दिल्लीतील सम विषम गाडय़ा रस्त्यांवर उतरवण्याचा प्रयोग झाल्यानंतर मुंबईतही याबाबत काही प्रयोग करता येईल का, यावर चर्चा झडत असताना देवनार डम्पिंग ग्राऊंडला लागलेल्या आगीने मुंबईतील आधीच प्रदूषित हवा अधिक प्रदूषित झाली. अग्निशमन दलाने कितीही दावा केला असला तरी ती आग अजूनही विझलेली नाही. ती अजूनही धुमसते आहे.
गेल्याच आठवडय़ात मुंबईच्या जुहू समुद्रकिना-यावर अनेक डॉल्फिन मासे मृतावस्थेत आढळले. त्यानंतर एक महाकाय देवमासाही मृतावस्थेत सापडला. अशा प्रकारे मुंबईला जल प्रदूषणाचाही विळखा बसलेला आहे. अशी मुंबईची सध्या बिकट परिस्थिती आहे. देशातील अनेक प्रदूषित शहरांमध्ये मुंबईचा क्रमांक लागतो आणि मुंबईतील वायू, जल प्रदूषणात अशाच प्रकारे वाढ होत राहिली तर मुंबई ही कोलकाता आणि दिल्लीला मागे टाकून देशातील पहिल्या क्रमांकाचे महानगर बनेल, अशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे.
देवनार डम्पिंग ग्राऊंडला लागलेल्या आगीमुळे झालेले वायू प्रदूषण आता कमी झालेले आहे; पण थांबलेले नाही. त्यात मुंबईतील हवा ही दिल्लीपेक्षा प्रदूषित आहे, असे हवेचे मूल्यमापन करणा-या एका खासगी संस्थेने स्पष्ट केले आहे. मुंबईतील पाणी, हवा यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे, असे असताना मुंबईतील घरांच्या किमती वाढत आहेत. त्यात काही फरक पडलेला नाही. अशा प्रदूषित मुंबईत लोकांना राहायला आवडत आहे, हा त्यांचा नाईलाज आहे की, त्यांच्याकडे काही पर्याय नाही, म्हणून मुंबईला ते पसंत करत आहेत, हे काही समजत नाही. मुंबई अधिकाधिक श्रीमंतांची झाली आहे. गरिबांच्या गरजा कमी आहेत तर मध्यमवर्गीय आणि श्रीमंतांच्या गरजा वाढत आहेत. गरज नसतानाही वस्तू खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. त्यात दुचाकी आणि चारचाकी वाहनेही आहेत. मुंबईची सार्वजनिक वाहतूक यंत्रणा सबळ नसली तर ती खूप कमकुवतही नाही. लोकल, बस, रिक्षा, टॅक्सी यांच्याबरोबर आता मेट्रो आणि मोनोची भरही पडली आहे. पण आता पैसा आल्यानंतर त्याचा ‘सदुपयोग’ करणारी मंडळी दुचाकी आणि चारचाकीवर हा पैसा उधळतात आणि आपली श्रीमंती दाखवू लागतात. या वाहनांमुळे वायू प्रदूषण वाढते. लोकसंख्या वाढल्यामुळे मुंबई आणि आजपासच्या समुद्रातून शहरातील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडले जाते आणि हे पाणी प्रदूषित होते. त्यामुळे मासे तिथे येण्याचे टाळतात. जे असतात ते लांब निघून जातात आणि जे तिथेच राहतात त्यांचा प्रदूषणामुळे बळी जातो. मुंबईचे समुद्रकिनारे तर छोटे छोटे डम्पिंग ग्राऊंड बनले आहेत. मुंबईला अशा प्रकारे पाणी आणि हवेच्या प्रदूषणाचा विळखा बसलेला आहे. त्यात आता डम्पिंग ग्राऊंडमुळे झालेल्या प्रदूषणाने हातभार लावला आहे. कच-याचे प्रदूषणही मुंबईच्या अंगाशी येत आहे. गरिबांच्या गरजा कमी असल्यामुळे त्यांची क्रयशक्तीही कमी असते. हातात पैसा आला की, क्रयशक्ती वाढते. त्यामुळे नसलेल्या गरजाही गरजा वाटू लागतात आणि वस्तूंची खरेदी सुरू होते. या खरेदीतूनच कच-याची निर्मिती होते. शहरातील यंत्रणांवर प्रशासनाचे योग्य नियंत्रण नाही. कायदे असूनही कायद्याचा योग्य तो वापर होत नाही. त्यामुळे आता मुंबईकरांनी स्वत:च स्वत:वर नियंत्रण घालून घेणे आवश्यक आहे. नाही तर कायद्याचा कितीही बडगा उगारला तरी त्यामुळे काही फरक पडणार नाही. मुंबईतील प्रदूषण वाढतच जाईल. मुंबईतील स्वयंसेवी आणि पर्यावरणविषयक संस्थांनी श्रीमंतांच्या वस्तीत जाऊन जनजागृती करण्याची वेळ आली आहे. चंगळवादी मुंबईकरांमुळे निर्माण झालेल्या कच-याचा त्रास सगळय़ांना होत आहे. त्यावर आताच मार्ग काढला नाही तर वेळ निघून जाईल.