गेल्या ११ वर्षात केवळ तीन हजार इमारतींमध्ये पर्जन्य जलसंचयन प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
मुंबई – पावसाचे पाणी साठवून गरज असेल तेव्हा त्याचा वापर करता यावा यासाठी मुंबईतील प्रत्येक इमारतीत २००२पासून पर्जन्य जलसंचयन प्रकल्प (रेन वॉटर हार्वेस्टिंग) राबवणे बंधनकारक करण्यात आले. मात्र गेल्या ११ वर्षात केवळ तीन हजार इमारतींमध्ये या प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. बांधकामांत या प्रकल्पाचा अंतर्भाव केल्यानंतरच महापालिकेच्या इमारत व प्रस्ताव विभागाने भोगवटा प्रमाणपत्र (ऑक्युपेशन सर्टीफिकेट) दिले असले तरी यातील प्रत्यक्षात किती इमारतींमध्ये हे प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत, याची माहिती अधिका-यांकडेही नाही. त्यामुळे महापालिकेने या प्रकल्पाची काटेकोर अंमलबजावणी केली नसल्याचे दिसून आले आहे.
मुंबईतील १००० चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या जागेवर उभ्या राहणा-या बांधकामांना हा प्रकल्प बंधनकारक करण्यात आला होता. मात्र त्यानंतर राज्य सरकारने या आदेशात बदल करत २००७ पासून ३०० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवरील इमारतीचा पुनर्विकास अथवा जागेचा विकास करताना ही योजना राबवण्याचा नियम केला. या इमारतींमध्ये या प्रकल्पाची अंमलबजावणी झाल्याची खात्री केल्यानंतरच भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येते. त्याप्रमाणे फेब्रुवारी २०१३पर्यंत हा प्रकल्प कार्यान्वित करणा-या ३,१४४ इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती इमारत प्रस्ताव विभागाचे उपप्रमुख अभियंता सं. वा. अणावकर यांनी दिली. गेल्या दहा वर्षात इमारतींच्या बांधकामांमध्ये झपाट्याने वाढ होत असताना केवळ कागदावरच या योजना दाखवून भोगवटा प्रमाणपत्र मिळवण्याचे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत. त्यामुळे सध्या तीन हजार इमारतींमध्ये हा प्रकल्प बसवल्याचा दावा प्रशासकीय अधिकारी करत असले, तरी अनेक ठिकाणी हा प्रकल्प कार्यान्वित नसल्याची माहिती पुढे आली आहे.
[poll id=”131″]
महापालिकेच्या केवळ २०४ मालमत्तांमध्येच प्रकल्प
महापालिकेने पाण्याची बचत करण्यासाठी आपल्या मालमत्तांमध्येही रेन वॉटर हार्वेस्टिंग राबवण्याचा निर्णय घेतला. मात्र या तीन वर्षात विविध उद्याने, मैदाने, महापालिका रुग्णालये, शालेय इमारती, महापालिका कार्यालये आदींसह २०४ मालमत्तांमध्ये या योजनेची अंमलबजावणी केली आहे, तर १२ ठिकाणी याबाबतचे स्वतंत्र प्रकल्प राबवण्यात आले असल्याची माहिती रेन वॉटर हार्वेस्टिंग सेलच्या प्रमुख अभियंता सुप्रभा मराठे यांनी दिली आहे.
शहर | ४२ |
पूर्व उपनगर | ५९४ |
पश्चिम उपनगर | २५३० |