. तसेच दोन विकेट घेतल्या. मनोज तिवारीने पहिल्या चेंडूंवर स्क्वेअर लेगला चौकार ठोकला खरा. मात्र पुढच्याच चेंडूवर लाँगऑनवरून फटका मारण्याचा प्रयत्न फसला आणि पोलार्डने त्याचा झेल टिपला. तिस-या चेंडूवर पुण्याचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ बाद झाला. त्याने स्वीपर कव्हरला अंबाती रायुडूकडे सोपा झेल दिला. वॉशिंग्टन सुंदरने जॉन्सनची हॅट्ट्रिक वाचवली. शेवटच्या चेंडूवर जिंकण्यासाठी चार धावा हव्या असताना वॉशिंग्टन सुंदर आणि डॅनियल ख्रिस्तियन जोडीला दोन धावा काढता आल्या. तिसरी धाव घेऊन सामना ‘टाय’ करण्याच्या प्रयत्नात सुंदर धावचीत झाला आणि मुंबईने एका धावेने सामना जिंकला.
पुण्यातर्फे कर्णधार स्मिथ (५० धावांत ५१ धावा) आणि सलामीवीर अजिंक्य रहाणेने (३८ चेंडूंत ४४ धावा) चमकदार फलंदाजी केली तरी मिचेल जॉन्सनसह (३ विकेट) जसप्रीत बुमराच्या (२ विकेट) अचूक आणि प्रभावी गोलंदाजीसमोर सलामीवीर राहुल त्रिपाठीसह (३), महेंद्रसिंग धोनी (१०), मनोज तिवारी (७) या प्रमुख फलंदाजांनी निराशा केल्याने १३० धावांचे आव्हानही पुण्यासाठी डोंगराएवढे ठरले. तत्पूर्वी, मुंबईच्याही प्रमुख फलंदाजांनी निराशा केली. मात्र कृणाल पंडय़ाने ३८ चेंडूंत ४७ धावा करताना मुंबईला १२९ धावांपर्यंत पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला. हार्दिकलाच सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
यंदाच्या हंगामात मुंबई आणि पुणे तब्बल चार वेळा आमनेसामने आले. साखळीतील दोन्ही (होम आणि अवे) सामन्यासह ‘प्ले-ऑफ फेरी’तही (क्वालिफायर १) मुंबईला पराभव पाहावा लागला. त्यामुळे अंतिम सामन्यांची उत्सुकता होती. परंतु, मुंबईने ‘फायनल’मध्ये मागील तिन्ही पराभवांची सव्याज परतफेड केली. चौथ्यांदा अंतिम फेरीत खेळताना विक्रमी तिसरे जेतेपद पटकावले. आयपीएलच्या इतिहासात तीन जेतेपदे जिंकणारा मुंबई पहिला संघ ठरला आहे.