महाराष्ट्रातील ३१ जणांसह ३५० भारतीय येमेनमधून मायदेशात सुखरुप परतले असून मुंबई आणि कोची विमानतळावर गुरुवारी सकाळी या सर्वांचे आगमन झाले.
मुंबई/कोची- येमेनमधून आज ३५० भारतीय मायदेशात सुरक्षित परतले. मुंबई आणि कोची विमानतळावर गुरुवारी सकाळी या सर्वांचे आगमन झाले. भारतीय हवाई दलाचे सी-१७ ग्लोबमास्टर हे विमान १९० भारतीयांना घेऊन मुंबई विमानतळावर उतरले. तर दुसरे विमान १६८ भारतीयांना घेऊन पहाटे दोन वाजता कोची विमानतळावर उतरले. परराष्ट्र मंत्रालयाने ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.
भारतीय परराष्ट्रमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ३५० भारतीयांना येमेनमधून सुरक्षित भारतात आणण्यात आले आहे. नौदलाच्या आयएनएस सुमित्रामधून मंगळवारी रात्री या भारतीय नागरिकांची सुटका करण्यात आली होती. यात महाराष्ट्रातील ३१ आहेत. २०६ हे केरळ येथील असून ४० हे तामिळनाडू येथील आहेत. याशिवाय पश्चिम बंगालच्या २३ आणि दिल्लीच्या २२ जणांचा यात समावेश आहे.
येमेनमध्ये अजूनही चार हजार भारतीय अडकले आहेत. त्यांनाही सुरक्षित भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. भारताचे परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह स्वतः येमेनमध्ये हजर आहेत. त्यांच्याच देखरेखीखाली हे काम सुरू आहे.
येमेनमधील ऍडन बंदरावरून नौदलाच्या आयएनएस सुमित्रामधून मंगळवारी रात्री या भारतीय नागरिकांना जिबुती येथे आणण्यात आले होते. जिबुती येथून भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने गुरुवारी सकाळी त्यांना भारतात आणण्यात आले. भारतात दाखल होताच त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
मुंबई विमानतळावर मंत्री प्रकाश मेहता व खासदार किरीट सोमय्या उपस्थित होते. तर, कोची विमानतळावर खुद्द केरळचे मंत्री के. सी. जोसेफ इतर मंत्र्यांसह उपस्थित होते.