आयपीएलच्या दहाव्या हंगामाचा अंतिम सामना रविवारी (२१ मे) हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (उप्पल) रंगेल.
हैदराबाद- आयपीएलच्या दहाव्या हंगामाचा अंतिम सामना रविवारी (२१ मे) हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (उप्पल) रंगेल. चौथ्यांदा अंतिम फेरी गाठणा-या माजी विजेता मुंबई इंडियन्सला तिस-यांदा जेतेपदाची संधी आहे. मात्र त्यांच्यासमोर रायझिंग पुणे सुपरजायंटचे आव्हान आहे. यंदाच्या हंगामात तब्बल चौथ्यांदा उभय संघ आमनेसामने आलेत.
मुंबई संघ चौथ्यांदा ‘फायनल’मध्ये खेळतोय. आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा अंतिम फेरीत खेळणारा तो दुसरा संघ आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक सहा वेळा ‘फायनल’मध्ये खेळण्याचा मान माजी विजेता चेन्नईला जातो. त्यांनी सहा प्रयत्नात दोन जेतेपदे पटकावली. मुंबईने पुण्याला हरवल्यास सर्वाधिक तीन वेळा जेतेपद जिंकणारा तो पहिला संघ ठरेल.
पुणे संघाने प्रथमच अंतिम फेरी गाठली आहे. पहिल्या प्रयत्नात आयपीएल ट्रॉफी जिंकल्यास ते माजी विजेता राजस्थान रॉयल्ससह (२००८) डेक्कन चार्जर्स (२००९), कोलकाता नाईट रायडर्स (२०१२) आणि गतविजेता सनरायझर्स हैदराबादच्या (२०१६) पंक्तीत बसतील. अंतिम फेरीत खेळण्याचा अनुभव रोहित शर्मा आणि सहका-यांना फायदेशीर ठरू शकतो. मात्र दहाव्या हंगामातील कामगिरी पाहता पुण्याचे पारडे जड वाटते. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई आणि पुणे संघ एक-दोन नव्हे तर तब्बल चार वेळा आमने सामने आलेत. त्यात तीन वेळा जिंकून पुण्याने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. यंदाच्या हंगामातील कामगिरी पाहता पुण्याचे पारडे जड वाटते. साखळीमध्ये (राऊंड-रॉबिन) प्रत्येक संघ दोन सामने खेळतोच. त्यात ‘होम’ आणि ‘अवे’मध्ये पुणे सरस ठरले. त्यानंतर बाद फेरीतील (प्ले ऑफ) पहिल्या सामन्यात (क्वालिफायर १) पुन्हा मुंबई-पुणे आमनेसामने आले. त्यातही पुण्याने बाजी मारली. मात्र ‘क्वालिफायर १’मधील पराभूत संघाला आणखी एक संधी असते. मुंबईने ‘क्वालिफायर २’मध्ये कोलकात्याला हरवत अंतिम फेरी गाठली. कोलकात्यावरील मोठय़ा विजयामुळे मुंबईला मागील तीन पराभवांचा वचपा काढण्याची संधी आहे.
मुंबई इंडियन्सने सर्वाधिक विजय मिळवत साखळीत चमकदार कामगिरी केली आहे. उंचावलेली सांघिक कामगिरी हे त्यांचे प्रमुख वैशिष्टय़ आहे. कर्णधार रोहित शर्मासह सलामीवीर पार्थिव पटेल, नितीश राणा आणि किरॉन पोलार्डने फलंदाजीत महत्त्वपूर्ण योगदान दिले तरी अष्टपैलू हार्दिक पंडय़ा आणि कृणाल पंडय़ानेही उपयुक्त फलंदाजी केली आहे. एकूणच मुंबईच्या फलंदाजीत ‘डेप्थ’ आहे. जसप्रीत बुमरा आणि मिचेल मॅकक्लेनॅघन या मध्यमगती दुकलीने अचूक आणि प्रभावी मारा करताना गोलंदाजीची धुरा पेलली आहे. अनुभवी ऑफस्पिनर हरभजन सिंगला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नसली तरी लेगस्पिनर करन शर्मा आणि डावखुरा फिरकीपटू कृणाल पंडय़ाने त्याची उणीव भरून काढली. दुसरा हंगाम खेळणा-या रायझिंग पुणे सुपरजायंटचीही दोन्ही आघाडय़ांवरील कामगिरी सवरेत्कृष्ट आहे. कर्णधार स्मिथसह सलामीवीर राहुल त्रिपाठी, अष्टपैलू बेन स्टोक्स, मनोज तिवारी आणि अजिंक्य रहाणेने चांगली फलंदाजी केली आहे. मध्यमगती गोलंदाज जयदेव उनाडकटसह शार्दूल ठाकूर, लेगस्पिनर इम्रान ताहीर, अष्टपैलू बेन स्टोक्स आणि ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदरने प्रभावी मारा करताना सांघिक कामिगरी उंचावण्यात खारीचा वाटा उचलला आहे.
तगडी फलंदाजी आणि प्रभावी मारा पाहता मुंबई आणि पुणे संघातील अंतिम लढत रंगतदार अपेक्षित आहे.
पुण्याचे पारडे जड
यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई आणि पुणे संघ एक-दोन नव्हे तर तब्बल चार वेळा आमने सामने आलेत. त्यात तीन वेळा जिंकून पुण्याने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. स्पर्धेतील कामगिरी पाहता पुण्याचे पारडे जड वाटते. साखळीमध्ये (राऊंड-रॉबिन) प्रत्येक संघ दोन सामने खेळतोच. त्यात ‘होम’ आणि ‘अवे’मध्ये पुणे सरस ठरले. त्यानंतर बाद फेरीतील (प्ले ऑफ) पहिल्या सामन्यात (क्वालिफायर १) पुन्हा मुंबई-पुणे आमनेसामने आले. त्यातही पुण्याने बाजी मारली. मात्र क्वालिफायर १ मधील पराभूत संघाला आणखी एक संधी असते. मुंबईने क्वालिफायर २ मध्ये कोलकात्याला हरवत अंतिम फेरी गाठली.
