ठाकुर्ली, डोंबिवली आणि कोपरदरम्यान गर्दीचे बळी दिवसेंदिवस वाढत असून डोंबिवलीतील धनश्री गोडवे या तरुणीचा सोमवारी सकाळी डोंबिवली-कोपर दरम्यान लोकलमधून पडून मृत्यू झाल्याने डोंबिवलीकर प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
डोंबिवली- ठाकुर्ली, डोंबिवली आणि कोपरदरम्यान गर्दीचे बळी दिवसेंदिवस वाढत असून डोंबिवलीतील धनश्री गोडवे या तरुणीचा सोमवारी सकाळी डोंबिवली-कोपर दरम्यान लोकलमधून पडून मृत्यू झाल्याने डोंबिवलीकर प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अपघातात बळी जाऊनही रेल्वे प्रशासन आणि केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू डोळयांवर पट्टी बांधल्यागत वागत आहेत. याविरोधात बुधवारी डोंबिवलीकर एकवटले असून धनश्रीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रेल्वे प्रवासी संघटनेच्या प्रतिनिधींसह प्रवाशांनी तोंडाला काळय़ा फिती बांधून रेल्वेच्या भोंगळ कारभाराचा निषेध नोंदवला.
मुंब्रा-ठाणेदरम्यान मंगळवारी पाच विविध रेल्वे अपघातांत तीन जण ठार तर दोन जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या. यापूर्वी डोंबिवलीतील भावेश नकाते व इतर ६ ते ७ प्रवाशांचा अशाच प्रकारे लोकल अपघातात आणि लोकलमधून पडून मृत्यू झाला होता.
त्यानंतरही हे प्रकार थांबवण्यासाठी रेल्वे काहीही करत नसून त्यामुळे आम्हाला यापुढे तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही प्रवासी संघटना व प्रवाशांनी दिला आहे.
गोवंडीजवळ रेल्वेतून पडून एकाचा मृत्यू
मुंबई- मंगळवारी ठाण्यात तीन प्रवाशांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला असताना बुधवारी हार्बर मार्गावर आणखी तीन प्रवासी रेल्वेतून पडले. यापैकी नीलेश जयस्वाल(१८) या तरुणाचा मृत्यू झाला असून सुमीत बोबटे, फुलचंद मौर्य हे दोघे गंभीर जखमी आहेत.
सकाळी लोकलच्या गर्दीमुळे हात सुटून हा अपघात झाल्याने हे तीघेही खाली पडल्याचे समोर येत आहे. सकाळी या तिघांनी मानखुर्द स्थानकातून ९.१५ वाजण्याच्या सुमारास सीएसटी लोकल पकडली होती.