हैदराबादच्या केंद्रीय विद्यापीठातील रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्यांच्या आत्महत्येप्रकरणी निषेध नोंदवण्यासाठी रविवारी मुंबईत ‘राजगृह ते चैत्यभूमी’ असा मूकमोर्चा काढण्यात आला होता.
मुंबई – हैदराबादच्या केंद्रीय विद्यापीठातील रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्यांच्या आत्महत्येप्रकरणी निषेध नोंदवण्यासाठी रविवारी मुंबईत ‘राजगृह ते चैत्यभूमी’ असा मूकमोर्चा काढण्यात आला होता.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मूकमोर्चात मोठय़ा प्रमाणावर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते सहभागी झाले होते. ‘मी मागासवर्गीय आहे म्हणून मला मारणार का?’ असा सवाल मोर्चातील फलकाद्वारे आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.
या मोर्चात काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई, माजी राज्यमंत्री सचिन अहिर, शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्यासह विविध पुरोगामी संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
मुंबईसह देशभरात रोहितच्या आत्महत्येचे पडसाद उमटत आहेत. अनेक ठिकाणी मार्चे, आंदोलनातून विविध संघटना व राजकीय पक्ष आपला निषेध नोंदवत आहेत. रविवारी निघालेला मोर्चा हा कोणत्या पक्ष वा संघटनेचा नव्हता. दादरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’ या इमारतीपासून मोर्चास सुरुवात झाली. यात आंदोलनकर्त्यांनी तोंडावर काळी पट्टी बांधली होती. टिळक ब्रिज, प्लाझा सिनेमा, शिवाजी पार्कमार्गे मोर्चा चैत्यभूमीवर पोहोचला. मोर्चात शेकडो कार्यकर्ते सहभागी
झाले होते.
देशातील सामाजिक न्यायाचे भवितव्य अंधारात
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार एकीकडे बाबासाहेबांचे गुणगान गात आहे. तर दुसरीकडे दलित, आदिवासींचे अधिकार काढून घेण्याचे कारस्थान रचत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. लोकसभेचे अध्यक्ष जर आरक्षणविरोधात बोलत असतील, तर या देशातील सामाजिक न्यायाचे भवितव्य अंधारात आहे, अशी टीका आव्हाड यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केली.