सर्वाधिक षटकार मॅक्सवेलचे, वॉर्नरचे सर्वाधिक चौकार
आयपीएलच्या दहाव्या आवृत्तीत सर्वाधिक षटकार ठोकण्याचा मान किंग्ज इलेवन पंजाबचा कर्णधार ग्लेन मॅक्सवेलला जातो. त्याने १४ सामन्यांत २६ षटकार लगावलेत. सर्वाधिक चौकार गतविजेता सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने मारलेत. त्याने १४ सामन्यांत ६३ चौकार ठोकलेत. वॉर्नरच्या आसपास कुणीच पोहोचण्याची शक्यता नाही. त्यामुळे सर्वाधिक चौकार त्याच्याच नावावर राहणार, हे निश्चित. वास्तविक पाहता वॉर्नरने मॅक्सवेलइतकेच २६ षटकार ठोकलेत. मात्र सरासरीत मॅक्सवेल आघाडीवर आहे. सर्वाधिक षटकार ठोकण्यात तिस-या स्थानी दिल्ली डेअरडेव्हिल्सचा रिषभ पंत (१४ सामन्यांत २४ षटकार), चौथ्या स्थानी कोलकाता नाईट रायडर्सचा रॉबिन उथप्पा (१४ सामन्यांत २१ षटकार) आणि पाचव्या स्थानी मुंबईचा किरॉन पोलार्ड (१६ सामन्यांत २१ षटकार) आहे. यापैकी रिषभ आणि उथप्पाचे आव्हान संपुष्टात आले आहे. पोलार्डला अंतिम सामन्याच्या रूपाने आणखी एक संधी आहे. मात्र मॅक्सवेलला मागे टाकण्यासाठी त्याला किमान सहा षटकार ठोकावे लागतील. पोलार्ड अशी करामत करून दाखवेल?
ऑरेंज कॅप वॉर्नरकडे आणि पर्पल कॅप भुवनेश्वरकडेच राहणार
गतविजेता सनरायझर्स हैदराबादला जेतेपद राखता आले नसले तरी कर्णधार डेव्हिड वॉर्नरसह मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारने सातत्य राखत चमकदार खेळ केला. तसेच अनुक्रमे ऑरेंज आणि पर्पल कॅप आपल्याकडे राखली आहे. हैदराबाद ‘फायनल’मध्ये पोहोचला नसला तरी दोघांना ‘कॅप’ मिळणार, हे नक्की आहे. वॉर्नरने १४ सामन्यात ४९८ धावा करताना सर्वाधिक धावा करण्यात अव्वल स्थान राखले आहे. कोलकात्याचा कर्णधार गौतम गंभीर (४९८ धावा) दुस-या आणि वॉर्नरचा सहकारी शिखर धवन (४७९ धावा) तिस-या स्थानी आहे. मात्र कोलकात्याचेही आव्हान संपुष्टात आल्याने वॉर्नरकडेच ‘ऑरेंज कॅप’ राहिल. सर्वाधिक विकेट घेणा-यांमध्ये भुवनेश्वरने (१४ सामन्यांत २६ विकेट) अव्वल स्थान राखले आहे. दुस-या जागी रायझिंग पुणे सुपरजायंटचा मध्यमगती गोलंदाज जयदेव उनाडकट (११ सामन्यांत २२ विकेट) आहे. भुवनेश्वरला मागे टाकण्यासाठी उनाडकटला किमान चार विकेट मिळवाव्या लागतील. मुंबईची तगडी फलंदाजी पाहता त्याला भुवनेश्वरला गाठणे, सोपे नाही.
२०१३, २०१५ आणि ..
मुंबईने तिस-यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. पहिल्या प्रयत्नात २०१० मध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मात्र २०१३ आणि २०१५ मध्ये आयपीएल ट्रॉफी मिळवली. चार वर्षापूर्वी माजी विजेते चेन्नईला हरवून पहिल्यांदा जेतेपद मिळवले. त्यानंतर दोन वर्षापूर्वी त्याच चेन्नईला हरवत दुस-यांदा बाजी मारली. मुंबईचे दोन्ही ‘फायनल’ एकाच प्रतिस्पध्र्याविरुद्ध आणि एकाच स्टेडियमवरील (ईडन गार्डन्स, कोलकाता) आहेत. त्यांनी पहिली दोन जेतेपदे दोन वर्षाच्या फरकाने जिंकली आहे. त्यामुळे यंदा मुंबईने जेतेपदावर मोहोर उमटवली तर आश्चर्य वाटायला नको.
- मुंबई संघ चौथ्यांदा ‘फायनल’मध्ये खेळतोय. आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा अंतिम फेरीत खेळणारा तो दुसरा संघ आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक सहा वेळा ‘फायनल’मध्ये खेळण्याचा मान माजी विजेता चेन्नईला जातो. त्यांनी सहा प्रयत्नात दोन जेतेपदे पटकावली.
- मुंबईने पुण्याला हरवल्यास सर्वाधिक तीन वेळा जेतेपद जिंकणारा तो पहिला संघ ठरेल.
- पुण्याने पहिल्या प्रयत्नात आयपीएल ट्रॉफी जिंकल्यास ते राजस्थान रॉयल्स (२००८), डेक्कन चार्जर्स (२००९), कोलकाता नाईट रायडर्स (२०१२) आणि गतविजेता सनरायझर्स हैदराबादच्या (२०१६) पंक्तीत बसतील.